मलकापूरच्या सभेत कऱ्हाडचे ‘सिक्रेट’ ओपन!

Prithviraj-and-Atul
Prithviraj-and-Atul

कऱ्हाड - कऱ्हाड पालिका मोकळी केली, आता मलकापूर मोकळी करणार आहे, असे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी मलकापूरच्या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना थेट आव्हान दिले आहे. या आव्हानातून कऱ्हाडच्या राजकारणातील ‘ओपन सिक्रेट’ बाहेर पडले आहे. 

शहरातील राजकारण नेहमीच एका वेगळ्या धाटणीत असते. पालिकेला वेगळे राजकारण, विधानसभेला वेगळीच खेळी, लोकसभेचे राजकारण असे निवडणुकानुसार होणाऱ्या राजकीय हालचाली अनेक अर्थाने चर्चा घडविणाऱ्या ठरतात. २००९ पासून कऱ्हाड शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघात समाविष्ठ झाले. तेव्हापासून पालिकेच्या राजकारणाला वेगळी गती मिळाली. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पालिकेच्या २९ पैकी सुमारे २० नगरसवेकांनी माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांची साथ केली. त्यावेळी (कै.) विलासराव पाटील-वाठारकर यांना विरोध झाला होता. मात्र, २०११ मध्ये पालिकेच्या निवडणुकीत वेगळी स्थिती दिसली. नुकत्याच झालेल्या २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत नेमकी उलटी स्थिती झाली. त्यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना साथ केली. त्यावेळी त्यांच्या विरोधात अतुल भोसले यांनी भाजपमधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी पालिकेतील नगरसेवकांनी श्री. चव्हाण यांची साथ केली. त्यापूर्वीचे राजकारणातही पालिकेतील सत्तेचा वापर विधानसभा डोळ्यासमोर ठेवून झाला होता. अतुल भोसले यांनी २००९ मध्ये राष्ट्रवादीतून कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातून आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी किमान अडीच वर्षे आधी श्री. भोसले यांनी पालिकेत सत्तांतर घडवून आणले होते. त्यावेळी तीन अपक्षांच्या मदतीने श्री. भोसले यांनी पालिकेत त्याकाळच्या जनशक्तीची सत्ता आणली होती. त्यावेळी शारदाताई जाधव नगराध्यक्षा झाल्या होत्या. त्यावेळीही पालिकेतील नगरसेवकांना विधानसभेसाठी भोसले गटाने ‘टॅकल’ केले होते. नुकत्याच झालेल्या २०१४ च्या पालिका निवडणुकीत सत्ताधारी जनशक्ती विरोधात भाजप अशी लढत झाली होती. त्यावेळी भाजपने नगराध्यक्षांसह काही जागांवर विजय मिळवला. अल्पमतात सत्तेवर आलेले भाजप अन्‌ विरोधात असूनही बहुमतात आलेली जनशक्ती अशी त्रांगडी स्थिती पालिकेत झाली. 

राजकारणात कोणीही कोणाचा चिरकाळ वैरी नसतो, या उक्तीची प्रचिती पालिकेच्या राजकारणात निकालानंतर अवघ्या महिनाभरात आली. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून निवडून आलेली जनशक्ती भाजपच्या वळचणीला जावून बसली. त्यामागची खेळी करण्यासाठी भाजपचे नेते अतुल भोसले सक्रिय होते. त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा मार्ग सोयीस्कर होण्यासाठी त्यांनी फोडाफोडीच्या राजकारणाला गती दिली. 

अर्थात भोसले गट पालिकेतील जनशक्तीला बळकटी देत असल्याची चर्चा पडद्यामागची होती. ती कालच्या सभेत दस्तुरखुद्द अतुल भोसले यांनी खुलासा केल्याने आता ती उघड झाले आहे. कऱ्हाडच्या पालिकेतील राजकारणातील ‘ओपन सिक्रेट’ सूर्यप्रकाशाइतके स्वच्छपणे पुढे आले आहे.

कऱ्हाडच्या पालिकेत काय झाले, सगळ्यांना माहिती आहे. माजी मुख्यमंत्र्यांसोबत कऱ्हाडला सोबत होते, ते आता आमच्यासोबत आहेत. कऱ्हाडची पालिका मोकळी केली आहे. आता मलकापूरही मोकळी करणार आहोत, असे थेट आव्हान अतुल भोसले यांनी आमदार चव्हाण यांना भाषणातून दिले आहे. त्यामुळे मलकापूरच्या निवडणुकीच्या निमित्ताने होणारे आरोप-प्रत्यारोपाचे थेट पडसाद कऱ्हाडच्या राजकारणावरही होणार असल्याचे संकेतही यानिमित्ताने मिळाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com