दुष्काळी भागात चाराटंचाईचे सावट 

दुष्काळी भागात चाराटंचाईचे सावट 

सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी भागात ज्वारीची पेरणी झाली; पण पाण्याअभावी ज्वारीची वाढ खुंटली. त्यामुळे ती जनावरांना वैरण म्हणून देण्यात आली. 

आता ही वैरणदेखील संपली आहे. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. परिणामी शेतकरी चाऱ्याचे आत्तापासून नियोजन करू लागले आहेत. जत तालुक्‍यातील शेतकरी वैरण विकत घेण्यासाठी इतर भागांत जाऊ लागले आहे. सध्या 300 ते 600 रुपये शेकडा दराने वैरण विकत घेऊन जनावरे जगवण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. ही स्थिती बघता पंधरा दिवसांनंतर चाराटंचाई अधिक गंभीर होणार असल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठे महांकाळ या दुष्काळी भागात जनावरांच्या चाऱ्यासाठी ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु या पट्ट्यात कमी पाऊस झाला. याचा थेट परिणाम ज्वारी पिकावर झाला. त्यामुळे या पिकाची वाढ खुंटली. परिणामी ही ज्वारी जनावरांना चारा म्हणून देण्यात येत असल्याने चाराटंचाई जाणवली नाही. परंतु गेल्या आठ दिवसांपासून चाऱ्याची टंचाई भासू लागली आहे. आटपाडी तालुक्‍यात सध्या साखर कारखाना सुरू आहे. त्यामुळे ओली वैरण मिळत आहे.

आटपाडी तालुक्‍यातील शेतकरी 300 ते 600 रुपये अशा दराने वाडे विकत घेत आहेत. कारखाना सुरू असेपर्यंत हे वाडे विकत मिळतील; परंतु पुढे चारा कसा उपलब्ध कसा करायचा, असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे आहे. जत तालुक्‍यातील कारखान्याचे गाळप ऊसटंचाईमुळे दोन महिन्यांपूर्वीच बंद झाले आहे. तसेच या तालुक्‍यातील पिकांचे दुष्काळामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांना चाराटंचाईला सामोरे जावे लागते आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यात म्हैसाळ योजनेचे पाणी आले असल्यामुळे चारापिकांची पेरणी करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. म्हैसाळ योजनेचे पाणी आल्याने कवठेमहांकाळत तालुक्‍यातील चाऱ्याचा प्रश्‍न सध्यातरी सुटला आहे. 

पशुपालक चिंतेत 
दुष्काळी भागात चाऱ्याची टंचाई निर्माण झाली, की या भागातील शेतकरी सांगली जिल्ह्यातील ऊस पट्ट्यातील ऊस खरेदीसाठी धाव घेतात. परंतु ऊसटंचाई असल्याने गाळपालाच ऊस कमी पडत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना चारा म्हणून ऊस उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

चाऱ्याची टंचाई जाणवू लागली आहे. सध्या उसाचे वाडे 300 ते 600 रुपये शेकडा या दराने विकत घेत आहे. परंतु पुढील पंधरा दिवसांत चाऱ्याची तीव्र टंचाई भासणार आहे. 
- भारत माने, शेतकरी, शेटफळे, ता. आटपाडी, जि. सांगली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com