तब्बल २२ वर्षांपासून मिरची पिकातील ध्यास

तब्बल २२ वर्षांपासून मिरची पिकातील ध्यास

नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमेलगत आहे. लाल मिरचीची वैशिष्ट्यपूर्ण शेती ही नंदुरबारची ओळख आहे. जिल्ह्याच्या सीमेपलीकडे गुजरात राज्य लागते. सीमेजवळ अनेक प्रयोगशील शेतकरी पाहण्यास मिळतात. त्यातीलच योगेश पटेल हे एक. त्यांचे पिंपळोद हे गाव गुजरातेत असले तरी नंदुरबार शहरापासून केवळ १४ किलोमीटरवर आहे. या गावातील अनेक शेतकऱ्यांची शेती महाराष्ट्रात म्हणजेच नंदुरबार तालुक्‍यातील शिंदे, लहान शहादे या गावांमध्ये दिसून येते.  

पटेल यांची शेती 
पिंपळोद सुमारे पंधराशे लोकसंख्येचे गाव अाहे. निझर हे तालुक्‍याचे ठिकाण पिंपळोदपासून १० किलोमीटर वर आहे. येथील प्रमुख पीक कापूस. पपई व केळीही दिसते. तापी नदी गावापासून सुमारे दोन किलोमीटरवर आहे. पाण्याचे संकट बागायतदारांसमोर उन्हाळ्यात असतेच. जमीन काळी कसदार, त्यातच शेतकरी मेहनती असल्याने पिकेही चांगली घेतात. पिंपळोदचे योगेश पटेल यांची ५५ एकर बागायती शेती आहे. तीन विहिरी व पाच कूपनलिका आहेत. पाण्याचे संकट त्यांच्यासमोरही असतेच. लहान बंधू रितेश यांचे निझर तालुक्‍यातच चिंचोल गावानजीक वाका चाररस्ता येथे कृषी केंद्र आहे. दोन्ही बंधू एकत्र असून, योगेश हे पूर्ण शेतीचे व्यवस्थापन करतात. 

आधुनिक तंत्रज्ञानाचा  अवलंब - ठळक बाबी
 योगेश यांचे वडील विठ्ठल पूर्वीपासून मिरची पीक घेतात. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली योगेश यांनी सुमारे २२ वर्षांपासून या पिकात ठेवले सातत्य.
 एकूण ५६ एकरांपैकी सुमारे २५ एकरांत मिरची असते. यंदा दरांच्या समस्येमुळे हे क्षेत्र साडेअकरा एकरांपर्यंत.  
 उंच गादीवाफा, सूक्ष्म सिंचन, एकात्मिक कीड व्यवस्थापन या बाबींवर भर. 
 दरवर्षी नाशिक भागातून रोपे आणून जून-जुलैमध्ये लागवड. मार्च-एप्रिलपर्यंत प्लाॅट चालतो.
 जूनच्या काळात पिंपळोद, नंदुरबार भागात हवेचा वेग अधिक. त्यामुळे मल्चिंग फाटू लागले. यंदा मात्र त्याचा वापर टाळला. 
 सर्व एकरांत ठिबक. लागवड पाच बाय सव्वा फुटावर. एकरी सुमारे सात हजार रोपे. 
 व्यवस्थापनातील सर्व बाबी वेळेवर. किडी-रोग येऊ नये म्हणून ‘प्रिव्हेंटिव्ह’ उपाय. त्यामुळेच की काय यंदा विषाणूजन्य रोगामुळे नंदुरबार भागातील मिरचीचे मोठे नुकसान झाले. पण योगेश यांनी हंगाम साधता आला. 
 गुणवत्तापूर्ण दोन ते अडीच इंच लांब, हिरवीगार, चमकदार मिरची.  
 एकरी दोन लाखांपर्यंत खर्च.  
 लहान व मोठे ट्रॅक्‍टर. सुमारे ६० मजूर वर्षभर कार्यरत. 
 नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथून गरजेनुसार एचटीपी फवारणी पंप बनवून घेतला आहे. सुमारे ८० हजार रुपये खर्च त्यासाठी आला. सहा मजूर फवारणी वेळी लागतात. एका दिवसात २० ते २२ एकर क्षेत्रात लहान ट्रॅक्‍टरच्या मदतीने फवारणी होते. 
 दरवर्षी सुमारे २० एकरांवर कापूस. पपईही असते. कापसाचे एकरी १५ क्विंटल तर पपईचे ३० टनांपर्यंत उत्पादन. 

 उत्पादन 
 लाल मिरची- सरासरी १५० क्विंटल, कमाल २०० क्विं.
 हिरवी- सरासरी- २५० क्विं. कमाल ३०० ते ३५० क्विं. 


विक्री तंत्र, बाजारपेठ आत्मसात केली  
योगेश उत्पादनात जसे कुशल झाले त्याचप्रमाणे विक्री तंत्रही चांगलेच आत्मसात केले. 
 बाजारपेठेत कोणत्या वाणांना किती मागणी आहे याचा अभ्यास करूनच त्यानुसार वाण बदल व लागवड.  
    मुंबई, नाशिक, सुरत, अहमदाबाद येथील बाजारांचा अभ्यास. मुंबई येथील काही निर्यातदारांशी ओळख करून घेतली. 
    मागील वर्षी डिसेंबरमध्ये चार दिवस व यंदा फेब्रुवारीत सात दिवस दुबईत मिरची, बाजारपेठेच्या अभ्यासासाठी स्वःखर्चाने जाऊन     आले. काही व्यापाऱ्यांशी ओळख करून मागणी, पुरवठा यांची सविस्तर माहिती घेतली. 
    लाल मिरचीची मागील वर्षी २५०० रुपये प्रति क्विंटल दराने नंदुरबारात विक्री. हिरव्या मिरचीला चांगली बाजारपेठ व दर बऱ्यापैकी     मिळाल्याने यंदा त्यावर अधिक भर. 
    सुरवातीच्या सुमारे सहा तोड्यांची विक्री अहमदाबाद, सुरत, मुंबई येथे होते. तेथील व्यापाऱ्यांकडून तशी आगाऊ नोंदणी असते.     काही प्रमाणात नंदुरबार व नजिकच्या भागातही विक्री. तरीही मुंबई हेच दरांच्या बाबतीत चांगले मार्केट राहिल्याचे योगेश म्हणाले.

   मिरचीसाठी व्हॉटसॲप ग्रुप 
योगेश यांनी मिरची उत्पादकांचा व्हॉट्‌सॲप ग्रुप बनविला अाहे. त्यात अमरावती, नाशिक, नंदुरबार, अहमदाबाद, सुरत आदी भागातील मिरची उत्पादकांचा समावेश आहे. हवामान व बाजारपेठ या बाबींवर ग्रुपमध्ये सातत्याने चर्चा होते.

   प्रतवारी व पॅकिंगही 
प्रतवारी व साठवणुकीसाठी शेतात लहान शेड उभारले आहे. प्रतवारीनंतर प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये पॅकिंग होते. मागील वर्षी डिसेंबरमध्ये दुबई येथे मुंबईतील व्यापारी मित्राच्या मदतीने हिरव्या मिरचीचे दोन कंटेनर पाठविले. किलोला ३२ रुपये दर मिळाला. त्यावेळी देशांतर्गत बाजारातही २२ रूपये एवढा कमी दर होता असे योगेश म्हणाले. दुबईसाठी चार किलो क्षमतेचे बॉक्‍स पॅकिंग केले. सहा तोड्यांतील मिरची पुरवठादारांना दिली. त्यांच्यामार्फत ती व्यापारी व तेथून दुबईला गेली. त्याला ४५ ते ६० रुपये प्रति किलो दर मिळाला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com