आरोग्यास लाभदायी फलाहार

Fruits
Fruits

पौष्टिक आहार जसा महत्त्वाचा असतो, तसाच फलाहारही महत्त्वाचा असतो. काही फळे औषध म्हणूनही कार्य करतात. फळांचा रस, फळांच्या साली, काही फळांच्या बियासुद्धा आरोग्यदायी असतात.


डाळिंब : डाळिंब पित्तशामक आहे. वारंवार पित्ताचा त्रास होत असेल, तर डाळिंब भरपूर प्रमाणात सेवन करावे. थकवाही कमी होतो. मोठ्या आजारानंतर थकवा, घशाला कोरड पडणे, गळून जाणे ही लक्षणे दिसून येतात. अशावेळी डाळिंबाचे दाणे रोज खावेत किंवा रस सेवन करावा. हृदयाला हितकर असे डाळिंब वृद्धापासून बालकांपर्यंत सर्वांनी सेवन करावे. डाळिंबाच्या फळाची साल, १/४ चमचा सुंठ, बडीशेप घालून पाणी उकळावे. हे पाणी सेवन केल्यास वारंवार होणारे जुलाब लवकर थांबतात. पोटदुखी कमी होते. डाळिंबाचा रस, जिरेपूड आणि साखर घालून सेवन केल्यास अजीर्णावर चांगला परिणाम होतो.

जांभूळ : मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी जांभळे रोज खावीत. विशेषतः बियांचे चूर्ण यासाठी फायदेशीर असते. म्हणून जांभळाच्या हंगामात हे चूर्ण करून ठेवावे किंवा काष्ठौषधीच्या दुकानातून आणून ठेवावे. जांभळाचे झाड जवळपास असेल तर त्याची कोवळी पाने उलट्यांवर उत्तम काम करतात. पानांचा रस मधासह द्यावा. जुलाब, आव पडणे अशा लक्षणांत पानांचा काढा उपयोगी पडतो. तोंड आले असल्यास जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्या केल्यास उपयोग होतो. अर्थातच या सर्व लक्षणांची कारणे शोधून पोटात औषधे घेणे आवश्यक असतेच.

केळी : केळी अतिशय फलदायक म्हणून काम करते. पण ज्यांची पचनशक्ती मंद आहे आणि ज्यांना कफाचा त्रास भरपूर होतो त्यांनी प्रथम त्रास कमी करावा. त्यानंतर केळी खावीत. व्यवस्थित पिकलेली सोनकेळी तुपासमवेत सेवन केल्यास थकवा कमी होतो. वजन वाढते.

सफरचंद : आम्लपित्त, अन्न घशाशी येणे, तोंडाला पाणी सुटणे, अजीर्णाचा त्रास या सर्व लक्षणांत सफरचंद उत्तम कार्य करते. ज्यांना चावता येत नाही त्यांना रस द्यावा. उष्णता कमी होते, पोट साफ होण्यास मदत होते, अंगातील कडकी, तोंड येणे यासाठी सफरचंद रोज खावे.

संत्री, मोसंबी, कलिंगड, द्राक्ष अशी ऋतूंनुसार उपलब्ध होणारी फळे त्या त्या ऋतूंमध्ये जरूर खावीत. संत्र्याची साल वाळवून सुकवून शिकेकाईत घातल्यास केसांसाठी चांगला फायदा होतो. सीताफळांच्या बियांचे चूर्ण केसाच्या मुळाशी लावल्यास उवांचे प्रमाण कमी होते.

फळे सेवन करताना सर्वांत महत्त्वाची दक्षता घ्यायची म्हणजे, फळे+दूध एकत्र करून खाऊ नयेत. त्यामुळे सीताफळ रबडी, मिल्कशेक, शिकरण यात फळे असली, तरी दुधाशी संयोग झाल्याने पुढे त्रासदायक लक्षणे निर्माण होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com