सौरऊर्जेच्या वापरामुळे उजळली साडेतीनशे गावे

सौरऊर्जेच्या वापरामुळे उजळली साडेतीनशे गावे

नगर - सौरऊर्जेवरील साधनांचा लाभ दिल्याने ग्रामीण भागाला उजाळा मिळाला आहे. सौरउर्जेविषयीच्या योजना राबविण्यासाठी महाऊर्जा अभिकरणाच्या (मेडा) माध्यमातून आतापर्यंत साडेतीनशे गावांसह बारा सरकारी कार्यालये आणि सुमारे चारशेच्या वर कुटुंबांना लाभ झाला आहे. सौरऊर्जेमुळे ९५ टक्के वीजखर्चाची बचत होत असल्याचा अनुभव आहे. लाभ मिळालेल्यांपैकी जवळपास सर्वच कुटुंबे शेतकरी आहेत. 

नगर जिल्ह्यामधील बारा पंचायत समिती कार्यालयांवर प्रत्येकी तेरा लाख रुपये खर्चून दहा किलोवॉट क्षमतेचे सौरविद्युतनिर्मिती संयंत्रे बसविली आहेत. अगोदर त्या पंचायत समित्यांना महिन्याला साधारण बारा ते चौदा हजार रुपये वीजबिल येत होते. आता हा आकडा फक्त तीन हजारांवर आला आहे. त्यामुळे पंचायत समित्यांची दर महिन्याला सव्वा लाखाची बचत होत आहे. जिल्हा परिषदेतील पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर सौरऊर्जानिर्मिती संयंत्रे बसविण्याचे प्रस्तावित आहे. 

जिल्ह्यामधील दीडशे गावांत पंधरा हजार ९९५ रुपये प्रत्येकी किंमत असलेल्या, दोनशे ‘सौरअभ्यासिका’ तीन वर्षांत तयार केल्या आहेत. त्यासाठी नव्वद टक्के अनुदान दिले असून, ग्रामपंचायतीने दहा टक्के रक्कम भरली आहे. तीन वर्षांत सुमारे १२५ गावांत प्रत्येकी पंचवीस हजार ३५० रुपये किंमत असलेले पथदिवे बसविले आहेत. त्यासाठी प्रत्येकी (दहा टक्के) दोन हजार ५३५ रुपये लोकवाटा ग्रामपंचायतींनी भरला आहे. जवळपास दोनशे कुटुंबांना नऊ हजार ८१० रुपये किमतीची सौरसंयंत्रे दिली आहेत. त्यासाठी पन्नास टक्के अनुदान दिले. 

जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतूनही दोनशेच्या वर कुटुंबांना सौरकंदील दिले आहेत. आता बायोगॅस उभारणीतून सिलिंडरमुक्‍त गाव योजनाही राबविली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com