पुणे - पावसाच्या अचूक अंदाजापाठोपाठ उष्णतेच्या आणि थंडीच्या लाटेचा वेध घेणारे हवामान खाते आता डेंगी आणि हिवतापाच्या (मलेरिया) उद्रेकाची माहिती देणार आहे. यंदाच्या मॉन्सूनमध्ये प्रथमच हा अंदाज वर्तविण्यासाठी हवामान खात्याची यंत्रणा सज्ज झाली आहे.
पावसाची नोंद करणे आणि कमाल-किमान तापमान नोंदवणे इतकेच काम पूर्वी हवामान खाते करत होते; पण गेल्या दहा वर्षांपासून हवामान खात्याने स्वतःमध्ये वेगाने बदल केला आहे. अद्ययावत तंत्रज्ञान, अंदाज वर्तविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रारूपांच्या निकषांमध्ये कालसापेक्ष केलेले बदल यातून पावसाचा अचूक अंदाज वर्तविण्यात हवामान खात्याला यश येत आहे. प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याच्या प्रवाह (एल निनो) सक्रिय असेल, असा अंदाज 2016 मध्ये संपूर्ण जगातील हवामान खाते देत होते; पण हा "एल निनो' सक्रिय नसेल, असे खात्रीपूर्वक सांगणाऱ्या भारतीय हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरला.
त्यानंतर केवळ पावसाच्या अंदाज वर्तविण्यापुरते न थांबता उष्णतेची आणि पाठोपाठ थंडीच्या लाटेचाही वेध घेण्यात हवामान खात्याला यश मिळाले. त्यातील अचूकता वाढली. त्यामुळे आता पुढचे पाऊल टाकत डेंगी आणि हिवतापाच्या उद्रेकाचा अंदाज देणार आहे. यंदाच्या पावसाळ्यापासून त्याची सुरवात होईल. त्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. येत्या जूनच्यादरम्यान त्याचा पहिला अंदाज हवामान खाते देणार आहे, असे भारतीय हवामान खात्याचे महासंचालक के. जे. रमेश यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
डेंगी आणि हिवताप या कीटकजन्य आजारांच्या उद्रेकासाठी हवामान हा महत्त्वाचा घटक असतो. हवामानातील आर्द्रता वाढते, तापमानातील उबदारपणा वाढतो, असे वातावरण डासांची पैदास होण्यासाठी पोषक ठरते. त्यातून आता हवामान खाते अशी डासांची पैदास वाढण्यासाठी कधी आणि कुठे असे पोषक वातावरण असेल, याचा अंदाज देणार आहे. त्या आधारावर तेथील सार्वजनिक आरोग्य खात्याला डासांची पैदास रोखण्यासाठी योग्य ते उपाय करता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
के. जे. रमेश, महासंचालक, भारतीय हवामान खाते
|