काँग्रेस बालेकिल्ला राखणार?

Nanded
Nanded

मोदी लाटेतही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नांदेडमधून निवडले गेले. आता त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी अमिता यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेसकडून पाठवलेला आहे. कोणत्याही स्थितीत ही जागा जिंकण्याचा भाजपचा चंग असला तरी त्यांचा उमेदवार ठरलेला नाही. युती आणि आघाडी यावरही बरेच अवलंबून असेल. वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रा. यशपाल भिंगे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

नांदेड मतदारसंघात १९५१ पासून आतापर्यंतच्या निवडणुकीत शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, सूर्यकांता पाटील, केशवराव धोंडगे अशा दिग्गज मंडळींनी खासदार पद भूषवले आहे. १९७७, १९८७ आणि २००४ चा अपवाद वगळता मतदारसंघाने काँग्रेसला साथ दिली आहे. चव्हाण मोदी लाटेतही सुमारे ८१ हजार मताधिक्‍याने विजयी झाले. जिल्ह्यात काँग्रेसखालोखाल भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. ‘एमआयएम’नेसुद्धा बस्तान बसवले आहे. भारिप-बहुजन महासंघासोबत ‘एमआयएम’ची वंचित बहुजन आघाडी झाल्यामुळेही त्याचा परिणाम जाणवेल. अन्य पक्षांचीही ताकद आहे. 

मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत चव्हाण यांनी विरोधकांवर मात करत एकहाती सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर पुन्हा जिल्ह्यातील इतर नेत्यांनी ताकद पणाला लावत स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये माजी मंत्री सूर्यकांता पाटील, डॉ. माधव किन्हाळकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, बापूसाहेब देशमुख गोरठेकर, किशनराव राठोड आदींचा उल्लेख करावा लागेल. लोकसभेसाठी कोणत्या चव्हाणांना उमेदवारी याचा निर्णय काँग्रेसचे वरिष्ठ घेतील. इच्छुकांच्या गर्दीमुळे भाजपचा उमेदवार ठरलेला नाही. त्यांच्याकडून

सूर्यकांता पाटील, डॉ. माधव किन्हाळकर, आमदार राम पाटील रातोळीकर आदींच्या नावांची चर्चा आहे. शिवसेनेकडून तशी तयारी नसली तरी आमदार सुभाष साबणे, हेमंत पाटील आणि राजश्री पाटील यांची नावे चर्चेत आहेत. वंचित बहुजन आघाडीतर्फे माळेगाव यात्रेच्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी प्रा. यशपाल भिंगेंची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांचेही काँग्रेससमोर आव्हान असेल.

२०१४ ची मतविभागणी
    अशोक चव्हाण (काँग्रेस) - ४,९१,२९२ (विजयी)
    डी. बी. पाटील (भाजप) - ४,१०,४५४
    डॉ. हंसराज वैद्य (बसपा) - २२,७७२
    राजरत्न आंबेडकर (बहुजन मुक्ती पार्टी) - २८,३९६

मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्‍न
    उद्योगधंदे बंद होत असून, बेरोजगारांचा लोंढा पुणे, मुंबई, हैदराबादकडे स्थलांतरीत.
    लेंडीसह इतर प्रकल्प अजूनही अर्धवट अवस्थेत. 
    चार पदरी राष्ट्रीय महामार्गांची कामे संथगतीने.
    शेतीवर आधारित व शेतीपूरक प्रक्रिया उद्योगांची गरज. 
    धार्मिक तसेच पर्यटनासाठी वाव, पण दुर्लक्ष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com