मुंबई - देशाचे राष्ट्रपती जेव्हा वेगवेगळ्या मंदिरांत जात होते, तेव्हा तिथले पुजारी त्यांना देवळाच्या गाभाऱ्यात प्रवेश करू देत नव्हते. तेव्हा संघपरिवार आणि भाजपने ते कसे चालू दिले, असा सवाल कॉंग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी केला. दलित मतांच्या राजकारणासाठी रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती करण्यात आल्याचे वक्तव्य राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले होते; यावरून गेहलोत यांच्यावर भाजपने टीकास्त्र सोडले असता महाजन यांनी भाजपला आज प्रत्युत्तर दिले.
रत्नाकर महाजन म्हणाले की, निवडणुकीच्या राजकारणात जाती-धर्माच्या नावावर मतदारांना आवाहन करण्याची संघपरिवार व भाजपची फार जुनी सवय आहे. याही वेळी नरेंद्र मोदी आणि भाजपने तेच करायचे ठरविलेले दिसते. मोदी यांनी अकलूजच्या भाषणात आपण मागासवर्गीय असल्यामुळे कॉंग्रेस टीका करीत असल्याचे म्हटले आहे, हा त्याचाच पुरावा आहे, असे महाजन यांनी म्हटले आहे.
|