दमानिया प्रकरण हे माझ्याविरुद्ध रचलेले षडयंत्र : एकनाथ खडसे 

दमानिया प्रकरण हे माझ्याविरुद्ध रचलेले षडयंत्र : एकनाथ खडसे 

जळगाव : माझ्याविरुद्ध खोटेनाटे आरोप झालेले अंजली दमानिया यांचे प्रकरण हे प्रत्यक्षात केवळ मला बदनाम करण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे. या मागे कोण आहे, हे राज्यातील जनतेला उघडपणे माहीत झाले आहे. या प्रकरणात मी दोषी असेल, तर आपल्यावर कारवाई करावी. अन्यथा आपल्याला निर्दोष जाहीर करावे, अशी सडेतोड भूमिका माजी महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी आज "सरकारनामा'च्या फेसबुक लाइव्ह मुलाखतीतून मांडली. 

"सकाळ' खानदेशचे निवासी संपादक राहुल रनाळकर यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधला. या दीर्घ मुलाखतीत 
श्री. खडसे म्हणाले, की माझ्यावरील आरोपांत तथ्य तर नाहीच, उलट अंजली दमानिया यांनी आपल्या नावे काढलेल्या साडेनऊ कोटी रुपयांच्या बनावट धनादेश प्रकरणी त्यांच्या अटकेबाबत शासन टाळाटाळ करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगूनही जर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यवाही करीत नसतील, तर याला काय म्हणायचे? उलट संबंधित तपासाधिकाऱ्याची बदली करून त्याचा छळ केला जातो, हे योग्य नाही. या सर्व प्रकरणांसह जनतेच्या प्रश्‍नांवर आपण सरकारला जाब विचारू, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

चाळीस वर्षे पक्ष वाढविण्यासाठी आम्ही निवडक नेत्यांनी रक्त आटवले. गेल्या निवडणुकीत आघाडीचा नाकर्तेपणा ताकदीने जनतेसमोर ठेवला. त्यासाठी नितीन गडकरी, गोपीनाथ मुंड, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह महाराष्ट्र पिंजून काढला. त्यामुळे राज्यात आमचे सरकार आले. पण, सरकार आणून मीच सरकारच्या बाहेर आहे. याबाबत माझ्यावर अन्याय झाला असला, तरी पक्ष सोडणार नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली. 

प्रश्‍न : उत्तर महाराष्ट्रातील विकासपुरुष आणि लोकनेते म्हणून आपणांस पुन्हा मंत्रिपदी पाहू शकतो का? 
श्री. खडसे : अडीच वर्षांपासून मी मंत्रिमंडळाबाहेर आहे. मला मंत्री करायचे की नाही, हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. माझ्याबाबत पक्ष काहीतरी विचार करीत असेल, त्याबद्दल पक्षनेतृत्वच माहिती देऊ शकेल. यासंदर्भात जो काही निर्णय घ्यायचा, तो मी ठरवू शकत नाही. पण, माझी आतापर्यंतची मेहनत, तपश्‍चर्या वाया जाणार नाही हे नक्की. 

प्रश्‍न : आपल्या पक्षांतराबाबतही चर्चा उठत असतात? 
एकनाथ खडसे : मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. पक्षाची 40 वर्षे सेवा केली, हा पक्ष मी वाढविला आणि या 40 वर्षांच्या तपश्‍चर्येनंतर मी पक्ष सोडेल, हे शक्‍य नाही. तसा विचारही मी करू शकत नाही. मात्र, मी अनेक वर्षे विरोधकाच्या भूमिकेत विधिमंडळात काम केले आहे. यापुढेही जनतेच्या प्रश्‍नांवर विधिमंडळात मी आवाज उठवतच राहणार आहे. यात पक्षबदलाचा काहीही संबंध नाही. 

प्रश्‍न : अंजली दमानियांच्या आरोपांबाबत आपली भूमिका काय? 
श्री. खडसे : दमानिया प्रकरण आपोआप आलेले नाही, ते माझ्यामागे लावून दिलेले किटाळ आहे. त्यावेळी झालेल्या सर्व आरोपांची चौकशी पूर्ण झाली असून, त्यात कोणतेही तथ्य आढळून आलेले नाही. त्यामुळे ही प्रकरणे म्हणजे केवळ नाथाभाऊला बदनाम करण्याचा, नालायक ठरविण्याचा प्रकार होता. जर या प्रकरणांमध्ये मी दोषी असेल तर कारवाई करावी; अन्यथा मी निर्दोष असल्याचे जाहीर करावे, अशी आजही आपली भूमिका आहे. उलट अंजली दमानिया यांना अटक करण्याची कारवाई शासन करीत नसल्याचा आपला आरोप आहे. दमानिया यांनी आपल्या नावाने साडेनऊ कोटी रुपयांचे बनावट धनादेश काढले, ते बनावट असल्याचे सिद्ध झाले, जिल्हा पोलिस अधीक्षकांनीही ते बनावट असल्याचा अहवाल दिला. या प्रकरणी तक्रार केली असता गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्याबाबत आपण न्यायालयात गेलो. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला, तेव्हा गुन्हा दाखल झाला. मात्र, आजही दमानिया यांना अटक झालेली नाही. तपासाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे परवानगी मागितली तर त्यांची बदली केली जाते, त्यांना छळले जात. जर आरोपी आहे, तर त्या आरोपीला अटक करण्यासाठी परवानगी मागावी का लागते? याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना वारंवार सांगितले. मुख्यमंत्री म्हणतात "मी जिल्हा पोलिस अधीक्षकांना सांगितले आहे.' मग जिल्हा पोलिस अधीक्षक अटकेची कारवाई का करीत नाही? ते मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाहीत, ही भूमिका योग्य आहे असे आपल्याला वाटत नाही. याबाबत आपण विधानसभेत न्याय मागणार आहोत. 

प्रश्‍न : 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपणच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होता, त्याबद्दल काय? 
श्री. खडसे : सर्वसाधारणपणे विरोधी पक्षनेत्याकडेच मुख्यमंत्रिपदाचा दावेदार म्हणून पाहिले जाते. तसे मानणे आणि तशी अपेक्षा ठेवण्यात काही गैर नाही. मात्र, त्यावेळी पक्षाने घेतलेला निर्णय आपण स्वीकारला. तरीही सरकारने माझ्याकडे महत्त्वाच्या 12 खात्यांचा कार्यभार सोपविला आणि तो आपण समर्थपणे पेलला. मंत्रिपदी असताना मी विविध विभागांशी संबंधित 119 निर्णय घेतले. महसुली जमिनींचे वर्षानुवर्षे रखडणारे दावे एका वर्षांत निकाली काढणे, वारसांच्या नावावर मालमत्ता वर्ग करण्याला मुद्रांक शुल्क माफ, ऑनलाइन सातबारा व सजांच्या निर्मितीचा निर्णय, वक्‍फ बोर्डाच्या जमिनी बोर्डाच्या नावावर लावणे असे अनेक लोकहिताचे चांगले निर्णय माझ्या खात्यांकडून त्यावेळी घेतले गेले. याचा समाजाला मोठा फायदा माझ्या मंत्रिपदाच्या काळात झाला, याचा मला सार्थ अभिमान आहे. 
(क्रमशः) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com