‘क्रॉप कव्हर’ तंत्राने वाढविली पिकाची गुणवत्ता

Crop-Cover-Technology
Crop-Cover-Technology

वर्धा जिल्ह्यातील रोहणा येथील अविनाश कहाते व अकोला जिल्ह्यातील दानापूर येथील येऊल बंधू यांनी आपापल्या भाजीपाला पिकांमध्ये ‘क्रॉप कव्हर’ तंत्राचा वापर केला. विदर्भातील भीषण उन्हाळ्यात त्यांना त्याचा चांगला उपयोग झाला. दर्जा व उत्पादनही दर्जेदार ठेवणे शक्य झाले. 

पिकांची गुणवत्ता राखण्याबरोबरच किडी-रोगांचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्यांद्वारे केला जातो.

अलीकडील काळात भाजीपाला पिकांत ‘क्रॉप कव्हर’ तंत्राला शेतकऱ्यांकडून पसंती मिळत आहे. विदर्भात उन्हाळ्यात पिकांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर असते. त्यापार्श्‍वभूमीवर मिरची, डाळींब, काकडी आदी पिकांत शेतकरी ‘क्रॉप कव्हर’चा वापर करू लागले आहेत. 

‘क्रॉप कव्हर’ चे महत्त्व  
शेडनेटप्रमाणाचे क्रॉप कव्हर पिकावर रोपावस्थेत झाकले जाते. याच्या वापरामुळे पिकाच्या आतील बाजूस ‘मायक्रो क्‍लायमेट’ तयार होते. किडी-रोगांना अटकाव करणे शक्य होते. पिकाचा दर्जा सुधारून फळांचे वजन वाढीस लागते. क्रॉप कव्हरचा फायदा डाळिंबासारख्या पिकातही घेता येतो. तीव्र उन्हाळ्यात ‘सनबर्न’ ही समस्या डाळिंबात जाणवते. त्यामुळे फळाची क्वालिटी घसरून त्याला सर्वांत कमी दर मिळतो. त्यामुळे शेतकरी फुलोरा अवस्थेनंतर या कव्हरचा वापर फळांचे संरक्षण करण्यासाठी करतात. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातही या तंत्रज्ञानाचे प्रयोग झाले आहेत.

नॉन व्होव्हन फॅब्रीक्‍स प्रकारातील हे प्लॅस्टिक राहते. त्याचे साधारण एक वर्षाचे सरासरी आयुष्य राहते. रोपावस्थेत वापर केल्यास फुलधारणेनंतर ते काढावे लागते. कारण, परागीभवनासाची प्रक्रिया पुढे करावी. उन्हाळ्यात भाजीपालावर्गीय पिकांना मागणी राहते. मात्र, पाण्याची उपलब्धता असलेले शेतकरीच ही पिके घेतात. या कालावधीत दरही चांगले मिळतात. परिणामी, क्रॉप कव्हरसारखे तंत्रज्ञान वापरून भाजीपाला घेण्याची संधी शेतकरी घेऊ शकतात.  

काकडीत कहाते यांचा प्रयोग 
वर्धा जिल्ह्याने यंदा सर्वाधिक तापमानाच्या झळा सोसल्या आहेत. अशाही स्थितीत रोहणा (ता. आर्वी) येथील अविनाश कहाते यांनी काकडी पिकासाठी ‘क्रॉप कव्हर’ तंत्राचा वापर करण्याचे ठरवले. त्यांची सुमारे सव्वा तीन एकरांवर काकडी होती. त्यातील पावणेदोन एकर क्षेत्र त्यासाठी निवडले. बी उगवणी झाल्यानंतर साधारण तीन ते चार दिवसांनी हे कव्हर वापरण्यास सुरवात केली. तेथून साधारण एक महिन्यापर्यंत त्याचा वापर केला. 

कव्हर असे केले स्थापित
हे कव्हर रोपांभोवती घालण्यासाठी टनेल किंवा भुयारी आकाराची रचना तयार करावी लागते. त्यासाठी लोखंडी बार वापरावे लागतात. प्रतिएकरी अडीत क्विंटल एवढ्या प्रमाणात ते वापरले जातात. क्विंटलला त्याचा दर ४७०० रुपये आहे. 

झालेले फायदे 
कव्हर केल्यामुळे त्यात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जाणवला नाही. साहजिकच होणाऱ्या किमान तीन ते चार फवारण्यांमध्ये बचत झाली. पर्यायाने कीडनाशकांवरील खर्च १० हजार रुपयांनी कमी झाला. 

रोपांचा दर्जा चांगला होता. त्याची कॅनोपी अत्यंत चांगल्याप्रकारे वाढली होती. 

कव्हर केलेल्या पिकाचे एकरी २०० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. अर्थात त्यामागे अन्य व्यवस्थापनही महत्त्वाचे होते. त्या तुलनेत कव्हर न केलेल्या पिकात हेच उत्पादन ५० क्विंटलपर्यंतच मिळाले. 

पिकाचे उन्हापासून संरक्षण झाले. काकडीची गुणवत्ता त्यामुळे वाढली.

रोगांचाही प्रादुर्भाव फारसा जाणवला नाही. 

गुंतवणूक व अर्थकारण 
कहाते म्हणाले, की या तंत्राचा वापर करण्यासाठी साधारण १६ हजार ते १७ हजार रुपयांचा खर्च येतो. साधारण साडे २६०० मीटर एवढ्या कव्हरची त्यासाठी गरज भासते. त्याचा दर प्रतिमीटर सहा रुपये आहे. मात्र, कव्हरींग करणे व त्याची काढणी या दोन बाबी व्यवस्थितरित्या पाळल्यास किमान दोन हंगामातील पिकांसाठी त्याचा वापर करणे शक्य होते. लोखंडी बार सुमारे आठ वर्षे तरी वापरता येतात. त्यामुळे ही दीर्घ कालावधीसाठीची गुंतवणूक ठरते. यंदा आमच्या भागात तापमानाचा पारा ४६ अंशापर्यंत पोचला होता. तरीही काकडीची प्रत चांगली मिळाली. मात्र दर घसरले असल्याने त्याचा फार चांगला फायदा घेता न आल्याचे दुख कहाते यांनी व्यक्त केले. 

गारपिटीतून सावरून कव्हरचा प्रयोग 
कहाते यांनी कव्हरच्या केलेल्या प्रयोगाचे वेगळे महत्त्व आहे. यंदाच्या फेब्रुवारीमध्ये रोहणा भागात प्रचंड मोठी गारपीट झाली. त्यात कहाते यांचे शेडनेट, भाजीपाला, केळी असे सगळे मिळून तब्बल २२ लाख रुपयांचे नुकसान झाले. हाता तोंडाशी आलेले उत्पादन गारपीट घेऊन गेले. मात्र हिंमत न हारता कहाते त्यातून उभे राहिले. त्यांनी कव्हरचा प्रयोग केला आणि तो यशस्वीही करून दाखवला. आता काकडीचा प्लॉट संपला आहे. पुढील एक एकरांतील कारली पिकातही त्याचा वापर सुरू केला आहे. 

बारा एकरांत मिरचीसाठी येऊल यांचा प्रयोग
दानापूर (जि. अकोला) येथील संजय व गोपाल या येऊल बंधूंनी भाजीपाला शेतीत अोळख तयार केली आहे. त्यांची केवळ सात एकर शेती आहे. सुमारे ९५ एकर शेती ते करारावर करतात. मागील वर्षी दीड एकरांतील मिरची पिकात त्यांनी क्रॉप कव्हरचा वापर केला. यंदा त्यांनी १२ एकरांत त्याचा प्रयोग केला. रोप लावल्यापासून सुमारे ४५ दिवसांपर्यंत हे कव्हर ठेवले.  

झालेले फायदे 
मिरचीचा दर्जा उत्तम होता. किलोमागे दोन ते तीन रुपये अधिक मिळाले. 

सुमारे सहा ते सात फवारण्या वाचल्या. प्रतिफवारणी खर्च १५०० ते २००० रुपये होता. 

एकूण व्यवस्थापना अंती मागील वर्षी एकरी १८० क्विंटल उत्पादन मिळाले. यंदा एकरी २०० क्विंटल पर्यंत उत्पादनाचा अंदाज आहे.  

खर्च व अर्थकारण 
संजय म्हणाले, की कव्हर तंत्रज्ञानाच्या वापरासाठी एकूण खर्च पहिल्यावर्षी ३५ हजार रुपये एकरी आला. त्यात १४ हजार रुपये ‘क्रॉप कव्हर’च होते. लोखंडी बारसाठी १७ ते १८ हजार रुपये व मजुरीसाठी पाच ते सहा हजार रुपये खर्च आला. यंदा लोखंडी बारचा खर्च कमी झाला. तसेच मागील वर्षाचेच कव्हर पुन्हा वापरल्याने तोही खर्च करावा लागला नाही. साधारण तीन पिकांसाठी त्याचा वापर अपेक्षित असल्याचेही संजय म्हणाले. 
- अविनाश कहाते, ८२७५२८९५८५ 
- संजय येऊल, ९८२२४५४९१४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com