पाकिस्तानमध्ये केळी निर्यात पुन्हा बंद 

पाकिस्तानमध्ये केळी निर्यात पुन्हा बंद 

रावेर ः काश्मीर मधून नियंत्रण रेषेजवळून पाकिस्तानशी सुरू असलेल्या आयातीतून अवैधरित्या भारतात शस्त्रास्त्रे, मादक पदार्थ आणि चलन आणले जात असल्याच्या वृत्तामुळे भारत सरकार आणि जम्मू आणि काश्मीरच्या गृहमंत्रालयाने हा व्यापार तातडीने बंद केला आहे. यामुळे अन्य वस्तू व फळांसोबत केळीचीही निर्यात बंद झाली आहे. रोज सुमारे १८० टन केळी निर्यात केळी थांबली आहे. ती पुन्हा सुरू करावी जेणेकरून केळीच्या भावात आणखी वाढ होऊ शकेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

भारत सरकार आणि जम्मू-काश्मीर गृहमंत्रालयाने १८ एप्रिलला दिलेल्या आदेशात हा व्यापार तातडीने थांबविण्याचे आदेश दिले आहेत. या पत्राची प्रत सकाळकडे उपलब्ध आहे. या पत्रात म्हटले आहे, की नियंत्रण रेषेवरून पाकिस्तानशी जो व्यापार सुरू आहे; त्याचा गैरवापर होत आहे. त्याद्वारे भारतात अवैधरित्या शस्त्रास्त्रे, मादक पदार्थ आणि चलन आणले जाते म्हणून या मार्गावरील व्यापार बंद करण्यात येत आहे. यापुढे अधिकृत व मान्यताप्राप्त व्यापाऱ्यांमार्फतच आयात निर्यात केली जाईल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेवरील तपासणी अधिक कडक करण्यात आल्यामुळे सरकारने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. याबाबत पाकिस्तानमध्ये केळी निर्यात करणाऱ्या रशीद पठाण (पुणे) या व्यापाऱ्याने सकाळला सांगितले, की गेल्या पंधरा-वीस दिवसापासूनच सरकारने उरी, राजौरी आणि अन्य एका मार्गावरील पाकिस्तानशी होणारा व्यापार खूपच मर्यादित केला होता. आता तो पूर्णपणे बंद केला आहे. जर पाकिस्तानमधून यामार्गे शस्त्रास्त्रे आणि मादक पदार्थ येत असतील तर ते बंद झाले पाहिजेत. मात्र, जसे पाकिस्तानात जाताना केळीचे खोके बारकाईने स्कॅन होऊन तपासले जातात तसे येतानाही मालाची बारकाईने स्कॅनिंगद्वारे तपासणी व्हावी. म्हणजे मग गैरवापर होणार नाही. परंतु व्यापार पुन्हा सुरू करावा अशी मागणी श्री. पठाण यांनी केली. 

या तीनही मार्गावरून पाकिस्तानात रोज सुमारे १८० टन केळी निर्यात होत होती. ७ मे पासून रमजान महिना सुरू होत असल्याने पाकिस्तानमध्ये दर्जेदार आणि निर्यातक्षम केळीला मोठी मागणी आहे. आता निर्यात बंद झाल्याने निर्यातक्षम आणि दर्जेदार केळीचे भाव अधिक वाढणार नाहीत. सध्या केळीला बाराशे रुपये क्विंटल भाव मिळत असून निर्यातक्षम केळीला दीडशे रुपये जादा म्हणजे तेराशे पन्नास रुपये भाव मिळत आहे. पाकिस्तानला होणारी निर्यात पुन्हा सुरू झाल्यास हे भाव दीड हजार रुपयांच्या पलीकडे जातील अशी अपेक्षा आहे. पाकिस्तानमध्ये बंद असलेली केळीची निर्यात पुन्हा सुरू होऊन फक्त एक महिना झाला असून निर्यात पुन्हा बंद झाल्याने केळी उत्पादकांची कोंडी झाली आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरहद्दीवर कडक तपासणी सुरू असल्याने हा व्यापार बंद झाला असावा. केळी बरोबरच डाळिंब, आंबे आणि जिरे या निर्यातीलाही फटका बसला आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष घातल्यास निर्यात पुन्हा सुरू होऊ शकेल. 
-किशोर गनवाणी महाराष्ट्र केला सप्लायर्स, केळी व्यापारी, रावेर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com