नाशिक जिल्ह्यात दीड लाख एकरावरील द्राक्ष संकटात

नाशिक जिल्ह्यात दीड लाख एकरावरील द्राक्ष संकटात

नाशिक - जिल्ह्यात सोमवारपासून (ता.२०) असलेल्या ढगाळ हवामानाने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढवली आहे. अचानक ढगाळ हवामान पसरून काही भागांत हलक्या स्वरूपात पावसाच्या सरी झाल्याने नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या अवस्थेतील द्राक्षबागांवर डाउनी, भुरीचा प्रादुर्भाव वाढला आहे.

जिल्ह्यात दीड लाख एकरावरील द्राक्षबागा त्यामुळे संकटात सापडल्या आहेत. मात्र मंगळवारी स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने वातावरण साफ होण्यास मदत झाली. सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आधीच द्राक्षबागा संकटात सापडल्या होत्या. त्यात आॅक्टोबरनंतर नोव्हेंबरमध्ये हवामान स्वच्छ असल्याने द्राक्षांना फुलोरा व काही ठिकाणी मणींची अवस्था आल्यानंतर सोमवारी अचानक ढगाळ हवामान होऊन पावसाच्या हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरी, नाशिक, निफाड व इगतपुरी तालुक्यांत झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. 

नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढत असतानाच पावसाचा शिरकाव झाल्याने वातावरणात अचानक बदल झाला. त्यामुळे द्राक्षांवर रोगाचा प्रार्दुभाव होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांना द्राक्षबागांमध्ये धूर व कीटकनाशकांची फवारणी करावी लागली. जिल्ह्णात द्राक्ष पिकाखालील क्षेत्र ५२ हजार ३८६ हेक्टर असून, त्यात सर्वाधिक निफाड तालुक्यात १९ हजार ९६६ हेक्टर त्यानंतर दिंडोरीत १५ हजर १६७ हेक्टर व नाशिकमध्ये ११ हजार ६७१ हेक्टर तसेच चांदवड तालुक्यात तीन हजार ७५२ हेक्टर क्षेत्र आहे. यात थॉमसन सिडलेस, सोनाका, तास-ई-गणेश, एच-५, क्रिमसन, फनटासी क्लोन-२ या द्राक्ष जातींची लागवड केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

कंटेनरमध्ये घट
गेल्या वर्षी २० नोव्हेंबरपर्यंत कळवण, सटाणा, चांदवड व देवळा या भागांतील अर्ली द्राक्षांची जवळपास ४० कंटेनरची निर्यात श्रीलंका व रशिया या देशांमध्ये झाली होती. या वर्षी काढणीला आलेल्या अर्ली द्राक्षांना अवकाळीचा फटका बसल्याने आतापर्यंत केवळ १४ कंटेनरमधून ३३ हजार ६३६ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात होऊ शकल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

कांदा, मका पिकांचे नुकसान
जिल्ह्यातील चांदवड, बागलाण तालुक्यात अवकाळी पावसाने मंगळवारी (ता.२१)  हजेरी लावली. दुसरीकडे नाशिक शहर-परिसरात सलग दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण होते. अवकाळीने कांदा, द्राक्ष, तसेच मका धोक्यात आल्याने शेतकरी चिंतेत आहेत. बालगाण तालुक्यातील मुल्हेर, ताहराबाद, तसेच इतर भागात सायंकाळी ५च्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. 

देवळा तालुक्यातील मेशी येथेही अवकाळी पाउस झाला. या पावसामुळे कांदापिकाचे नुकसान झाले. मका, सोयाबीन, गहू पिकांना फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. चांदवड शहरासह राहुड, कळमदरे, डोंगरगाव, ऊसवाड, नांदूरटेक, वडबारे, हरनूल, हरसूल, दहीवद, दिघवद, कोलटेक, पाटे, काजीसांगवी, सोनीसांगवी, तळेगावरोही, विटावे, हिवरखेडे, पाथरशेंबे, निमगव्हाण, भोयेगाव, परसूल, गणूर, मंगरूळ, वडाळीभोई, खडकओझर, खडकजांब, वडनेरभैरव, पिंपळनारे, धोंडगव्हाण, बहादुरी, शिवरे, बोराळे आदी गावांमध्ये अवकाळी पावसाने २० ते २५ मिनिटे हजेरी लावली. त्यामुळे कांदे, द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com