शेतीलाच लावले नोकरीला!

शेतीलाच लावले नोकरीला!

हिवरखेड येथील दादाराव हटकर (वय ५३) हे मेंढपाळ. आईवडिलांसोबत मेंढ्यांमागे भटकताना त्यांचे कसेबसे तिसरीपर्यंत शिक्षण झाले. फिरण्यामुळे जगाचे अनेक रंग, वृत्ती आणि स्वभाव पाहता आल्याने अनुभवाची मोठी शिदोरी पाठीशी राहिली. त्यांना चार भाऊ आहेत. आईवडिलांसह मुलेबाळे यांचे एकूण ४१ जणांचे एकत्रित कुटूंब आहे. आपण निरक्षर राहिलो तरी मुलांबाळांची शिक्षणे तरी पूर्ण व्हावीत, या उद्देशाने या बंधूंनी एका जागी थांबण्याचा निर्णय घेतला. २००४ मध्ये हिवरखेड शिवारात २०० एकर माळरान खरेदी केले. यंत्रांचा वापर करीत सपाटीकरण केले. त्यात नदी, नाल्यातील गाळ टाकत सुपीकता आणली. सुमारे १५० एकर जमीन वहितीखाली आणली. सात विहिरी आणि दोन बोअरवेलच्या साह्याने सिंचनाची व्यवस्था केली आहे. पाच भावांच्या या शेतीला पंचरत्न फार्म असे नाव दिले आहे. 

दादाराव यांचे शिक्षण कमी असले तरी निरीक्षणवृत्ती तीक्ष्ण आहे. भटक्‍या, नोकरदार आणि शेतकरी कुटुंबाचे ते उत्तम विश्‍लेषण करतात. प्रत्येकातील चांगले गुण आपल्या कुटुंबात राहावेत, या दिशेने त्यांनी काम केले. भटक्‍यावृत्तीतून बाहेर येऊन स्थिरता आणण्यासाठी दादारावांनी प्रयत्न तर सुरू केले होते. त्यांच्या मते, 

१) नोकरी - नोकरदाराला दरमहा उत्पन्न मिळते. त्यावर टुकूटुकू पण उत्तम चालते. निवृत्तीनंतर पेन्शन, फंड मिळतो. त्यावर घरदार व मुलाबाळांची लग्ने, शिक्षण होते.  

२) शेतकरी - कोरडवाहू शेतकऱ्याला उत्पन्नांची शाश्‍वती नसते. उत्पादन आले तर वर्षातून एकदा उत्पन्न मिळते. त्यावर त्याचा गुराढोरांसह सर्व प्रपंच चालवावा लागतो. खेळता पैसा फारसा नसल्याने सतत आर्थिक तंगी असते. सिंचनाची सोय असली तर नगदी पिकांची लागवड करतो. नगदी पिकामध्येही उत्पादन खर्च जास्त असल्याने कर्जबाजारीपण चुकत नाही. त्यातही एखाद्या वर्षी अस्मानी, सुलतानी किंवा बाजारदरात पीक सापडले तरी तो कर्जामध्येच अडकून पडतो. उजगरीला येत नाही.

शेतीतूनच नोकरीसारखेच फायदे कसे मिळवता येतील, याचा विचार सुरू झाला. 

शेतीलाच नोकरीवर ठेवायचे...

दरमहा उत्पन्नासाठी - सहा फळांची एकरी साठ झाडे. एक एकरवर फळबागेचे प्रयोग सुरू केले. कोकणातील लाखाची बाग या धर्तीवर संकल्पना राबवल्याचे ते सांगतात. त्यातून दरमहा उत्पन्न मिळण्याच्या उद्देशाने सीताफळ, पेरू, संत्रा, लिंबू, जांभूळ, खजूर अशा सहा फळपिकांची प्रत्येकी दहा झाडे (१८ फूट बाय १८ फूट अंतरावर) लावली. 

उत्पन्न मिळण्याचे महिने - फळझाड
    डिसेंबर व जानेवारी - पेरू उत्पादन
    फेब्रुवारी व मार्च - मृग बहारातील संत्रा
    एप्रिल-मे - महिन्यात लिंबूचे उत्पादन घेण्यावर भर राहतो. 
    जून-जुलै - बाहडोली जांभूळाची फळे 
    ऑगस्ट- सप्टेंबर - खजूर
    ऑक्‍टोबर-नोव्हेंबर - सीताफळ

उदा. सात वर्षांपूर्वी लावलेली दहा सीताफळ झाडे उत्पन्न देत आहेत. प्रति झाड ४० किलो फळे मिळतात. अशा प्रकारे चांगले उत्पन्न प्रतिमाह मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

उत्पन्नाचा ताळेबंद - 
रासायनिक शेती - एकरातील या बागेतून २ लाख ७० हजार रुपयांचे उत्पन्न  वर्षभरात मिळते. यातून रासायनिक पद्धतीने व्यवस्थापनाचा खर्च १८ हजार रुपये वजा जाता, दोन लाख ५२ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो, असे दादाराव सांगतात. 
सेंद्रिय शेती - सेंद्रिय पद्धतीने एक एकर व्यवस्थापनाला सहा हजार रुपये खर्च येतो. त्यात तणनियंत्रणासाठी मजुरी दोन हजार रुपये, शेणखत चार हजार रुपये धरले आहे. याचे उत्पादन थोड कमी झाले तरी बाजारात सेंद्रिय म्हणून विक्री केल्यास मागणी व दर चांगला मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

शेळ्यांच्या चाऱ्याकरिता आजनाचा पर्याय
सात वर्षांपूर्वी लावलेल्या एकरी दहा आजनी झाडांवर पाच बकऱ्यांचे वर्षभर पोट भरते. एका शेळीला २ ते अडीच किलो आजन पाल्याची गरज भासते. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असल्याने बकरीचे वजन व दूधामध्ये वाढ होते. प्रति बकरे दहा हजार रुपये दर धरला तरी ५० हजार रुपये निव्वळ मिळतात. बकरीपासून मिळालेली दोन पिल्लांचा हिशोब धरल्यास ते १० हजार रुपये मिळतात. आजन पाल्याला हंगामात १५ रुपये किलो, अन्य वेळी ८ ते ९ रुपये किलो दर मिळतो. बंदिस्त शेळीपालनात आजन लागवड फायदेशीर ठरते. प्रयोगातून हा फायदा लक्षात येताच गेल्या दोन वर्षांत उर्वरीत शेतात ९०० आजना झाडे लावली आहेत. त्यावर बंदिस्त पद्धतीने ९०० मेंढ्या व ३०० शेळ्या व्यवस्थापन केले जाते.

रक्‍तचंदन - २० ते २५ वर्षांत दोन टनाचे झाड होते. त्याचा पाला, मुळे, फांद्या, छोट्या काड्या सर्व उपयुक्त असल्याने उत्तम दर मिळतो. अन्यत्र त्यांनी आठ बाय आठ अंतरावर एका एकरात सुमारे २४०० झाडे लावली. श्रीगंधचंदन व सागाची लागवड १२ ते २० वर्षाने उत्पन्न देण्यासाठी केली आहे. तर बिबा (प्रति झाड ३००० रु), आंबा (प्रति झाड १००० रु.) आणि नारळ (प्रति झाड २००० रु.) असे वर्षातून एकदा चांगले उत्पन्न देतील. यातून पेन्शन आणि फंडाची सोय होईल, असा त्यांचा विश्‍वास आहे.  कृषी विभागाच्या अनुदानावर दोन शेततळी केली आहेत. त्यातून संरक्षित पाण्याची सोय झाली आहे.
 - दादाराव हटकर, ९९२११२६१०१

हटकर यांनी जपली प्रयोगशीलता
    कुटुंबामध्ये ४० सदस्य असून, घरगुती वापरासाठी एक एकर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला घेतात.  ४० एकरपैकी दहा एकर संत्रा बागेचे संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करतात.
    सुमारे १५० एकर क्षेत्र ठिबकखाली आणले आहे.  
    वीज व स्वयंपाकासाठी ऊर्जा निर्मितीच्या उद्देशाने सव्वा तीन लाख रुपये खर्चून बायोगॅस प्लॅंट उभारला.   
    आयुष्यामध्ये शेतीला उशीरा सुरवात केली असली तरी प्रयोगशीलतेच्या बळावर फळबाग क्षेत्रातील कामगिरीची दखल राज्य शासनासह विविध संस्थांनी घेतली आहे. त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
    शेतीमुळेच पाचही भावांच्या कुटुंबातील बहुतांश सर्व मुले, मुली पदवीधर करण्यात यश आल्याचे ते अभिमानाने सांगतात.

पेन्शन, फंडाचीही केली सोय
शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शन व फंडाप्रमाणे उतारवयात शेतीतून मोठी रक्कम मिळाली पाहिजे. त्यासाठी वरील एका एकरामध्येच १८ फूट बाय १८ फूट अंतरावर आणखी आजनी (अंजनी), श्रीगंध चंदन, रक्त चंदन, साग, आंबा, नारळ आणि बिबा अशा सात प्रकारच्या प्रत्येकी दहा झाडाची लागवड त्यांनी केली आहे. त्यातील बिबा दोन वर्षांत, आंबा व नारळ पाच वर्षांत, श्रीगंधचंदन १२ वर्षांत, साग १५ ते १८ वर्षांत आणि रक्तचंदन २० वर्षांत उत्पन्न देईल.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com