आमदार अनिल बाबर खूश; जिल्हाप्रमुख विभुते नाखूश

आमदार अनिल बाबर खूश; जिल्हाप्रमुख विभुते नाखूश

सांगली - शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती व्हावी, ही आमदार अनिल बाबर यांची सुरवातीपासून इच्छा होती. त्यामुळे आमदार या निर्णयावर खूश आहेत. मात्र, जिल्हाप्रमुख संजय विभुते हे नाराज असल्याचे समजते. अर्थात, जिल्ह्यात शिवसेनेचा खानापूर हाच एकमेव मोठा गड आहे. तेथे बाबर समर्थकांनी युतीचे जोरदार स्वागत  केले. त्यामुळे येथे भाजपचा जीव भांड्यात पडला आहे. 

सांगली जिल्ह्यात अनिल बाबर यांच्या रूपाने शिवसेनेचा थेट आमदार गेल्या वेळी पहिल्यांदाच मिळाला. शिवसेना येथे निवडणुका लढवत असे पण जिंकण्याचे मेरिट  कोठेही नसे. नुकत्याच झालेल्या महापालिका  निवडणुकीत शिवसेनेला अपयश आले. शहरी पक्ष अशी ख्याती असूनही सांगली-मिरजेतही अस्तित्व आंदोलने-मोर्चापुरते आहे. शिवसेना येथे वाढावी म्हणून संपर्क प्रमुख नितीन बाणुगडे-पाटील यांना आता कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष पद दिले गेले.

अर्थात सांगली जिल्ह्यात चार वर्षांत शिवसेनेने कमावले काय, या प्रश्‍नाचे उत्तर महापालिकेच्या निकालाहून वेगळे काहीच मिळत नाही. शिवसेना- भाजप नेत्यांत येथे वादही फारसे नसले तरी जिल्हाप्रमुख विभुते यांनी नुकतेच खासदार संजय पाटील यांच्यावर शिवसेनेच्या कामांचे श्रेय लाटतात, असा  आरोप केला. श्री. बाबर आणि संजय पाटील असा संघर्ष होता. तो दोघांनीही पुढाकार घेऊन मिटवला. 

लोकसभा लढवण्यासाठी जिल्ह्यात सर्व तालुक्‍यांत जाऊन संघटनेची बांधणी केली. युतीमुळे आशेवर पाणी फिरल्याने श्री. विभूते नाराज आहोत. पण, पक्ष आदेश देईल, त्याप्रमाणे काम करू, असेही त्यांनी सांगितले. सध्या भगवा सप्ताहानिमित्त पंचायत समिती निहाय जिल्हाभर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेऊन त्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवू, असेही श्री. विभूते म्हणाले. 

दरम्यान, सरसकट जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांना  युतीला विरोध दिसत नाही, हे देखील आमदार बाबर  आणि त्यांच्या समर्थकांनी घेतलेल्या भूमिकेतून स्पष्ट होते. जिल्ह्यात एकूण आठ जागा आहेत त्यापैकी सध्या चार विद्यमान आमदार भाजपचे आहेत, तर एक शिवसेनेचा आहे. सांगली, मिरज, जत, शिराळा या जागा भाजपकडे आहेत तर खानापूर, पलूस-कडेगाव, इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ या जागा  शिवसेनेकडे आहेत. युतीमुळे अर्थात जिल्ह्यात भाजपला फायदा मिळू शकतो.’’ 

युती अपेक्षित होती. आगामी लोकसभा-विधानसभेसाठी ताकद वाढणार आहे. नक्‍कीच पुन्हा केंद्रात व राज्यात युतीचेच सरकार येईल. काही पदाधिकाऱ्यांनी केलेला विरोध त्यांचे वैयक्‍तिक मत आहे. 
- अनिल बाबर,
आमदार, खानापूर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com