तरुणाईला बळ देण्याचा नेहमीच प्रयत्न

तरुणाईला बळ देण्याचा नेहमीच प्रयत्न

प्रकाश आवाडे क्रीडा ॲकॅडमीच्या माध्यमातून सुरू झालेल्या विविध क्षेत्रांतील कार्याने या संघटनेने मोठी झेप घेतली आहे. या ॲकॅडमीच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत शहरापासून जिल्ह्यापर्यंतच्या अनेक खेळाडूंनी झेप घेतली आहे. एवढेच नव्हे, तर या तरुणांना शासकीय नोकरीचा लाभ होण्यासाठी मार्गदर्शनापासून नव्या पिढीला स्वत:च्या उद्योग व्यवसायात भरारी घेता यावी यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य राहुल प्रकाश आवाडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

श्री. आवाडे म्हणाले, ‘‘राजकारणातून समाजकारण हे ब्रीद वाक्‍य घेऊनच सार्वजनिक क्षेत्रात कार्य सुरू केले. विशेषत: प्रकाश आवाडे क्रीडा ॲकॅडमीची वीस वर्षांपूर्वी स्थापना झाली. या माध्यमातून अनेक खेळांना प्रोत्साहन दिले. राज्यस्तरीय ते राष्ट्रीय पातळीपर्यंतच्या अनेक स्पर्धा या भागात घेतल्या. कबड्डी, खो-खो, कुस्ती अशा भारतीय खेळांना अधिक महत्त्व दिले. कुस्तीच्या माध्यमातून या भागातील खेळाडू महाराष्ट्र केसरीपासून हिंदकेसरीपर्यंत पोचावेत, अशा पद्धतीने मार्गदर्शन झाले.  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळविलेल्या खेळाडूंना शासकीय नोकरी मिळावी यासाठी त्यांना मार्गदर्शन सातत्याने करण्यात आले. त्यामुळेच रेल्वेपासून एअर इंडियापर्यंत आणि प्रशासकीय खात्यापासून संरक्षण खात्यापर्यंत या परिसरातील खेळाडूंची निवड झाली.’’

‘‘खेळात विशेष चमक दाखविणाऱ्या अनेक खेळाडूंना आर्थिक समस्येशी सामना करावा लागतो. अशा वेळी अशा सर्व खेळाडूंना आर्थिक मदतीपासून त्यांना सहकारी संस्थांच्या माध्यमातून शक्‍य असेल तेवढे मानधन देण्याचा प्रयत्न केला आहे. खेळाबरोबरच सांस्कृतिक व अन्य क्षेत्रात यश मिळवावे यासाठी इचलकरंजी फेिस्टव्हलच्या माध्यमातून कलाकारांना व्यासपीठ दिले आहे. युवती आणि महिला स्वत:च्या पायांवर उभ्या राहाव्यात यासाठी त्यांना गारमेंट प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. असे प्रशिक्षण घेतलेल्या हजारो युवती आणि महिला आज आत्मसन्मानाने स्वत:च्या पायांवर उभ्या आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी एकत्र यावे व त्यातून स्वयंरोजगार करावा यासाठीही विशेष प्रयत्न केले.’’

‘‘आज शेतीही समृद्ध होत आहे. यात तरुणाईचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न झाले. ऊसपट्टा असलेल्या या परिसरात ऊसतोडणी कामगारांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा वेळी पाच ते सहा युवकांनी एकत्र येऊन ऊसतोडणी यंत्रसामुग्री खरेदी केली आहे. वीसहून अधिक गट तयार होऊन युवक या उद्योगात भरारी घेत आहेत. आज या परिसरात ऊस वाहतुकीसाठीही वाहनांची गरज आहे. नव्या पिढीला मार्गदर्शन करून त्यांना या क्षेत्रात रोजगार दिला आहे.’’

विविध क्षेत्रांत प्रोत्साहन
शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भरारी घ्यावी यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. स्नेहबंध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गरजू व हुशार विद्यार्थ्यांना पाठबळ दिले. यातून शेकडो विद्यार्थी आज प्रशासकीय सेवेत रुजू झाले आहेत. शिक्षण, क्रीडा, शेती, उद्योग अशा क्षेत्रांत काम करून काँग्रेसचे जाळे या भागात अधिक भक्कम झाल्याचे राहुल आवाडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com