साखर उत्पादन २७.५ दशलक्ष टन होणार

Sugar
Sugar

नवी दिल्ली - चालू गाळप हंगामात पोषक वातावरण असल्याने देशात साखर उत्पादन २७ ते २७.५ दशलक्ष टनांपर्यंत होईल. या आधी २४.९ दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज होता; मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांनी उत्पादनवाढीचा सुधारित अंदाज जाहीर केल्याने देशातील साखर उत्पादन २७ ते २७.५ दशलक्ष टनांपर्यंत होईल, असा अंदाज आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.  

‘‘महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांनी हंगामाच्या सुरवातीला जाहीर केलेल्या उत्पादनाच्या अंदाजात वाढ करून सुधारित अंदाज जाहीर केला आहे. या राज्यांमध्ये उत्पादनात मोठी वाढ होणार आसल्याने देशातील उत्पादन वाढेल. त्यामुळे यंदा साखर उत्पादन २७ दशलक्ष टनांचा टप्पा सहज पार करेल. महाराष्ट्रात हंगामाच्या सुरवातीला साखर उत्पादन ७.३ दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज होता. आता मात्र राज्यातील साखर उत्पादन ९ दशलक्ष टनांपेक्षा जास्त होईल, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. महाराष्ट्रात ऊस उत्पादन वाढल्याने त्याचा फायदा कारखान्यांना मुबलक ऊस उपलब्ध होऊन होणार आहे. आधी राज्यातील प्रतिहेक्टरी ऊस उत्पादकता ही ८० ते ८५ टन होती. परंतु यंदा चांगला पाऊस झाल्याने उत्पादकता १२० ते १२५ टनांपर्यंतही काही भागात गेली आहे, ’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

‘‘कर्नाटकमध्ये स्वीटनरचे उत्पादन २.६ दशलक्ष टन आधीच्या अंदाजापेक्षा जास्त होऊन ३.२ दशलक्ष टन होईल. तसेच येथील साखर कारखाने मार्चच्या मध्यापर्यंत गाळप करण्याची शक्यता असल्याने साखर उत्पादन वाढणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये उत्पादन वाढणार असल्याने देशातील साखर उत्पादन २७ ते २७.५ दशलक्ष टनांपर्यंत होईल, अशी शक्यता आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

आयात शुल्कवाढ, साठा मर्यादेमुळे दरात वाढ
केंद्राने नुकतेच साखरेच्या आयात शुल्कात १०० टक्के वाढ केली आहे. तसेच कारखान्यांवर साठा मर्यादा आणि विक्री मर्यादा लादल्याने साखर दर वाढले आहेत. या महिन्याच्या सुरवातीलाच सरकारने साखर आयात शुल्क १०० टक्के केले आहे. तसेच कारखान्यांना त्यांचा जानेवारीतील ८३ टक्के साठा फेब्रुवारीपर्यंत ठेवण्यास आणि फेब्रुवारीतील साठा मार्चपर्यंत ८६ टक्के ठेवण्याचे निर्देश दिले होते. बाजारात पुरवठा कमी झाल्याने साखरेच्या दरात होत असलेली घट थांबली. मागणी मात्र कायम असल्याने साखर दर वाढले आहेत.

उत्तर प्रदेशात उत्पादन वाढले
राज्यातील साखर कारखान्यांनी एक आॅक्टोबर ते १५ फेब्रुवारीपर्यंत ६.४५ दशलक्ष टन साखर उत्पादन घेतले आहे. हे उत्पादन मागील वर्षाच्या उत्पादनापेक्षा १९.४ टक्क्यांनी जास्त आहे. मागील वर्षी याच काळात कारखान्यांनी ५.४० दशलक्ष टन साखर उत्पादन घेतले होते. राज्यातील साखर कारखान्यांनी या हंगामात अगदी वेळेवर गाळप सुरू केल्याने उत्पादन वाढले आहे. यंदा ११९ कारखाने गाळप करत आहेत. या कारखान्यांनी ६२.२६ दशलक्ष टन ऊस गाळप केले आहे, तर उतारा १०.३७ टक्के आला आहे. राज्यात यंदा विक्रमी १०.३ दशलक्ष टन उत्पादन होईल, असा अंदाज राज्य ऊस विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com