बीबीएफ तंत्राच्या वापरातून  ‘वर्णेश्‍वर’ निघाली प्रगतीकडे

बीबीएफ तंत्राच्या वापरातून  ‘वर्णेश्‍वर’ निघाली प्रगतीकडे

परभणी जिल्ह्यातील वर्णा येथील वर्णेश्वर अॅग्रो प्रोड्यूसर शेतकरी कंपनीच्या सभासदांनी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) तंत्राचा वापर सुरू केला आहे. त्याचे विविध फायदे त्यांना मिळत आहेत. बियाणे बचत करण्याबरोबर मूलस्थानी जलसंधारण होऊन जमिनीची धूप कमी झाली आहे. जमिनीची सुपीकता टिकली आहे. व्यवस्थापन सुधारल्याने उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली आहे. 

वर्णा (ता. जिंतूर, जि. परभणी) गावात उत्तेरकडून करपरा नदी वाहते. त्या शिवारातील जमीन काळी कसदार सुपीक आहे. दक्षिण-पश्चिमेस माळ असल्याने तेथे हलकी, मुरमाड जमी आहे. श्री वर्णेश्वर महादेव आणि श्री खंडोबा ही वर्णेकरांची ग्रामदैवते आहेत.

वर्षा गावाविषयी
गावात खरिपात सोयाबीन, तूर, मूग, कापूस, उडीद, रब्बीत हरभरा, ज्वारी, गहू तर उन्हाळी हंगामात भूईमूग घेतला जातो. करपरा मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी ओलितासाठी मिळते. शिवाय बोअरच्या माध्यमातून सिंचन केले जाते. गावातील ८० टक्के शेती हंगामी बागायती आहे.

शेतकरी कंपनीची स्थापना  
कृषी विभागाच्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी गावातील तरुण शेतकरी एकत्र आले. त्यांनी एक मे २०१५ रोजी वर्णेश्वर अॅग्रो प्रोड्युसर्स ही कंपनी स्थापन केली. स्थापनेच्या पहिल्या वर्षी कंपनीने शंभर एकरांवर हरभरा तर ३० एकरांवर चारा पिकांचे उत्पादन घेतले. पूर्वी गावातील शेतकरी बैलचलित पेरणीयंत्राद्वारे सोयाबीन घेत. बीजप्रकियेला फारसे महत्त्व दिले जात नसे. गेल्या वर्षी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने ‘वर्णेश्वर’ कंपनीच्या माध्यमातून सोयाबीनच्या एमएयूएस १५८ या वाणाचे ५० एकरांवर रुंद वरंबा सरी (ब्रॉड बेड फरो- बीबीएफ) तंत्राचे प्रात्यक्षिक घेतले. विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डाॅ. बी. बी. भोसले, कृषी विद्यावेत्ता डाॅ. यू. एन. आळसे, डी. डी. पटाईत यांनी शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती व बीजप्रक्रियेचे महत्त्व समजावून सांगितले. शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे आणि बीजप्रक्रिया सामग्रीदेखील देण्यात  आली.

मागील वर्षाचा प्रयोग 
सोयाबीन शेताची रचना रुंद वरंबा सरी पद्धतीने केली.   
बुरशीनाशक तसेच रायझोबियम, पीएसबी या जीवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया केली. 
ट्रॅक्टरला बीबीएफ पेरणी यंत्र जोडून पेरणी केली. दोन ओळीतील अंतर १४ इंच ठेवले.  

या वर्षी बीजोत्पादन कार्यक्रम...
खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर नगर जिल्ह्यातील एका कंपनीशी करार करून यंदा वर्णेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीने सुमारे ५० एकरांवर सोयाबीनच्या फुले अग्रणी वाणाचा बिजोत्पादन कार्यक्रम घेतला आहे. ३५ एकरांवर बीबीएफ पद्धतीने पेरणी केली आहे. शिवाय शेतकरी कंपनीने आपल्या गटातील शेतकऱ्यांकडे ३७ एकरांवर बीजोत्पादन कार्यक्रम घेतला आहे. यात सोयाबीनच्या एमएयूएस-१६२ वाणांचे २५ एकर आणि फुले अग्रणी वाणाचे पाच एकरांवर बीजोत्पादन आहे. तसेच 
सोयाबीन, उडीद, तूर आदींच्या बीजोत्पादनाचाही समावेश आहे.

बीबीएफ यंत्रात करणार सुधारणा 
गेल्या वर्षी ४७ एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे पेरणी केली. परंतु त्याच्या टायरचा आकार मोठा असल्याने सरी व्यवस्थित पडत नव्हती. त्यामुळे बीबीएफ यंत्रात बदल केला. पेरणी ते काढणीपर्यंत संपूर्ण यांत्रिकीकरण करण्यासाठी कंपनीने प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील वर्षी ३५ एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर घेण्यााच विचार आहे. सध्या कंपनीच्या तीन सदस्यांकडे तीन बीबीएफ यंत्रे आहेत. एकरी ६०० रुपये भाडेतत्त्वावर अन्य शेतकऱ्यांसाठी त्याचा वापर केला जात आहे.   अॅग्रोवन प्रेरणादायी....
अॅग्रोवनमधील यशोगाथांच्या माध्यमातून गटशेतीची संकल्पना शेतकऱ्यांना समजली. प्रेरित झालेले तरुण शेतकरी एकत्र आले. ‘वर्णेश्वर’ कंपनी स्थापन होण्यामागे हे एक कारण आहे. 

बीबीएफचे झालेले फायदे 

पूर्वी टोकण पद्धतीत बियाणे जास्त म्हणजे एकरी ३० किलोपर्यंत लागायचे. आता पेरणी पद्धत असल्याने ते २० ते २२ किलोपर्यंत लागते. ३० किलोच्या बॅगेसाठी १८०० रुपये (किलोला ६० रुपये) पडतात. आता किमान ८ किलो बियाण्याची बचत झाल्याने किमान पावणेपाचशे रुपयांची तिथेच बचत झाली आहे. 

बीबीएफ तंत्रामुळे मूलस्थानी जलसंधारण होते. सरीत पडलेल्या पावसाचे पाणी चांगले मुरते. अधिक पाऊस पडला तर सरीव्दारे पाण्याचा निचरा होतो. पावसाच्या खंड काळात पीक पाण्याचा ताण सहन करते.

जमिनीची धूप कमी होते. जमिनीची सुपिकता टिकून राहते. 

पावसाचा दीर्घ खंड पडला तर सरीद्वारे तसेच सरीत तुषार संचाचे पाइप ठेवून पिकास संरक्षित पाणी देता येते.

सोयाबीन पिकाची वाढ झाल्यानंतरच्या काळात फवारणीसाठी पिकातून चालणे कठीण होते. मात्र बीबीएफ तंत्रामुळे सरीतून चालता येते.

एकूण व्यवस्थापन सुधारल्याने पारंपरिक पद्धतीपेक्षा सुमारे २० टक्के अधिक उत्पादन मिळते.

गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये पावसाचा खंड पडला होता. परंतु बीबीएफ तंत्रामुळे पिकाने पाण्याचा ताण सहन केला.

सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये सोयाबीन काढणीच्या अवस्थेत असताना अतिवृष्टी झाली. परंतु बीबीएफ तंत्रामुळे पाण्याचा निचरा झाला. शेतात पाणी साचून राहिले नाही. याउलट पारंपरिक पद्धतीने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून राहिले. बुरशीजन्य रोगाची वाढ झाल्याने सोयाबीनचे नुकसान झाले.

अनेकांना एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन मिळाले. 

पूर्वी सोयाबीनचे एकरी पाच ते सहा क्विंटल उत्पादन मिळायचे. बीजप्रकिया, बीबीएफ तंत्र व एकूण व्यवस्थापनातून एकरी १२ ते १४ क्विंटल उत्पादन मिळाले आहे. 
- दिगंबर अंभुरे, माणिक अंभुरे, शिवाजी दराडे, बालाजी अंभुरे,  

 कंपनीचे उपक्रम 
१८ लाख रुपयांची गुंतवणूक, पैकी ११ लाख ५० हजार रुपये अनुदान.
दहा गुंठे जमीन भाडेतत्त्वावर घेत शेडची उभारणी. एक टन क्षमतेची धान्य स्वच्छता व प्रतवारी करणारी यंत्रसामग्री. आजपर्यंत अडीच हजार क्विंटल तूर आणि ४५० क्विंटल गव्हाची प्रति क्विंटल ७० रुपये दराने प्रतवारी. त्यायातून प्रतिक्विंटल ४० रुपये नफा झाला.
बाजारभाव कोसळल्यानंतर कंपनीकडून आधारभूत किमतीने (५,०५० रुपये प्रतिक्विंटल) गावातील तसेच परिसरातील २३६ शेतकऱ्यांकडून अडीच हजार क्विंटल तुरीची खरेदी. त्यावेळी बाजारातील दर ३,८०० रुपये ते ४,००० रुपये होते. 
कंपनीचा वर्णेश्वर नावाचा ट्रेड मार्क.
 ‘आत्मा’चे तालुका समन्वयक सुनील अंभुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय शेती गटाची. गेल्या वर्षी सेंद्रिय पद्धतीने १२० क्विंटल गव्हाचे उत्पादन. डाळमिल उभारून सेंद्रिय डाळनिर्मितीचा उद्देश

दिलीप अंभुरे, ९६५७९६१६३५, अध्यक्ष, ‘वर्णेश्वर’ 
दिगंबर अंभुरे, ९६७३७५९३४३.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com