औरंगाबाद - प्रत्येक निवडणुकीत कोणताही पक्ष आपल्यासाठी प्रचार करतो. राज ठाकरे हे मागच्या वेळीही प्रचार करीत होते, आताही प्रचार करीत आहेत. त्यांना त्यांच्या चष्म्यातून आमच्यातील कमी आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील खुबी दिसत असेल. आमच्या नजरेतून मात्र आम्हाला विकास दिसतोय. ते सभा घेत राहतील. तथापि, त्याचा आम्हाला काहीही फरक पडणार नाही, असा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाज हुसेन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते मराठवाड्यात जाहीर सभा घेत आहेत. याविषयी त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. हुसेन म्हणाले, की राज ठाकरे हे मोठे नेते असल्याने त्यांना सीमित ठेवू नका. त्यांनी पूर्ण देशात प्रचार करावा. आम्हीही आमच्या भाषणातून त्यांना उत्तर देऊ. औरंगाबादेत शिवसेना-भाजप एकत्र काम करीत आहे. शिवसेनेशी जोडलो तेव्हापासून त्यांनी धोका दिला नाही. केंद्रातही त्यांच्याबरोबर काम केले. यामुळे औरंगाबादबरोबर महायुतीच्या मराठवाड्यातील जागाही आमच्या ताब्यात येतील, असा निर्धारही त्यांनी केला.
कलम 370 देशासाठी बाधा
जम्मू-काश्मीरबाबत कलम 370 मुळे नागरिकांना कोणताच फायदा झालेला नाही. हे कलम हटविल्यानंतर मीही अनंतनागमध्ये झोपडी बनवू शकतो. तेथील नागरिक बिहार आणि औरंगाबादमध्ये घर बांधू शकतात. तसेच, जगात मुस्लिमांसाठी भारतासारखा चांगला देश आणि हिंदूंपेक्षा चांगला दोस्त कुठेच मिळणार नाही. देशातील लोकांनाही 370 कलम नकोय. तरीही मेहबूबा मुफ्ती हे कलम हटविण्यासाठी विरोध करीत आहेत. त्यांनी मुस्लिम-हिंदू कशा प्रकारे एकत्र राहतात, औरंगाबादेत येऊन पाहावे, असे आवाहनही हुसेन यांनी केले.
|