गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा! (अरविंद जगताप)

arvind jagtap
arvind jagtap

अनेक नाटकं, चित्रपटांच्या निर्मितीची प्रक्रिया रंजक असते. ती कलाकृती तयार होत असताना अनेक गोष्टी जुळून येत असतात. किती तरी चांगले-वाईट अनुभव येत असतात. ही सगळी शिदोरी घेऊन येत आहेत नामांकित चित्रकमी-रंगकर्मी. दर महिन्याला ते "चित्रसंवाद' साधतील आणि पडद्यामागच्या घडामोडी उलगडून दाखवतील. जानेवारीचे मानकरी आहेत प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप.

कार्यकर्ते प्रामाणिक असले, की कायम बेरोजगार राहतात. या कार्यकर्त्यांपैकी कुणी आपल्या नेत्याला धडा का शिकवत नाही? उघड्या डोळ्याने भ्रष्टाचार पाहतो तरी शांत का बसतो, असा प्रश्न पडायचा. आपल्या साहेबाला इंगा दाखवणारा कार्यकर्ता असला पाहिजे, असं राहून राहून वाटायचं. तसा स्मार्ट कार्यकर्ता सगळीकडे असतो; पण फार यशस्वी झालेला बघण्यात आला नाही. हाच विषय मनात होता. तोच "गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' चित्रपटात नारायण वाघच्या रूपात उभा केला. एका कार्यकर्त्यानं नेत्याला धडा शिकवावा अशी इच्छा मनात होती- ती या गोष्टीत पूर्ण झाली. अजूनही कार्यकर्त्याचं जग पूर्ण मांडता आलं असं वाटत नाही. पुन्हा नव्यानं लिहितोय या विषयावर.

खरं तर दहावी-अकरावीत लिहायला लागलो, तेव्हा वर्तमानपत्रांत आपलं नाव यावं एवढंच स्वप्न होतं. अजूनही वर्तमानपत्रात काही छापून आलं, की भारी वाटतं. पहिल्यापासून पत्रकार व्हायचं स्वप्न होतं. ते काही होता आलं नाही; पण पत्रकारासारखं जगायची सवय लागली. फिरायचं, लोकांशी बोलायचं, वेगळा अँगल शोधायचा प्रयत्न करायचा. ही सवय तशी खूप कामी आली. सुरवातीला एका दैनिकासाठी लिहायचो औरंगाबादला असताना. जयदेव डोळे सरांनी लिहायला लावलं. त्यांना वाटलं, मला शिस्त लागेल; पण मी त्या काळात एकदा चक्क सिल्क स्मिताच्या चित्रपटाचं परीक्षण लिहिलं होतं. एकूण त्यांच्या लक्षात आलं, की ही "केस' सुधारणार नाही. पुढे नाटक, सिनेमावर लिहिलेलं वाचून डॉ. दिलीप घारे आणि यशवंत देशमुख यांनी नाटकात नेलं. त्यांच्या डोक्‍यालाही खूप ताप झाला होता माझ्यामुळं. माझ्या एकांकिकेवर एकदा कोर्टात केस झाली. एका एकाकिकेमुळे मोर्चा निघाला. एक एकांकिका लोकांनी संतापून बंद पाडली. असं सगळं प्रक्षोभक वगैरे म्हणतात तसं काही काळ झालं. नेमक्‍या त्याच काळात मकरंद अनासपुरेनं माझी एक एकांकिका बघितली. त्यानं महेश मांजरेकर यांचा एक चित्रपट लिहायला बोलवलं थेट; पण ते जमलं नाही. मुंबईत थांबायला जी चिकाटी लागते ती नव्हती. औरंगाबादमध्ये एकांकिका सुरू असायच्या. तिथूनच ये-जा करून निशिगंधा वाडच्या ओळखीनं मालिका लिहू लागलो. मकरंदची भेट व्हायची. चित्रपटाचा विषय निघायचा; पण आपल्याला जमणार नाही असं वाटायचं. त्या संदर्भात काही ज्ञान नव्हतं. पटकथा कशाशी खातात काही माहीत नव्हतं. असा बराच काळ गेला. काही कळत नसताना एक-दोन चित्रपट लिहिले.... आणि एक दिवस मकरंदचा फोन आला. ""मी आता चित्रपटाची निर्मिती करणार आहे,'' म्हणाला. तो सयाजी शिंदे, नागेश भोसले मिळून चित्रपट करणार होते. "गोष्ट छोटी डोंगराएवढी'चा विषय त्यांच्या डोक्‍यात होता; पण सोबत आणखी एक विनोदी चित्रपट करायचा होता. मकरंदनं मला ""काहीतरी चांगला विनोदी विषय घेऊन पुण्याला ये,'' असं सांगितलं. सयाजी शिंदे हैदराबादहून येणार होते. मी ""ठीक आहे,'' म्हणालो; पण मीटिंगच्या दिवसापर्यंत काहीच लिहून झालं नाही.

पुण्यातल्या एका हॉटेलात सयाजी शिंदे, मकरंद आणि नागेश भोसले मी गोष्ट ऐकवणार म्हणून बसले. मी लिहिलं काहीच नव्हतं. उगीच कागदाकडं बघत बळंच काही तरी वाचू लागलो. मकरंदनं सयाजी शिंदे आणि नागेश भोसले यांना सांगितलं होतं ः ""अरविंद खूप चांगलं लिहितो. विनोदीपण.'' मात्र, मी जे वाचत होतो, ते ऐकून दोघांच्या चेहऱ्यावरची रेषसुद्धा हलत नव्हती. आपली चक्कर वाया गेली म्हणून सयाजीराव वैतागले होते; पण ही गोष्ट माझ्यापेक्षा मकरंदच्याच जिव्हारी लागली. रात्री आम्ही मकरंद थांबला होता त्या स्वरूप हॉटेलला गेलो. मकरंदनं तिथल्या एका मित्राला सांगितलं ः ""याच्याकडं बघा. याला हॉटेलमध्ये काय पाहिजे ते द्या; पण इथून बाहेर पडू द्यायचं नाही.'' स्वरूपच्या खोलीत मला कैद करून टाकलं होतं. लिहिण्याशिवाय पर्याय नव्हता. मकरंद दिवसभर शूटिंगला जाणार आणि रात्री आल्यावर मी दिवसभरात काय लिहिलं ते वाचणार असं ठरलं. खरं तर "गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा'ची "गल्ली'सुद्धा तोपर्यंत डोक्‍यात नव्हती. फक्त राजकीय डावपेचांची गोष्ट असली पाहिजे, असं आम्ही बोलत होतो. माझा आजही विश्वास बसत नाही; पण दोन दिवसांत या चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट मी लिहून पूर्ण केला होता. तोपर्यंत ऐकलेल्या राजकीय गोष्टी, कॉलेजपासून असलेली गप्पांची सवय, पेपर मन लावून वाचणं या गोष्टी खूप कामी येतात हे त्यावेळी लक्षात आलं.

"गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' हा चित्रपट "गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटासोबत एक विनोदी चित्रपट करूया असं म्हणून सुरू झाला; पण पहिला ड्राफ्ट वाचल्यावर सगळे एकदम चार्ज झाले. सयाजी शिंदेही तेव्हापासून मला लेखक समजायला लागले. "गल्लीत गोंधळ...' हा लहानपणापासून पाहिलेल्या, ऐकलेल्या राजकीय चढाओढीचा कोलाज होता. आमच्याकडं एका उमेदवारानं एक आणि दोन रुपयांच्या नोटा नेल्या होत्या अर्ज भरायला. चिल्लरचाही किस्सा ऐकला होता. "सोन्याची टोपी'चा विनोद आधीच होता. तो योग्य प्रसंगात वापरात आला. "गल्लीत गोंधळ'मधल्या नारायण वाघसारखे कित्येक कार्यकर्ते गावोगाव आहेत. मागं एकजण भेटला, तो म्हणाला ः ""मी "गल्लीत गोंधळ'मधला नारायण जसा भेटायला जायचं त्या नेत्याचे फोटो खिशात ठेवतो, तसा मी मोबाईलचं कव्हर वापरतो. आणखी एकजण माहीत आहे. तो ज्याला भेटायचंय त्याचा फोटो मोबाईलवर स्क्रीनसेव्हर म्हणून ठेवतो. स्टेजवर जाऊन नेत्यांच्या कानात "चहा आणू का साहेब?' असं विचारणारे नंतर तोच फोटो "साहेबांशी चर्चा करताना' असं लिहून फेसबुकवर टाकतात. असे असंख्य कार्यकर्ते पाहिलेले आहेत, जे आयुष्यभर गुलालाला "महाग' असतात. "गुलालाला महाग' म्हणजे ज्यांच्या अंगाला कधीच गुलाल लागला नाही, जे विजयी झाले नाहीत. अशा कार्यकर्त्यांना ते अडगळीत पडले की काय म्हणतात माहितीय? "ते कवाच बाद झालं! त्याचं खत झालं आसल आता.' म्हणजे पुरली गेलेली वस्तू कुजून काही काळानं खत होतं तसं. आणखी एक वाक्‍य अशा स्पर्धेतून बाद झालेल्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत वापरतात ः "त्याचं काय राहिलंय आता? त्याच्यावर पार हारळी उगवली आसल.'

राजकारणात मला नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांचं नेहमी कुतूहल वाटत आलंय. कित्येक कार्यकर्ते नेत्यासाठी अंगावर केस घेऊन तुरुंगात गेलेले पाहिले. कित्येक कार्यकर्ते कायम सतरंजी उचलायलाच राहिले. घराणेशाहीमुळं कार्यकर्त्याला फारशी संधी मिळत नाही. वडिलांच्या पाया पडायचं- मग पोराच्याही पाया पडायचं, हेच त्याच्या नशिबी येतं. नेत्यानं पक्षांतर केलं, की सगळ्यात जास्त हाल होतात ते कार्यकर्त्याचे. झेंडे बदलणे सोपं असतं; पण माणसाला बदलावं लागणं खूप त्रासदायक असतं. जिभेला सवय पडलेली असते. कित्येक कार्यकर्ते घोषणा देताना चुकतात. आधीच्या पक्षाचं नाव घेतात. गावोगावच्या लोकांनी प्रचाराला पैसे देऊन आमदार निवडून दिलेला मी पाहिलाय. दुर्दैवानं त्या आमदारानं लोकांचे पैसे परत देणं सोडा, उलट लोकांचेच पैसे खायला सुरुवात केली. मागं त्याला रस्त्यात एकटाच पायी चालताना पाहिलं. बरं वाटलं. एक कार्यकर्ता एकदम भारी आठवतो. त्याच्या साहेबांची एक खास सवय आहे. त्यांना गाडी रस्त्यात बंद पडली, की अजिबात आवडत नाही. एकदा साहेबांनी गाडी बंद पडल्यावर रस्त्यातच स्वतःच्या गाडीला लाथा घातल्या. गाडीला काही झालं नव्हतं; पण नेत्याला छोटं फ्रॅक्‍चर झालं. तर साहेबांचा स्वभाव माहीत असलेल्या कार्यकर्त्यानं एकदा ठरवून त्यांची गाडी रस्त्यात तीनदा बंद पडायला लावली. साहेब एवढे भडकले, की त्यांनी गाडीची किल्ली काढून घेतली आणि त्या कार्यकर्त्याच्या अंगावर फेकली. म्हणाले ः ""तू दुरुस्त कर आणि वापर. माझ्यासमोर आणू नको ही गाडी.'' कार्यकर्ता आजही ती गाडी थाटात वापरतो.

कार्यकर्ते एकापेक्षा एक नमुने असतात. साहेबांनी ठेवलेल्या महिलेबद्दलसुद्धा त्यांची निष्ठा असते. साहेबांचा वाढदिवस असला, की काय करू आणि काय नाही असं होतं त्यांना. साहेबाच्या वाढदिवसाला एका कार्यकर्त्यानं रक्तदान शिबिर भरवलं. हजार बाटल्या रक्त जमवायचा संकल्प केला. दिवसभर हजार लोक मंडपातल्या पलंगावर झोपून गेले; पण रक्त पंधराच लोकांनी दिलं होतं. बाकीचे नुसते फोटो काढून गेले. एक कार्यकर्ता एवढा भारी आहे, की त्यानं त्याचे साहेब मंत्री असताना एका महत्त्वाच्या चौकाला स्वतःच्या वडलांचं नाव दिलं. अजूनही लोकांना प्रश्न पडतो, की चौकाला ज्याचं नाव आहे तो माणूस नेमका आहे कोण? एका गावातल्या पोरानं आमदाराला पेपरमध्ये जाहिरात देऊन शुभेच्छा देण्यासाठी वडिलांची सोन्याची साखळी विकली. सत्कारासाठी एका साहेबांची गाडी गावच्या रस्त्यावर अडवायच्या नादात एकजण त्या साहेबाच्याच गाडीखाली आला. अशा या कार्यकर्त्याला मान देणारे, काम देणारे फार कमी नेते उरलेत. एका ग्रामपंचायत निवडणुकीत पडलेल्या उमेदवारानं चार भाडोत्री गुंड सोबत घेऊन गावातल्या सगळ्या लोकांना वाटलेले पैसे त्यांच्याकडून परत घेतले होते. नेते या थराला जातात. कार्यकर्ते प्रामाणिक असले, की कायम बेरोजगार राहतात. या कार्यकर्त्यांपैकी कुणी आपल्या नेत्याला धडा का शिकवत नाही? उघड्या डोळ्याने भ्रष्टाचार पाहतो तरी शांत का बसतो हा प्रश्न पडायचा. आपल्या साहेबाला इंगा दाखवणारा कार्यकर्ता असला पाहिजे, असं राहून राहून वाटायचं. तसा स्मार्ट कार्यकर्ता सगळीकडे असतो; पण फार यशस्वी झालेला बघण्यात आला नाही. हाच विषय मनात होता. तोच "गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' चित्रपटात नारायण वाघच्या रूपात उभा केला. एका कार्यकर्त्यानं नेत्याला धडा शिकवावा अशी इच्छा मनात होती- ती या गोष्टीत पूर्ण झाली. अजूनही कार्यकर्त्याचं जग पूर्ण मांडता आलं असं वाटत नाही. पुन्हा नव्यानं लिहितोय या विषयावर. बघू. हिमालयाच्या मदतीला धावून जाणारा सह्याद्री म्हणायचं आणि मुख्यमंत्री मात्र दिल्लीच्या आदेशानं निवडायचा हे जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत "गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा'सारखे विषय सुचत राहणार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com