बिबटे पकडण्याचा ‘जुन्नर पॅटर्न’ स्वीकारा

Shivajirao-Adhalrao
Shivajirao-Adhalrao

शिक्रापूर - ‘‘एकाही बिबट्याला जखमी वा दुखापत न करता एका वर्षात १०८ बिबटे जेरबंद केलेल्या बिबट्या पकडण्याच्या ‘जुन्नर पॅटर्न’ला आता तरी स्वीकारा,’’ अशा मागणीचे पत्र खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना पाठविले आहे.
यवतमाळची ‘टी-१’ वाघीण ‘अवनी’ हिला नरभक्षक असल्याच्या कारणाने ठार मारल्याचे प्रकरण देश पातळीवर गाजत आहे. अशा नरभक्षक वाघ- वाघिणीला जिवंत पकडण्याबाबत सन २००३-०४ च्या दरम्यान जुन्नर तालुक्‍यातील बिबट्यांचा बंदोबस्त कसा केला गेला आणि तो देशभरात कसा अनुकरणीय आहे, याबाबत आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस व मनेका गांधी यांना पत्र पाठविले. 

या पत्रात त्यांनी म्हटले आहे, की सन २००३-१४ या एकाच वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात केवळ जुन्नर तालुक्‍यात ११ जणांना आपला जीव गमवावा लागला. याच गंभीर परिस्थितीत सन २००३ मध्ये या भागात बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश पोलिस व वनखात्याला देण्यात आले होते. त्यासाठी सशस्त्र पथकेदेखील दाखल झाली होती. मात्र तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमंत गायकवाड, वैभव भालेराव, बी. टी. हगवणे, संजय कडू व त्यांच्या सर्व वन कर्मचारी- अधिकाऱ्यांनी बिबट्या पकडण्यासाठीचे काही वेगळ्या धाटणीचे पिंजरे तयार करून बिबटे पकडण्याची वेगळी पद्धत अमलात आणली. स्थानिक लोकांचा सहभाग, त्यांचे सल्ले आणि प्रत्यक्ष कारवाईत त्यांचा सहभाग, असे या कामगिरीचे स्वरूप होते. याच कारणाने बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश असताना वनखात्याच्या याच कार्यपद्धतीला पुढे ‘जुन्नर पॅटर्न’ संबोधले. या पॅटर्नमुळे त्या एकाच वर्षात १०८ बिबटे पिंजऱ्यात सुरक्षित पकडले होते. यातील ६३ बिबटे प्रादेशिक स्थलांतर योजनेअंतर्गत चांदोली, कोयना, दाजीपूर, बोरिवली येथील अभयारण्यात सोडण्यात आले होते. या कामगिरीची दखल नॅशनल जिऑग्राफिक वाहिनीसह लिम्का बुक रेकॉर्डमध्येही नोंदली गेली. या पुढे कुणाही वाघ- वाघिणीच्या नशिबी ‘अवनी’सारखे दुर्दैव मृत्यू येऊ नये, यासाठी बिबट्यांना पकडण्याचा ‘जुन्नर पॅटर्न’ संपूर्ण देशभर लागू करावा.

बिबट्यांचा त्रास हा आता राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय प्रश्‍न झाला आहे. त्यामुळे याबाबत सर्वंकष ठोस धोरण बनवायला हवे. ‘जुन्नर पॅटर्न’सारखा पर्याय देशभर राबवावा आणि बिबट्यांसह देशातील नागरिकही सुरक्षित राहावे, अशा आशयाची मागणी आपण येत्या लोकसभा अधिवेशनात करणार आहे. त्यासाठी मनेका गांधी यांना भेटून याबाबत बोलणार आहे.
 - शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com