#WednesdayMotivation : ‘व्यवसाय’ स्वस्तातील जलसंचयाचा (व्हिडिओ)

Maithili-Appalwar
Maithili-Appalwar

बिझनेस वुमन - मैथिली अप्पलवार, संस्थापक, अवाना
पाणी हेच जीवन आहे, असे आपण प्रत्येक जण म्हणतो. शेतकऱ्यांचे आयुष्य पाण्याशीच निगडित असते. पाण्याशिवाय शेती अशक्य आहे. याचाच विचार इंडस्ट्रीज लिकरत एम्बी लिमिटेडचे एक युनिट असलेल्या ‘अवाना’च्या संस्थापक मैथिली अप्पलवार यांनी केला व भारतातील शेतकऱ्यांना पाण्याच्या समस्येपासून मुक्त करण्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला.

अवानाने ‘जलसंचय’ प्रकल्पाच्या माध्यमातून किफायतशीर, सर्वसमावेशक जलसंवर्धन उपाययोजना शोधून काढली आहे. शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोचून मैथिली यांनी पाणी साठवून आणि त्याचा गरजेच्या वेळी योग्य प्रकारे वापर करण्यापर्यंतचे शिक्षण दिले आहे. 

मैथिली यांनी शेतकऱ्यांना शेततळ्यात वापरले जाणारे पॉलिमर अस्तर, अर्थात चांगल्या दर्जाचे कापड पुरवण्यास सुरवात केली. त्यांनी सुरू केलेल्या जलसंचयाच्या प्रकल्पासाठी दरवर्षी फक्त १ पैसा प्रतिलिटर या दराने खर्च येतो. ही रक्कम पाणी साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या याच आकाराच्या सिमेंट टाकीच्या खर्चाच्या फक्त एकदशांश एवढीच आहे. अगदी गरीब शेतकऱ्यांना देखील याचा लाभ करून दिला असून, तीन वर्षांहूनही कमी कालावधीत मैथिली यांनी ५००० शेतकऱ्यांसोबत भागीदारीमध्ये २०० अब्ज लिटर पाण्याची बचत केली आहे. मैथिली म्हणाल्या, ‘‘कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर यशस्वी होण्याची क्षमता असलेल्या नावीन्यपूर्ण संकल्पना मला प्रभावित करतात. त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन तंत्रज्ञानासाठी खूप मोठी गुंतवणूक करणे आवश्यक नसते. फक्त गंभीर समस्येवर प्रभावी उपाय शोधणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांबरोबरच शहरातील किंवा ज्या ठिकाणी पाणी अडवून जिरवू शकतो, अशा प्रत्येक ठिकाणी सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी युवक व उत्साही लोकांनी मोठ्या संख्येने पुढे आले पाहिजे. गेल्या काही दिवसांत चेन्नईने गंभीर पाण्याच्या समस्येला तोंड दिले आहे.

देशातील ६० टक्क्यांहून अधिक भाग दुष्काळी आहे आणि येत्या काळात पाण्याची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. भारतात २०३०पर्यंत पाण्याची मागणी उपलब्ध पुरवठ्यापेक्षा दुपटीने वाढलेली असेल. यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की, प्रत्येकाने जागा असेल तिथे पाण्याची बचत, संवर्धन आणि पाण्याच्या भूस्तरामध्ये पुनःपुन्हा भर घालत राहणे आवश्यक आहे. या क्षेत्रात अजूनही महिलांचा मानसिक आणि प्रत्यक्ष सहभाग कमी आहे. महिलांचा सहभाग वाढल्यास येत्या काही वर्षांत कोणालाच पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही.’’

मैथिली शेतकऱ्यांना फक्त शेततळ्यांची निर्मिती करण्यासच मदत करत नाही, तर त्यांनी सर्वोत्तम जागतिक तंत्रज्ञान देखील विकसित केले आहे. तसेच, शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना बॅंकांकडून अर्थसाह्य मिळवण्यास मदत करतात. इंटरनेट-ऑफ-थिंग्ज (आयओटी) तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना शक्‍य तितक्‍या सर्वोत्कृष्ट पद्धतीने पाण्याचा वापर करण्यास उद्युक्त करतात. शिवाय जोडधंदा म्हणून आता मत्स्योत्पादनाकरिता उपयुक्त असे आधुनिक शेततळ्याचे कापड उपलब्ध करून देत आहेत.

(शब्दांकन - गौरव मुठे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com