नवी दिल्लीः पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याप्रकरणी बाबा राम रहीम याला पंचकुलाच्या सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज (गुरुवार) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याप्रकरणी 11 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. मात्र, शिक्षा 17 जानेवारीला सुनावण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले होते. त्यानुसार आज हा निकाल आला असून, यामध्ये राम रहिमसोबत अन्य तीन दोषींनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे.
सिरसा येथील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांची 2002 रोजी गोळी घालून हत्या करण्यात आली होती. डेऱ्यात सुरु असणारी बेकायदेशीर कृत्ये पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी उघड केली होती. रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात बाबा राम रहीम मुख्य आरोपी आहे. त्याचबरोबर कुलदीप सिंग, निर्मल सिंग आणि कृष्णण लाल या तिघांनाही न्यायालयाने या हत्याप्रकरणी दोषी ठरवले होते. आज झालेल्या सुनावणीत या चौघांनाही न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी बाबा राम रहीमचा खरा चेहरा उघड केला होता. साध्वींसोबत झालेल्या बलात्काराचे वृत्त रामचंद्र छत्रपती यांनी आपले वृत्तपत्र ‘पूरा सच’ मध्ये प्रसिद्ध केले होते. संबंधित वृत्त प्रसारित झाल्यानंतर त्यांना वारंवार धमक्या मिळत होत्या. मात्र, धमक्यांनाही न जुमानता रामचंद्र छत्रपती यांनी निर्भीडपणे बाबा राम रहीमविरोधात लिखान केले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.