मराठवाड्याला सांस्कृतिक न्याय मिळाला; लेखकांची भावना

sammelan
sammelan

लातूर : आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये प्रथमच होणार असले तरी मराठवाड्यात ते तब्बल पंधरा वर्षांनी होत आहे. संमेलन मराठवाड्यात घेण्याचा निर्णय हा मराठवाड्याला मिळालेला सांस्कृतिक न्याय आहे, अशा शब्दांत लेखकांनी आपल्या भावना सोमवारी व्यक्त केल्या.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये होईल, असे जाहीर केले. त्यानंतर मराठवाड्यातील सांस्कृतिक विश्वात आनंदाचे वातावरण तयार झाले. याआधी २००४मध्ये औरंगाबाद येथे ७७वे साहित्य संमेलन झाले होते. त्यावेळी दिवंगत समीक्षक डॉ. रा. ग. जाधव यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. या संमेलनानंतर तब्बल पंधरा वर्षानंतर मराठवाड्यात हे संमेलन होणार आहे.

माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ‘‘उस्मानाबाद हा मराठवाड्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेणे काहीसा मागासलेला आहे. पण मराठवाडा मुक्ती संग्रामाचे केंद्र राहिलेला हा परिसर आहे. उस्मानाबादमध्ये सांस्कृतिक परंपरा मोठी आहे. वास्तविक, आधीच उस्मानाबादमध्ये संमेलन व्हायला हवे होते; पण पुण्यातील महामंडळाच्या त्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी दुष्काळाचे कारण पुढे करून उस्मानाबादला न्याय दिला नाही. पण आता मात्र न्याय मिळाला आहे. उस्मानाबादमधील साहित्य, संस्कृतीची परंपरा आता राष्ट्रीय नकाशावर येईल. वेगवेगळ्या जाती-धर्मातील कार्यकर्ते एकत्र काम करतात. उस्मानाबादमधील हा सांस्कृतिक एकोपा मला खूप महत्वाचा वाटतो.’’

माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, ‘‘माझा जन्म ज्या जिल्ह्यात झाला आहे, तेथे आगामी साहित्य संमेलन होणार आहे, हे ऐकून अतिशय आनंद झाला. आजवर अनेक लेखक, कथाकार, कवी, समीक्षक या जिल्ह्याने दिले आहेत. सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या अशा या जिल्ह्यात संमेलन होणार आहे. त्यामुळे तिथले सांस्कृतिक वैभव, सांस्कृतिक संपन्नता राज्यासमोर, देशासमोर येईल, याची खात्री आहे. संमेलनात साहित्यबाह्य विषयावर चर्चा रंगू नये, ऐवढीच अपेक्षा आहे. संमेलन कमीतकमी पैशांत कसे करता येईल, याचाही विचार व्हावा.

साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे म्हणाले, ‘‘अनेक वर्षांनी संमेलन मराठवाड्यात होत आहे, याचा आनंद आहे. साहित्य महामंडळाच्या या निर्णयाचे मी स्वागतच करतो. संमेलनासाठी लातूरची निवड झाली नसली तरी उस्मानाबाद हा लातूरचा शेजारचाच जिल्हा आहे. खरंतर उस्मानाबादकरांनी अनेक वर्षांपासून संमेलन घेण्याची तयारी केली होती. तेथे मराठवाडा साहित्य संमेलन, मराठवाडा महिला साहित्य संमेलन यशस्वीपणाने झाले आहे. तसेच हेही संमेलन होईल, याची खात्री आहे. साहित्यिक डॉ. सोमनाथ रोडे म्हणाले, ‘‘विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना साहित्य संमेलन लातूरमध्ये घ्यायच्या हालचाली सुरू होत्या. पण संमेलन होऊ शकले नाही. लातूर किंवा उस्मानाबादमध्ये संमेलन होणे आवश्यकच होते. त्यामुळे येथील कवी, लेखक, समीक्षक यांना मोठ्या व्यासपीठावर जाण्याची संधी मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com