काळजीपूर्वक करा तलावात मत्स्यबीजाची जोपासना

fish seed
fish seed

तलावातील पाण्याचे तापमान थंड असताना बीज संचयन केल्यास बीज मरतूक टळते म्हणूनच बीज संचयन सकाळी अथवा संध्याकाळी करावे. मत्स्यबीज अथवा बोटुकलीची वाहतूक करताना वापरात येणाऱ्या पिशव्या प्रथम हवा भरून फुटलेल्या नाहीत याची खात्री करून घेणे महत्त्वाचे असते. प्राणवायू भरलेल्या मत्स्यबीजाच्या पिशव्यांचे तापमान वाहतुकीदरम्यान वाढते. त्यामुळे मत्स्यबीज संचयनापूर्वी बीजांचे, ज्या तलावात मत्स्यबीज साठवणूक करणार आहोत, त्या तलावाच्या तापमानाबरोबर अनुकूलन करणे आवश्यक असते.


मत्स्यबीज अथवा बोटुकली सोडताना प्लॅस्टिक पिशवीतील बीज सरळ तळ्यात सोडू नये. सर्वप्रथम मत्स्यबीज अथवा बोटुकली असलेली पिशवी तोंड बंद असलेल्या अवस्थेत तलावात पंधरा मिनिटे बुडवून ठेवावी. त्यानंतर पिशवीचे तोंड सोडून तिच्यात तळ्यातील थोडेसे पाणी घ्यावे. अशा अवस्थेत पिशवी तलावात सुमारे पाच मिनिटे तरंगत ठेवावी. तळ्यातील पाण्याची पिशवीतील बीजास थोडीशी सवय झाल्यानंतर पिशवीचे तोंड तळ्याच्या पाण्यात बुडवून पिशवी वाकडी करावी. म्हणजे बीज हळूहळू पोहून तळ्यात मिसळते. 

पिशवीच्या तळांच्या खाचांमध्ये काही बीज अडकून राहत असल्याने बीज सोडल्यानंतर पिशवीत पुन्हा पाणी घेऊन ती चांगली हलवावी व अडकलेले बीज मोकळे करून मग सोडावे. मत्स्यबीज अथवा बोचुकली सोडण्याचे प्रमाण हे तळ्याची उत्पादकता व आकार यावर अवलंबून असते.

मत्स्यजिरे सोडण्याच्या आदल्या दिवशी ३०० किलो सुपर फॉस्फेट (१६ टक्के स्फुरद), ७०० किलो शेण, ७०० किलो शेंगदाण्याची पेंड या प्रमाणात प्रति हेक्टरी खत द्यावे. 
मत्स्यजिरे सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रति हेक्टरी ३५० किलो पेंड व ९० किलो शेण मिसळावे. तिसऱ्या दिवशी १७५ किलो पेंड व ४५ किलो शेण टाकावे. चौथ्या ते पंधराव्या दिवसांपर्यंत दररोज १०० किलो पेंड, १०० किलो भाताचा कोंडा प्रति हेक्टरी या प्रमाणात मिसळावे. 

सोळाव्या दिवसांपासून मत्स्यबोटुकली तयार होईपर्यंत बाजारात उपलब्ध असलेले बारीक आकाराचे कृत्रिम खाद्य शरीराच्या वजनाच्या १० टक्के दराने दिल्यास माशांची वाढ चांगली होते.

मत्स्यसंगोपन, खाद्यव्यवस्थापन -
१) संगोपन तळी मातीची व आयताकृती असावीत म्हणजे त्यातून जाळे फिरवून बीज काढणे सोपे जाते. जास्तीचे पाणी बाहेर जाण्यासाठी मोरी बसवून त्यातून बीज वाहून जाऊ नये म्हणून त्यावर बारीक घरांची जाळी बसवावी. 

२) तलावाचा तळ न पाझरणारा, पाणी टिकवून धरणारा असावा. संगोपासाठी तळ्याचे क्षेत्रफळ ५०० ते २००० चौ. मीटर असणे नियोजनाच्या दृष्टीने योग्य असते. संगोपन तलावात पाण्याची खोली १ मीटर असावी. 

३) मत्स्यजिरे ते मत्स्यबीज होण्यासाठी जवळजवळ एक महिना लागत असून, जगणुकीचे प्रमाण ४० ते ५० टक्के मिळते. तसेच मत्स्यबीज ते मत्स्यबोटुकली होण्यासाठी दोन महिने लागत असून, जगणुकीचे प्रमाण ६० ते ७० टक्के मिळते.

संगोपन तलावात मत्स्यजिरे अथवा मत्स्यबीज साठवणूक करावयाचे असल्यास साठवणुकीचा दर  ः
मत्स्यजीरे साठवणूक  
४००-५०० मत्स्यजीरे/ वर्ग मीटर
मत्स्यबीज (१ ग्रॅम) साठवणूक  १०-१५ मत्स्यबीज/ मीटर

डॉ. विवेक वर्तक - ९८२१९०५३५१ (खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल, जि. रायगड )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com