पुणे - संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे बुधवारी शहरात आगमन होत आहे. त्यानिमित्त लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. विशेषतः अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यादृष्टीने पोलिसांनी नियोजन केले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दोन्ही पालख्या व लाखो वारकरी शहरात येतील. त्यांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे व त्यांचे कार्यकर्ते पालखी सोहळ्यात तलवारी घेऊन सहभागी झाले होते. यंदा पालखी सोहळ्यात कोणीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, यावर पोलिसांनी विशेष लक्ष दिले आहे.
विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे म्हणाले, 'पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरेशी काळजी घेतली आहे. याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याचीही विशेष दक्षता घेण्यात आली आहे.''
गुन्हे शाखेचा "मास्टर प्लॅन'
गुन्हे शाखेकडून तीन स्तरांमध्ये पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. त्यामध्ये गैरप्रकार करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असेल. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांच्या देखरेखीखाली "मास्टर प्लॅन' तयार केला आहे. त्यामध्ये वारकऱ्यांची सुरक्षितता, सोनसाखळी चोरी व महिलांची छेडछाड रोखण्यास प्राधान्य दिले आहे.
* सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी आठ पथके
* महिलांच्या सुरक्षेसाठी तीन दामिनी पथके
* महिला, तरुणींच्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी चार पथके
* हरवलेल्यांसाठी शिवाजीनगर व पालखी मुक्कामस्थळी दोन संपर्क केंद्रे
|