मुंबई - धोकादायक इमारती रिकाम्या केल्यानंतर रहिवाशांचे संक्रमण शिबिरांमध्ये पुनर्वसन करण्यात आले खरे; पण ही संक्रमण शिबिरेच आता धोकादायक ठरू लागली आहेत. अनेक इमारतींचे प्लास्टर अधूनमधून पडत असतेच, शिवाय आता स्लॅबचा भागही कोसळू लागला आहे. कधीतरी आपल्याला हक्काचे घर मिळेल, असे स्वप्न पाहत अनेक कुटुंबे दोन-तीन पिढ्यांपासून धोकादायक संक्रमण शिबिरात जीव मुठीत घेऊन जगत आहेत. "सकाळ'च्या पाहणीत हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
धोकादायक इमारत घोषित केल्यानंतर नागरिक घरे सोडायला तयार होत नाहीत, असा दावा प्रशासकीय यंत्रणा करतात; मात्र घर सोडल्यानंतर उपनगरांतील कोणत्या तरी कोपऱ्यात त्यांचे पुनर्वसन केले जाते. घराजवळच्या शाळा, रोजीरोटी सोडून दूर जाणे शक्य होत नाही, असा दावा धोकादायक इमारतींमधील रहिवासी करतात. त्याचबरोबर आतापर्यंतचा संक्रमण शिबिरांचा अनुभवही "नरकाहून वाईट' असाच आल्याचे काहींनी "सकाळ'ला सांगितले. मुंबईत 56 संक्रमण शिबिरे असून त्यातील तीन संक्रमण शिबिरांची पाहणी "सकाळ'ने केली.
धोकादायक इमारतींतून बाहेर पडल्यानंतर आज ना उद्या आपल्याला हक्काचे घर मिळेल, हे स्वप्न उराशी घेऊन प्रतीक्षानगर येथील संक्रमण शिबिरात एक-दोन वर्षे नव्हे; तर तीन पिढ्यांपासून काही कुटुंबे जगत आहेत. वांद्रे- कुर्ला संकुलातील भारतनगरमधील संक्रमण शिबिरच धोकादायक झाले आहे. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने वर्षभरापूर्वी या संक्रमण शिबिराच्या पुनर्विकासाला परवानगी दिली आहे; मात्र म्हाडाकडून अद्याप पुनर्विकास कागदावरच ठेवण्यात आला आहे. कुलाबा येथील येथील संक्रमण शिबिरातही दोन-तीन पिढ्यांपासून रहिवासी वास्तव्यास आहेत.
कुलाबा मार्केटच्या इमारतीतून 1981 मध्ये आमचे कुटुंब कुलाबा संक्रमण शिबिरात आले. त्या वेळी इथे प्रचंड दलदल होती. आताही परिस्थिती फारशी बदललेली नाही. आम्हाला हक्काचे घर अद्याप मिळालेले नाही. कुलाबा बदलले; पण हे संक्रमण शिबिर जैसे थेच राहिले. इमारती आता जीर्ण होऊ लागल्या आहेत.
- चंद्रकांत जाधव, रहिवासी, कुलाबा संक्रमण शिबिर
|