राज्यात चोवीस जिल्ह्यांत कमी पाऊस

Maharashtra-Rain
Maharashtra-Rain

पाच जिल्ह्यांमध्ये ६० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस; केवळ नऊ जिल्ह्यांत ओलांडली सरासरी
पुणे - पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा, मॉन्सूनचे उशिराने झालेले आगमन यामुळे राज्यात यंदा पावसाने सरासरी गाठलेली नाही. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावली, मात्र मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने ओढ दिली आहे. विदर्भातील यवतमाळ आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस पडलेला नाही. राज्यातील तब्बल २४ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

राज्यातील तालुकानिहाय आकडेवारी विचारात घेता पर्जन्यमानाची स्थिती चिंता वाढविणारी आहे. मात्र, अद्यापही अनेक तालुक्यांमध्ये पावसाचे वितरण असमान असल्याचे चित्र आहे. यात मराठवाडा, विदर्भातील अनेक तालुक्यांना पावसाने ओढ दिली असून, उत्तर महाराष्ट्रातील काही तालुक्यांचा यात समावेश आहे. राज्यातील ५१ तालुक्यांमध्ये सरासरीच्या २५ ते ५० टक्के कमी, तर १४७ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्के पाऊस पडला आहे. ८१ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पर्जन्यमानाची नोंद झाली असून, ७४ तालुक्यांत ७५ ते १०० टक्के पाऊस पडल्याचे कृषी विभागाकडील नोंदीवरून स्पष्ट होत आहे.

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) आगमन यंदा खूपच लांबले. साधारणत: ७ जून रोजी महाराष्ट्रातील तळकोकणात दाखल होणारा मॉन्सून यंदा २० जून रोजी पोचला. १९७२ नंतर यंदा प्रथमच मॉन्सूनचे उशिराने आगमन झाले.

यापूर्वी पूर्वमोसमी पावसानेही राज्यात समाधानकारक हजेरी लावली नाही. त्यानंतर मॉन्सून दाखल होत असताना आलेल्या वादळाने बाष्प ओढून नेल्याने राज्यात निम्मा जून महिना कोरडा गेला. जून अखेर आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात झालेल्या पावसाने सरासरी वाढविण्यास मदत झाली. 

टंचाई काही हटेना 
निम्मा जुलै महिना उलटूनही पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने औरंगाबाद, अमरावती, पुणे, नाशिक विभागांतील २२ जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई कायम आहे. राज्यातील ३ हजार ५७५ गावे, ९ हजार ५६६ वाड्यांना ४ हजार ७९८ टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. कोकणातील पाणीटंचाई दूर झाली असून, कोल्हापूर, नंदूरबार, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये सध्या पाणीटंचाई भासत नाही. औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, पुणे विभागातील सोलापूर आणि नाशिक विभागांतील नगर जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com