सुधारित केळी शेतीतून विकास साधणारे पिलखेडे 

Pilkhede village in Jalgaon district famous for banana
Pilkhede village in Jalgaon district famous for banana

जळगाव जिल्हा म्हणजे केळीचे आगर. या तालुक्‍यातील पिलखेडे हेदेखील केळीसाठी प्रसिद्ध असलेले गाव. गिरणा नदीकाठावर हे गाव वसले असून, तापी नदीदेखील गावापासून सुमारे साडेतीन किलोमीटरवर आहे. भूगर्भात मुबलक जलसाठे आहेत. कूपनलिका प्रत्येक शेतात दिसते. 

पिलखेडे गावाविषयी

 जळगाव शहरापासून सुमारे २५ किलोमीटरवर
 लोकसंख्या सुमारे २४०० 
 साक्षरतेचे प्रमाण ८५ टक्‍क्‍यांवर 
 क्षेत्र सुमारे २०० हेक्‍टर.
 जमीन काळी कसदार. गिरणाकाठी काही शेतकऱ्यांची जमीन पांढऱ्या मातीची व मध्यम प्रकारची 
 केळीसह पूर्वहंगामी कापूसही काही शेतकरी अनेक वर्षांपासून घेतात.  

केळीची उत्पादकता वाढली 

पिलखेडेत बागायती क्षेत्र सुमारे ८५ टक्के आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी पारंपरिक पद्धतीने कंदांचा वापर करून इथले अधिकाधिक शेतकरी केळीची लागवड करायचे. पुढे जमिनी जशा कडक होऊ लागल्या तसे उत्पादन कमी होऊ लागले. उत्पादकता प्रतिरास १४ किलोपर्यंत आली. करपा रोगाचे संकटही २०११-१२ मध्ये आले. प्रमुख पीक संकटात आल्याने शेतकरी एकवटले. त्यांनी आदर्श पीक व्यवस्थापनाचे सामूहिक प्रयत्न सुरू केले. रोगग्रस्त झाडांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यावर भर दिला. 

सुधारणा केली, फरक दिसला  
आज ठिबकचा वापर गावात जवळपास ९० ते १०० टक्के असावा. ऊतिसंवर्धित रोपांचा वापरही वाढला आहे. पीक फेरपालट कटाक्षाने केली जाते. केळीची उत्पादकता तीन- चार वर्षांत हळूहळू वाढली. ती प्रतिरास २० किलोपर्यंत आणण्यात शेतकऱ्यांनी यश मिळविले. केळीचे क्षेत्र घटू दिले नाही. केळीचे मार्केटिंगही शेतकरी व्यवस्थितपणे करतात. केळी दर्जेदार असल्याने व्यापारी थेट गावात येऊन मोठ्या वाहनातून केळीची वाहतूक करतात. 

मार्चपर्यंत केळी उपलब्ध  
किलोमागे दीड ते दोन रुपये जादा दर अनेक शेतकऱ्यांना मिळताे. एकरी २५ टन व काहीवेळा त्याहून अधिक उत्पादन पिलखेडेचे शेतकरी घेऊ लागले आहेत. सचोटीने व्यवहाराचे सूत्र शेतकऱ्यांनी बांधल्याने मंदीच्या काळातही व्यापारी पिलखेडे येथील केळीची खरेदी टाळत नाहीत. नोव्हेंबरपासून केळी कापणीसाठी उपलब्ध होऊ लागते. ती मार्चपर्यंत सुरू असते. 

जमीन सुपीकतेचे महत्त्व जाणले 
जमीन सुपीकतेचे महत्त्व गावातील अनेकांना पटले आहे. केळीचे अवशेष अगदी जाड खांबही शेतात  कुजविण्यावर त्यांनी भर दिला आहे. जमिनीत सूक्ष्मजीव वाढावेत, केळीच्या शेतीला अन्नद्रव्ये जमिनीत सहज मिळावेत, यासाठी केळी लागवडीच्या शेतात उडीद, मुगाची खरिपात पेरणी केली जाते. मळणीनंतर काड शेतातच आच्छादन म्हणून पसरविले जाते. शेत नांगरून १५ ते २० दिवस पडू दिले जाते. मग जमीन भुसभुशीत करून ऑक्‍टोबरच्या अखेरीस कांदेबहार किंवा कांदेबाग केळीची लागवड केली जाते. 

कपाशीची थेट खरेदी   
दर्जेदार कापूस पिकविला जात असल्याने व्यापारी थेट गावात येऊन खरेदी करतात. जिनिंग किंवा शासकीय खरेदी केंद्रात कापूस नेण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर मागील पाच- सहा वर्षांत अपवादानेच आली असावी. 
 
गावात उच्चशिक्षितांची संख्या चांगली  
एमबीबीएस, एमडी डॉक्‍टरही या गावात घडले अाहेत. संगणक, स्थापत्य या विषयातील अभियंत्यांची संख्याही कमी नाही. व्यवसाय, नोकरीनिमित्त त्यांना शहरात राहावे लागते; परंतु शेतीशी असलेली नाळ त्यांनी तोडलेली नाही. रविवारच्या सुटीला गावी येऊन ते आपल्या शेतीचे व्यवस्थापन  करतात.  

 गावातील विकासकामे  
मुख्य चौकांमध्ये हायमास्ट दिवे, पेव्हर ब्लॉक्स. 
चोवीस तास पिण्याचे पाणी 
पाणीपुरवठा करणाऱ्या शासकीय कूपनलिकांचे पंप नादुरुस्त झाले तर     साई मंदिरापासून पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र जलवाहिनी घेऊन पाण्याची     पर्यायी व्यवस्था
अंतर्गत रस्त्यांचे १०० टक्के काँक्रिटीकरण 
प्राथमिक शाळा गावात असून स्वच्छतेवर भर 
भांडण, तंटे यांच्यापासून दूर राहण्याचा ग्रामस्थांचा भर 
मूळ गावचे मात्र सध्या पुण्यात राहणाऱ्या जीवन व किरण चौधरी या     बंधूंनी गावात साई मंदिराची स्थापना केली. दारूबंदीबाबतही काटेकोर     अंमलबजावणी. मंदिराची पाच वर्षांपूर्वी स्थापना झाल्यापासूनच ही     कार्यवाही प्रभावीपणे होऊ लागल्याचे ग्रामस्थ म्हणतात. दिवाळीच्या वेळेस वार्षिक साई पालखी सोहळा. चौधरी बंधूंनी गावातील होतकरू     युवकांना पुण्यात रोजगार मिळवून दिला आहे.
विविध कार्यकारी सहकारी सोसायटी कार्यरत. सन २०१६ पर्यंत वसुली     १०० टक्के. सुमारे दोन कोटींवर वित्तपुरवठा सोसायटी प्रत्येक खरिपात     करते.
शेतशिवारातील रस्ते उत्तम असावेत, यासाठी ग्रामस्थ मागील ८ ते १०     वर्षांपासून निधी संकलित करतात. -खडी व वाळूचे उत्तम रस्ते तयार.     आत्तापर्यंत पाच रस्त्यांचे सुमारे २० किलोमीटर अंतरात खडीकरण
काही ठिकाणी वाळू टाकून शेतरस्ते तयार
गिरणा नदीत वाळूचोरीचे प्रकार टाळण्यासाठी ग्रामपंचायत लिलावासाठी सकारात्मक ठराव देत नाही. 
ही चोरी थांबविण्यासाठी ग्रामस्थही विरोध करतात. अनेकदा वाळूचोरी     करणारी वाहने ग्रामस्थांनी पकडली आहेत. 

गावात शेती व ग्रामविकास हे एकमेकांच्या हातात हात घालून चालतात. ग्रामस्थांची एकी, शिक्षणासंबंधीचा सकारात्मक दृष्टिकोन यातूनच या बाबी साध्य होत आहेत. ग्रामस्थ केळीची आधुनिक शेती करतात.  
- दत्तात्रेय चौधरी, शेतकरी  

गावातील मुले, मुली शिकूनसवरून मोठी झाली. त्यांची गाव, शेतीशी नाळ कायम आहे. यामुळे समृद्धी टिकून आहे. शेतीमुळे गावाचा विकास झाला आहे. 
- उमानंद चौधरी, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com