छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून महाराजांना अभिवादन करण्यात येत आहे. सध्या देशात जी दोन नावे सर्वात जास्त चर्चेत आहेत त्यांनी देखील महाराजांना सोशल मिडीयाद्वारे मानाचा मुजरा केला आहे. ही नावे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी.
पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून रयतेच्या राजाला अभिवादन करत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्यासमोर नतमस्तक आहे. शिवाजी महाराज हे सत्य आणि न्यायासाठी लढणारे आदर्श राजे होते. ते खरे देशभक्त होते. समाजातील सर्वच स्तरातील लोकांना ते आपले राजे वाटत. जय शिवराय.' असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी म्हणतात, 'आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व बहुआयामी होते. ज्यांनी अनेक संकटे असतानाही आपल्या सुशासन आणि प्रशासनाचा भारतीय इतिहासात नवा अध्याय लिहीला. आपली योग्यता व क्षमतेच्या आधारावर, संकटे असताना संघर्षमय जीवनात त्यांनी लढा दिला. जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण आहे, ज्यांनी संघर्ष करत असतानाही सुशासनाची परंपरा मजबूत करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले. प्रभू रामांनी लहान लहान लोकांना, वानरांना एकत्र करुन आपली सेना स्थापन केली आणि विजय मिळवला. तशाच पद्धतीने शिवाजी महाराजांची संघटनाचे कौशल्य वापरून शिवाजी महाराजांनी शेतकरी आणि मावळ्यांना संघटित करुन युद्धासाठी तयार केले.'
तर राहुल गांधी यांनी मराठीत ट्विट करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. ते म्हणतात, 'छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. सर्व समाजातील मावळे एकत्रित करून त्यांनी स्वराज्य उभारलं आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यांचं जीवन आणि राज्य कारभार जगासाठी अनुकरणीय आहे. या महान राजास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.'
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.