तत्कालीन करवीर तहसीलदार खरमाटेंसह १७ जणांवर गुन्हा

तत्कालीन करवीर तहसीलदार खरमाटेंसह १७ जणांवर गुन्हा

कोल्हापूर - बनावट वटमुखत्यारपत्र व कागदपत्राच्या आधारे जमिनीचे पोटहिस्से, दस्त व गुंठेवारी करून फसवणूक केल्याप्रकरणी करवीरचे तत्कालीन तहसीलदार योगेश खरमाटे, तहसीलदार उत्तम दिघे, मंडल अधिकारी शंकर नांगरे यांच्यासह १७ जणांवर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग झाला. याबाबत शांताराम श्रीपती माळी (रा. बालिंगा, ता. करवीर) यांनी न्यायालयात फिर्याद दिली. 

करवीरचे तत्कालीन तहसीलदार योगेश भीमराव खरमाटे, तहसीलदार उत्तम विठ्ठल दिघे, बालिंग्याचे (ता. करवीर) मंडल अधिकारी शंकर एन. नांगरे, बालिंग्याचे तलाठी शरद मारुती नलवडे, भूमिअभिलेखच्या उपअधीक्षक पल्लवी शिरकोळे, कुंभार (पूर्ण नाव माहीत नाही), जिनगोंडा यशवंत पाटील, आशा जिनगोंडा पाटील, मुवर रशिद पठाण (रा. इचलकरंजी), वैष्णवी हरिश राणे, संजय शिवाजी पवार (रा. राजारामपुरी), प्रदीप पांडुरंग इंगवले (रा. शिवाजी पेठ), उमेश राजाराम झंजे (वय ३०, रा. कावणे, ता. करवीर), सरिता दिनकर माने (४५), दीपक रत्नाकर माने (दोघे रा. जरगनगर), इंद्रजित बाबूराव पाटील, बाबूराव सीताराम पाटील (दोघे रा. कळंबा, करवीर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, शांताराम माळी यांची बालिंगा येथे वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीत ते पावसाळ्यात गवताचे पीक घेतात. या मिळकतीत मृत रामचंद्र बाबू माळी हे सह-हिस्सेदार आहेत. त्यांनी कुटुंबाच्या नावे वटमुखत्यारपत्र केलेले नाही. तरीही त्यांनी वटमुखत्यारपत्र केल्याचे भासवून त्याआधारे बनावट दस्त नोंदवले. त्यामुळे शांताराम माळी व त्यांचे पूर्व हक्कदारांची नावे सात-बारावर आली नाहीत. त्याजागी खरेदीदारांची नावे नोंद झाली आहेत. फिर्यादीनुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी १३ फेब्रुवारीला प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. दाखल गुन्ह्यानुसार १७ संशयितांवर गुन्हा नोंद झाला. याबाबतचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अरविंद कांबळे व हेडकॉन्स्टेबल संजय कोळी करीत आहेत.

रेकॉर्ड नसतानाही फसवणूक 
तत्कालीन तहसीलदार खरमाटे यांना महानगरपालिका हद्दीतील जमिनीबाबत गुंठेवारी व अन्य कोणतेही आदेश मान्य करता येत नाहीत, हे माहीत असतानाही त्यांनी इतर संशयितांना बेकायदा मदत केली. संशयितांकडे कोणतेही रेकॉर्ड नव्हते, तरीही १७ संशयितांनी बनावट दस्त व कागदपत्राद्वारे २०००, २००४ ते आजअखेर फसवणूक केली, असे शांताराम माळी यांनी न्यायालयात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com