#KonkanRain मालगुंड-रहाटाघर येथे तिघांचे संसार गेले वाहून

#KonkanRain मालगुंड-रहाटाघर येथे तिघांचे संसार गेले वाहून

रत्नागिरी - तालुक्‍यातील मालगुंड-रहाटाघर येथे खाडीत घातलेल्या मोऱ्यांची झाकणं निरुपयोगी ठरली आणि मोऱ्या वाहून गेल्या. सोमवारी (ता. २२) रात्री झालेल्या जोरदार पावसाचा फटका तीन घरांना बसला. तुंबलेल्या पाण्यामुळे संसार वाहून गेले. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले असल्याची माहिती स्थानिक रहिवासी निखिल सुर्वे यांनी दिली.

मोऱ्या दुरुस्त करण्यासाठी गेली चार वर्षे प्रशासनाकडे दाद मागूनही दुर्लक्ष केले. त्याची किंमत मोजावी लागली. रत्नागिरीसह काल तालुक्‍यात जोरदार पाऊस झाला. आजही पावसाचा जोर कायम आहे. थोडा वेळ थांबत अद्यापही पाऊस सुरू आहे. पावसाचे पाणी आणि समुद्राची भरती यामुळे तालुक्‍यातील मालगुंड-रहाटाघर परिसरात रात्री साडेबाराच्या सुमारास पाणी शिरल्याने पूरस्थिती उद्‌भवली. यामध्ये श्‍याम विश्‍वनाथ सुर्वे, रश्‍मी पाटील आणि हरिश्‍चंद्र मयेकर यांच्या घरात पाण्याचा लोंढा शिरल्याने त्यांचा संसार वाहून गेला आहे.

मालगुंड परिसरातील रहाटाघर, एमएसईबीच्या बाजूला या स्थानिकांची घरे आहेत. दोन दिवस पावसाने कहर केल्यामुळे रात्री रहाटाघर येथे खाडीपट्ट्याला असलेल्या मोऱ्या वाहून गेल्यामुळे पाणी आत शिरले. स्थानिकांना रात्र जागून काढावी लागली. काही घराबाहेर गेले तर काहींनी सकाळपर्यंत उंच जागेचा आधार घेत रात्र काढून \जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. डोळ्यादेखत संसार वाहून गेल्याचे दिसत असून काही करता येत नव्हते. रात्र असल्यामुळे काहीच करू शकले नाहीत. घरातील संसार वाहून गेला. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत सकाळी तलाठयांसह लोकप्रतिनिधींना माहिती दिली. दुपारपर्यंत कोणीही आलेले नाही.

रहाटाघर हा परिसर खाडीपट्याला लागून असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी आत येऊ नये, यासाठी मोऱ्या टाकल्या आहेत. या मोऱ्याचे दरवाजे दुरुस्त व्हावेत यासाठी श्‍याम विश्‍वनाथ सुर्वे यांनी गेली चार वर्षे दाद मागत होते. तलाठी, प्रशासनाला माहिती देत होते. मोऱ्यांना झाकण नसल्यामुळे पाणी आत येते. त्यासाठी जीर्ण झालेल्या झाकणांना तार बांधून अडकवून ठेवणे काम करत होते. मात्र कालपासून झालेल्या पावसामुळे खाडीचे पाणी आणि समुद्राचे पाणी आत शिरल्यामुळे पूरजन्य परिस्थिती उद्‌भवली आणि तिघांचेही संसार डोळ्यासमोर वाहून गेले.   

कुणीही साथीला नाही...
गणपतीपुळे येथील समुद्राच्या पाण्यात बुडताना अनेकांना वाचवण्यात निखिल सुर्वे यांचा सहभाग असतो. नुकत्याच गणपतीपुळे येथे घडलेल्या दोन घटनांवेळी निखिलने सहा जणांना वाचविले होते. मात्र, त्यांच्या घरात पाणी भरून संसार वाहून जाण्याचा प्रसंग ओढवला, तर कुणीही साथीला आले नसल्याची खंत निखिल सुर्वे यांनी व्यक्त केली. तसेच दुपारी समुद्राला भरती असल्याने पुन्हा पूरजन्य परिस्थिती उद्‌भवणार असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com