केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया उद्योगाला सवलती द्याव्यात

केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया उद्योगाला सवलती द्याव्यात

रत्नागिरी - परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केरळ सरकारने कर्जावरील व्याजमाफीस विविध सवलती दिल्या आहेत. त्याच धर्तीवर लाभ मिळावा, यासाठी रत्नागिरीतील उद्योजक एकवटले आहेत. खासदार, आमदारांसह मोर्चाच्या माध्यमातून आपल्या मागण्या शासनापर्यंत पोचविण्याचा विचार सुरु आहे. 

प्रमुख उद्योजकांची बैठक रत्नागिरीत झाली. यावेळी जयवंत विचारे, परांजपे अॅग्रोचे ऋषिकेश परांजपे, विवेक बारगिर, प्रकल्प आराध्ये, संदेश दळवी यांच्यासह अन्य छोटे-मोठे उत्पादकही उपस्थित होते. पुढील दिशा ठरविण्यासाठी पुन्हा बैठकीचे नियोजन केले जाणार आहे.

जागतिक मंदीमुळे काजुगराची मागणी कमी झालेली असतानाच काजू बियांचा दर गतवर्षी दीडशे रुपयांवर पोचला होता. यंदा तो सव्वाशे रुपयांच्या घरात होता. त्यामुळे कोकणातील काजू प्रक्रिया उद्योजकांना दिवाळखोरीला सामोरे जावे लागत होते. अनेक लहान उद्योजकांनी कारखान्याचे "शटर डाऊन' केले. मोठया उद्योजकांनी प्रक्रियेचे काम कमी केले. काजू बीच्या दरात वाढ झाली असली तरीही काजुगराच्या दरात मोठी वाढ झालेली नाही. परदेशी काजू यंदा 100-110 रुपये मोजावे लागले. त्यामुळे उद्योजकांची पंचाईत झाली. कोकणात कोट्यावधीची उलाढाल काजू व्यावसायातून होते. येथे अनेक प्रक्रिया उद्योग आहेत. गेल्यावर्षी झालेल्या नुकसानीचा विचार करुन महाराष्ट्र शासनाने केरळच्या धर्तीवर सहकार्य करावे अशी, मागणी करण्यात येणार आहे. यासाठी प्रसंगी आंदोलन करावे लागले तरीही पावले उचलण्याची तयारी काजू प्रक्रिया उद्योजकांनी केली आहे. 

काजू गराचे दर स्थिर 

उत्पादनासाठी लागणारे मनुष्यबळ, वीज, वाहतूक आणि पॅकिंग या चार बाबींचा फक्त विचार करता काजूगराचा प्रतिकिलो खर्च सध्या 530 ते 550 रुपयांवर गेला. घाऊक बाजारात प्रतिकिलो दर सरासरी 570 ते 600 रुपये आहे. मोठी गुंतवणूक करून उभारलेले कारखाने अडचणीत आले आहेत. त्यांना शासनाच्या पाठबळाची गरज आहे. 

केरळ शासनाकडून उद्योगाला राजाश्रय 
केरळ शासनाने यंदा झालेला तोटा लक्षात घेऊन काजू प्रक्रिया उद्योगाला राजाश्रय दिला आहे. उद्योजकांनी घेतलेल्या कर्जावरील व्याज माफ केले आहे. अडचणीत असलेल्या उद्योगांच्या कर्जांचे पुनर्गठन करण्यात आले आहे. औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांसाठीच्या वीज वापराचे दर अधिक असतात. त्यातही प्रक्रिया उद्योगांना सवलत दिली आहे. उद्योजकांचे कर्ज थकित आहे, त्यांच्या मालमत्ता सील करण्याऐवजी त्यांना आधार देण्यासाठी अर्थसहाय्य देण्यासाठी पावले उचलली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com