परभणीत शासकीय तूर खरेदी सुरू

परभणीत शासकीय तूर खरेदी सुरू

परभणी - जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयाअंतर्गत परभणी येथील एमआयडीसीमधील खरेदी केंद्रावर शनिवार (ता. २९) दुपारी चार वाजल्यापासून राज्य शासनाकडून तूर खरेदी सुरू झाली आहे. अन्य सहा केंद्रांवर मंगळवार(ता. २)पासून तूर खरेदी सुरू होईल, असे विपणन अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

शनिवार (ता. २२) पासून नाफेड, भारतीय अन्न महामंडळातर्फे केली जाणारी तूर खरेदी बंद करण्यात आली. परंतु या केंद्रावर शनिवार (ता.२२) पर्यंत आवक झालेली जवळपास ३७ हजार ९८४ क्विंटल तुरीचे वजनमाप करायचे राहिले होते.

तूर खरेदीसाठी राज्य शासनाने दिलेल्या घेतेलेल्या निर्णयानंतर जिल्हा विपणन अधिकारी यांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या केंद्रावर तूर खरेदी करताना शेतकऱ्यांकडून सात-बारा उतारा, तूर पिकाची नोंद असलेले पेरा पत्रक, कृषी विभागाने निश्चित केलेल्या हेक्टरी उत्पादनानुसार शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात येणार आहे. यापूर्वी शासनास कुठे, किती क्विंटल तूर विक्री केली याबाबत स्वयंघोषणापत्र शेतकऱ्यांस द्यावे लागणार आहे. केंद्राच्या कार्यक्षेत्राबाहेरील गावातील शेतकऱ्यांची तसेच व्यापाऱ्यांची तूर खरेदी करता येणार नाही. उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षेतेखाली स्थापन करण्यात आलेली नियंत्रण समिती तसेच बाजार समिती स्तरावर स्थापन करण्यात आलेली संनियंत्रण समिती खरेदी केंद्रावरील व्यवहारावर देखरेख ठेवणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातून आदेश प्राप्त झाल्यानंतर शनिवारी (ता.२२) दुपारी परभणी येथील एमआयडीसीमधील खरेदी केंद्रावर तूर खरेदी सुरू करण्यात आली. रविवारी (ता.३०) देखील तूर खरेदी सुरू होती. जिंतूर, सेलू, मानवत, गंगाखेड, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, जवळाबाजार या ठिकाणी मंगळवार (ता. २) पासून तूर खरेदी सुरू होईल. आवश्यक तेथे बारदाणा उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे विपणन अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

मापापूर्वीच तुरीची चोरी
परभणी येथील शासकीय तूर खरेदी केंद्रावर वजनमापासाठी रांगेत थांबलेल्या तुरीच्या पोत्यांनी भरलेला ट्रक चोरीस गेला. ही घटना रविवारी (ता. ३०) पहाटे तीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नऊ एप्रिल रोजी नांदखेडा येथील तीन आणि नांदगाव (ता. परभणी) येथील सहा अशा एकूण नऊ शेतकऱ्यांची अंदाजे वजन १९१ क्विंटल तूर घेऊन आलेला ट्रक (क्रमांक एमएच २२, झेड-४६०) वसमत रस्त्यावरील शासकीय तूर खरेदी केंद्रावर वजनामापासाठी थांबलेला होता. रविवारी (ता. ३०) सकाळी ट्रकचालक आकाश प्रकाशराव धस (रा. आलापूर-पांढरी, ता. परभणी) याला थांबलेल्या ठिकाणी ट्रक निदर्शनास आला नाही. ही बाब संबंधित शेतकऱ्यांना कळविल्यानंतर शेतकऱ्यांनी नवा मोंढा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अच्युत भराड, बाजीराव भराड, श्रेणिक भराड (सर्व रा. नांदखेडा), रेखा पांडे, सुनील पांडे, विलास जवंजाळ, प्रकाश जवंजाळ, भास्कर जवंजाळ, आबासाहेब धस (रा. नांदगांव) या नऊ शेतकऱ्यां-यां एकूण १९१ क्विंटल (हमीदरानुसार किंमत ९ लाख ६४ हजार ५५० रुपये) तूर भरलेला ट्रक चोरी गेला. याप्रकरणी ट्रकचालक आकाश धस यांनी नवा मोंढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. फौजदार ए. व्ही. मुपडे तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com