हमाल पंचायतीच्या नावे फसवणूक

Crime-Scene
Crime-Scene

सातारा - हमाल पंचायतीच्या स्कीमच्या माध्यमातून दहा लाख रुपये मिळवून देण्याच्या आमिषाने गंडा घालणारी टोळी पुणे व सातारा जिल्ह्यांत कार्यरत आहे. तिने जिल्ह्यातील शेकडो लोकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. एवढ्यावरच न थांबता पैसे मागणाऱ्यांनाच खंडणीच्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न करून लोकांच्या मनात भीती निर्माण केली जात आहे. पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीने कारवाई करणे आवश्‍यक आहे.

सासवड परिसरात या टोळीचा म्होरक्‍या कार्यरत आहे. हमाल पंचायतीमध्ये विविध हमालांचे ४५ कोटी रुपये पडून आहेत. त्याबाबत एक स्किम आली आहे. पाच हजार रुपये भरून सभासद झाल्यावर दहा लाख रुपये देण्याचे आश्‍वासन या टोळीतील सदस्य देत आहेत. एकदा पाच हजार रुपये भरल्यानंतर सभासद अर्ज भरणे, स्टॅम्प तयार करणे अशी विविध कारणे सांगून ४० ते ५० हजार रुपये उकळले जात आहेत. अशाच प्रकारे लोणंद येथील कांता धायगुडे या महिलेला सुमारे नऊ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. लोणंदमधील एक व्यक्ती त्यांच्याकडे आली होती. त्याने या स्किमची माहिती देत दहा लाख रुपये देण्याचे आश्‍वासन दिले. त्यानुसार त्यांनी स्वत:चे पाच हजार रुपये भरले, तसेच आई- वडील, भाचा व इतर ओळखीच्या लोकांचाही फायदा व्हावा, यासाठी त्यांनी सुमारे २२ जणांचे पैसे त्या व्यक्तीकडे भरले. त्यानंतर त्या व्यक्तीने त्यांना पुणे जिल्ह्यातील एका व्यक्तीची भेट घालून दिली. तिने विविध कारणे सांगून व प्रकरण मार्गी लावण्यासाठी प्रत्येकी ४० हजार या प्रकारे सुमारे नऊ लाख रुपये तिला दिले.

पैसे दिल्यानंतर संबंधित टोळीने त्यांच्याकडून स्टॅम्प व विविध प्रतिज्ञापत्र तयार करून घेतली. त्यानंतर त्यांना दहा-दहा लाख रुपयांचे धनादेशही दिले; परंतु ते धनादेश वटले नाहीत. त्यामुळे त्यांनी पैशाची मागणी सुरू केली. त्या वेळी त्यांना ४५ कोटींच्या योजनेची रक्कम पुण्यातील एका बॅंकेत जमा होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे सुमारे वर्षभर फसवणूक झालेले लोक पुण्यातील त्या बॅंकेत हेलपाटे घालत होते. त्या वेळी तेथील काही अधिकाऱ्यांनीही त्यांना पैसे लवकरच येतील, तुमचे काम होईल असे सांगत आश्‍वस्त केले. त्यामुळे लोकांनी आणखी वाट पाहिली. या दरम्यान फसवणूक करणाऱ्या टोळीने विविध बनावट ठराव, बॅंकेच्या शिक्‍यांच्या याद्याही त्यांना दाखविल्या.

बऱ्याच महिन्यानंतर पैसे मिळत नसल्यामुळे कांताबाई व अन्य लोकांनी त्याच्याकडे योजनेचे राहूद्या दिलेले पैसे द्या म्हणून मागणी सुरू केली. या वेळी त्यांच्यावरच खंडणीची तक्रार देण्याचा प्रकार टोळीतील सदस्यांनी केला.

याबाबत सासवड पोलिस ठाण्यात अर्ज देण्यात आला होता. त्यानुसार कांताबाई यांची चौकशीही झाली. पोलिसांना सर्व कागदपत्रे व माहिती दिल्यावर त्यांनी जबाब नोंदवून त्यांना सोडून दिले. एवढ सगळं ऐकूनही त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. लोणंद हद्दीत सुरवात झाल्यामुळे तिकडे गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्या लोणंद पोलिस ठाण्यात गेल्या; परंतु त्यांचा गुन्हा नोंदवून घेण्यात आला नाही. उलट सासवडलाच जा असा अनाहुत सल्ला दिला. त्यामुळे कांताबाई हतबल झाल्या आहेत. उलट त्या टोळीतील सदस्यच आता त्यांना धमकावत आहे, बदनामी करत आहेत. काय करायचे असा प्रश्‍न त्यांना पडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com