बांगड्याला मागणी; मात्र दिवसाला २५ ते ३० टनच मासा सापडतोय

बांगड्याला मागणी; मात्र दिवसाला २५ ते ३० टनच मासा सापडतोय

रत्नागिरी - हवामानातील बदलांमुळे मच्छीमारांना पुरेशा प्रमाणात मासे मिळत नाहीत. समुद्रात गेलेल्या शंभरपैकी दहा ते पंधरा नौकांनाच मासे मिळत असल्याने मच्छीमार त्रस्त झाले आहेत. बांगड्याला परदेशातून मोठी मागणी आहे; मात्र तुलनेत दिवसाला २५ ते ३० टनच बांगडाच मिळतो.

फिलिपीन्समध्ये झालेल्या वादळाचा अरबी समुद्रात परिणाम झालेला नाही. तरीही अजून रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीला माशांचा तुटवडाच जाणवत आहे. पर्ससिननेट नौकांना वीस दिवसांमध्ये मोठा फटका बसला. मात्र काही अनधिकृत नौका किनारी भागात मासेमारी करत आहेत. मिरकरवाडा येथील बंदरातून शंभरहून अधिक मासेमारी नौका १५ ते ४० वावापर्यंत मासेमारीला जात आहेत. त्यातील पंधरा टक्‍केच नौकांना बांगडा, गेदरी, डोमा, पेडवा, खवला यांसारखी मासळी मिळते. त्यातील बांगड्याला किलोला शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे. अन्य मासळीचे दर १० ते ३० रुपये या दरम्यान आहेत. 

दर्जेदार बांगडा मासा हा परदेशांत पाठविला जातो. थायलंड, इंडोनेशिया, चायना, कुवेत, दक्षिण अमेरिकासह विविध देशांमधून बांगड्याला मोठी मागणी आहे. तुलनेत मासा पुरेसा मिळत नाही. दीडशे रुपये दर समाधानकारक आहे. उत्पादनच मिळत नसल्याने मच्छीमार हतबल झाले आहेत.

रत्नागिरी किनाऱ्यावर अभाव
नौकांना एका फेरीला साधारण ४० ते ५० डिश (एक डिश ३२ किलोची) मासे मिळत आहेत. मालवणसारख्या भागात मच्छीमारांना बंपर मासे मिळत असले तरीही रत्नागिरीच्या किनाऱ्यावर मच्छीचा अभाव आहे.

मच्छीमारांना पुरेशी मासळी मिळत नाही. त्यामुळे परदेशांत पाठविण्यासाठी बांगडाच उपलब्ध नाही.
- पुष्कर भुते,
मच्छीमार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com