पुणे - राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला, अाक्रमकपणे सातत्याने बळिराजाची बाजू मांडणारा ‘ॲग्रोवन‘ उद्या (ता. २०) चौदाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. वर्धापन दिनानिमित्त तीन दिवस विशेषांक प्रसिद्ध केले जाणार आहेत.
‘ॲग्रोवन’च्या वतीने परवाच पुण्यात ‘जमीन सुपीकता’ या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्राला राज्यभरातील शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. राज्यातील जमिनींच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याने ‘ॲग्रोवन‘ने २०१८ हे वर्ष जमीन सुपीकता वर्ष जाहीर केले आहे. त्याअंतर्गत हे चर्चासत्र झाले. हाच धागा पुढे नेताना आजच्या अंकाबरोबर ‘जमीन सुपीकता विशेषांक’ प्रसिद्ध केला आहे. समस्या काय आहे, याची मांडणी करतानाच त्यावरील उपाय आणि प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा कस कसा सुधारला याचे अनुभवकथनही त्यात मांडले आहे.
जागतिकीकरणामुळे भारतीय शेतीमालाची स्पर्धा आता जागतिक बाजारपेठेशी होते आहे. कापूस, सोयाबीन, ऊस यांसारख्या आपल्या प्रमुख पिकांची स्पर्धा तर थेट या बाजाराशी जोडली गेली आहे. जगभरातील शेतीचे चित्र काय आहे आणि या चित्रात भारतीय शेती आणि शेतकरी नेमका कोठे आहे, याचे भान देणारा दुसरा विशेषांक उद्या शनिवारी प्रसिद्ध होईल.
काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांबाबत आपण खूपच मागे आहोत. त्यामध्ये सुधारणा केल्याशिवाय भारतीय शेती आणि शेतकरी पुढे जाऊच शकणार नाही. याबाबतचे नेमके वास्तव मांडतानाच त्यावर उपाय सुचविणारा तिसरा विशेषांक रविवारी प्रसिद्ध होईल.
|