सौरऊर्जेद्वारे चार हजार  गावांना शाश्वत पाणी

सौरऊर्जेद्वारे चार हजार  गावांना शाश्वत पाणी

पुणे  - ग्रामीण भागात लोडशेडींगच्या काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागते किंवा पाटपीट करत दूरवरून पाणी आणावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने राज्यात नऊ वर्षांपासून सौरऊर्जेवर आधरित दुहेरी पंप नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास चार हजार १८९ गावांचा पाणीप्रश्न सुटला असून नागरिकांना शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. 

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत ज्या वाड्या, वस्त्या विंधन विहिरींवर अवलंबून आहे. अशा वाड्या वस्त्याकरिता २००९-१० पासून सौरऊर्जेवर आधारित दुहेरी पंप लघुनळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. ज्या वाड्या वस्त्याजवळ विद्युत पुरवठा उपलब्ध नाही, विद्युत पुरवठा घेणे किफायतशीर नाही, तसेच ज्या ठिकाणचा विद्युत पुरवठा शाश्वत नाही, ज्या वाड्या वस्त्या पिण्याच्या पाण्याकरिता केवळ हात पंपावरच अवलंबून आहेत. अशा वाड्या वस्त्यांकरिता ही अत्यंत उपयुक्त योजना आहे. या योजनेमध्ये विंधण विहिरीवर हात पंपासमवेत सौरपंपाची उभारणी करण्यात येते. सौरऊर्जा पंपाचा उत्सर्ग साठवण टाकीत साठवून पाईप लाईनद्वारे घरोघरी पाणीपुरवठा करण्यात येतो. हात पंप व सौरपंपाची उभारणी स्वतंत्ररीत्या विंधण विहिरीत केली असल्याने हातपंप नादुरुस्त झाल्यास सौरपंपाद्वारे किंवा सौरपंप नादुरुस्त झाल्यास हात पंपाद्वारे अव्यातपणे पाणीपुरवठा सुरू राहतो. ही योजना सौरऊर्जेवर आधारित असल्याने विद्युतभाराचा खर्च निरंक आहे. या योजनेची देखभाल दुरुस्ती अत्यंत सुलभ आहे. 

अस्तित्वातील उच्च क्षमतेच्या विंधण विहिरीमधील हातपंपासोबत एक अश्वशक्तीचा सौरपंप बसविण्यात येतो. या पंपाचे पाणी पाच हजार लीटर क्षमतेच्या टाकीत साठवून तीस ते चाळीस घरांना घरगुती नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच नजिकच्या घरांच्या छतावरील पावसाचे पाणी संकलन करून विंधण विहिरींचे पुनर्भरण करण्यात येते. या योजनेची खर्चाची आर्थिक मर्यादा पाच लाख दहा हजार रुपये एवढी आहे. या प्रक्रियेत ग्रामपंचायत स्तरावर येणाऱ्या अडचणी विचारात घेता व योजना राबविण्यास गतिमानता व गुणवत्ता येण्याच्या दृष्टीने ही योजना राबविण्यासाठी सुधारीत सूचना २१ जानेवारी २०१६ नुसार निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता या योजना उपअभियंता, यांत्रिकी उपविभाग, जिल्हा परिषद यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. 

योजनेची वैशिष्ट्ये 
हात पंप आणि सौरऊर्जेवर आधारित पाणीबुडी पंपाची एकाच विंधण विहिरीत उभारणी 
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने विकसित केलेल्या स्पेशल वॉटर चेंबरचा वापर  चोवीस बाय सात शाश्वत पाणीपुरवठा  
घरोघरी नळाद्वारे, सार्वजनिक नळकोंडाळ्याद्वारे वस्तीजवळ पाणीपुरवठा 
सौरपंपासाठी बॅटरीची आवश्यकता नाही 
अत्यंत कमी देखभाल दुरुस्ती
वीजबिलाच्या खर्चाची बचत 
प्रदूषण विरहीत तंत्रज्ञान 

योजनेचे फायदे 
वीजबिलाच्या खर्चाशिवाय घरोघरी पाणीपुरवठा 
हात पंप बंद असल्यास सौरपंपाद्वारे पाणीपुरवठा 
सौरपंप बंद असल्यास हात पंपाद्वारे पाणीपुरवठा 
पाण्याची पातळी खोल गेल्यास हात पंप बंद पडला, तरी ५७ मीटरपर्यंत सौर पंपाद्वारे पाणी उपसा 
सौरपंप आपोआप चालू, बंद होण्याची व्यवस्था  

जिल्हानिहाय बसविलेले सौरपंप 
पालघर १४, ठाणे १६६, रायगड १७४, रत्नागिरी ८१, सिंधुदुर्ग १३४, नाशिक ४७, धुळे ११, जळगाव ३७, नंदुरबार ३०७, नगर ३९, पुणे १५५, सातारा १०२, सांगली १८९, सोलापूर ९२, कोल्हापूर ६७, औरंगाबाद ५७,जालना १२६, परभणी १७७, हिंगोली १३६, नांदेड १४२, लातूर २१०, उस्मानाबाद ११३, बीड १४६, अमरावती ४६, यवतमाळ ९०, बुलढाणा २२, अकोला ५, वाशीम २०, नागपूर २०, वर्धा १३, भंडारा २३४, चंद्रपूर ३००, गडचिरोली ३३०, गोंदिया ३८७ 

वेळेवर वीज उपलब्ध न झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. ही समस्या कमी करण्याकरिता वीज सौरऊर्जेवर आधारित दुहेरी पंप नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे चार हजार गावांतील नागरिकांना शाश्वत पाणी मिळाले आहे. 
- शेखर गायकवाड, संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com