Video : ‘बीस साल बाद’सुद्धा न्यायाची प्रतीक्षा..!

Jogindersinh
Jogindersinh

दहशतवादी हल्ल्यात कुटुंब गमावलेल्या जोगिंदरसिंहची व्यथा
पुणे - ‘एके-५६’, मशिनगन, एसएलआर अशी अत्याधुनिक शस्त्रे घेऊन तब्बल चाळीसेक दहशतवाद्यांनी नागरी वस्तीतील एका कुटुंबावर हल्ला चढवला. कुटुंबातील सदस्यांनी या हल्ल्याचा कडवा प्रतिकार केला. तीन दहशतवाद्यांना ठार केले. पण, या शूर कुटुंबातील तब्बल १५ जण या घटनेत धारातीर्थी पडले. जम्मूमधील दोडा जिल्ह्यातील लेहोटा या गावात घडलेल्या या घटनेला उद्या (ता. १९) २० वर्षे पूर्ण होत आहेत. आजही या हुतात्म्यांचे बचावलेले कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.

पुण्याच्या सरहद संस्थेत एम. कॉम. करणारा जोगिंदरसिंह ऊर्फ जोगी हा या हल्ल्यातून बचावलेला तरुण. त्या वेळी चार वर्षांचा असलेल्या जोगीला त्याच्या थोरल्या बहिणीने या हल्ल्यातून वाचविले. त्यानंतर अनाथ आश्रम ते पुण्यातील सरहद संस्था, असा संघर्षमय प्रवास करणारा जोगी आज चांगल्या करिअरच्या शोधात आहे. 

स्वत:च्या नोकरीसोबतच आपल्या कुटुंबातील वाचलेल्या सदस्यांना मदत मिळावी म्हणून जोगी गेली अनेक वर्षे सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहे. अगदी मंत्री, राज्यपाल, पंतप्रधान आदींनी आश्वासने देऊनही त्याला आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळू शकलेला नाही. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी धारातीर्थी पडलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यांनी दिलेल्या आश्वासनांचाही संबंधित यंत्रणांना विसर पडला आहे. विशेष म्हणजे, हे कुटुंब दहशतवादी कारवायांविरोधात भारतीय लष्कराला मदत करणाऱ्या ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य होते.

नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या जोगीला आता असे करिअर करायचे आहे, की ज्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी करता येईल. दहशतवाद संपून काश्‍मीरमध्ये शांतता नांदावी, अशी अपेक्षा त्याने यानिमित्ताने ‘सकाळ’कडे व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com