संगमनेरमध्ये वादळी पावसाचा तडाखा

चार जणांचा बळी; घरांची पडझड, खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित
Rain water
Rain waterSakal

संगमनेर - संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथे वादळी पावसात घर अंगावर पडून चौघांचा मृत्यू झाला, अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. विठ्ठल भीमा दुधवडे (वय ७५), हौसाबाई भीमा दुधवडे (वय ८०) व साहिल पिनू दुधवडे (वय १०) यांचा मृत्यू झाला, तर मालदाड येथे वादळी पावसात झाड अंगावर पडून सुरेखा राजू मधे (वय २८) यांचा मृत्यू झाला.

तालुक्यातील वडगाव पान, कोल्हेवाडी, सुकेवाडी, घुलेवाडी, पोखरी हवेली परिसराला वादळी पावसाचा तडाखा बसला. या परिसरात वादळी पावसात अनेक झाडे उन्मळून पडली. पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले. वादळी पावसाने ठिकठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने गुरुवारी वीजपुरवठा विस्कळित झाला होता. संगमनेर तालुक्यात गुरुवारी वादळी पाऊस व अतिवृष्टीमुळे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले असून, संबंधित गावच्या तलाठ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचेही तहसीलदार निकम यांनी सांगितले.

दरम्यान, संगमनेर शहरासह तालुक्यात दुपारी सव्वातीनच्या सुमारास अचानक जोरदार वाऱ्यासह गारा व मुसळधार पावसाने हजेरी लावली. वाऱ्याच्या जोरामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडले, तर काही ठिकाणी घरावरील विजेचे कनेक्शनही तुटून पडले. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे अनेकांची धावपळ उडाली.

रोहिणी नक्षत्राच्या पावसाने जिल्ह्यात पाठ फिरवली. मात्र, मृगाने खरिपासाठी दिलासादायक वातावरण निर्माण केले आहे. संगमनेर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरणीसाठी सज्ज असलेले शेतशिवार समाधानाने फुलले आहे. आज दुपारी सव्वातीनच्या सुमारास अचानक ढग गोळा झाले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसानेही हजेरी लावली. सुमारे पाऊण तास चाललेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. वेगवान वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले, तसेच रस्त्यांवर झाडे उन्मळून पडली. अचानक आलेल्या पावसामुळे, तसेच त्याबरोबर गारांचा मारा बसल्याने टोमॅटो, कांदा, डाळिंबउत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला होता. शिवारात खरिपाच्या पूर्वमशागतीची कामे युद्ध पातळीवर सुरू होती. पावसामुळे पेरणीस वेग येणार आहे.

११६ घरांचे नुकसान

तालुक्यात झालेल्या पावसाने ११६ घरांचे नुकसान झाले. मंडलनिहाय पडलेल्या घरांची संख्या पुढील प्रमाणे ः साकूर- १३, संगमनेर-३५, धांदरफळ- सात, समनापूर- दहा, तळेगाव- एक, पिंरपणे-४९, घारगाव- एक.

वादळी वाऱ्यासह अकोल्यात पाऊस

अकोले - तालुक्यात राजूर, भंडारदरा पाणलोट क्षेत्रात आज (गुरुवारी) सायंकाळी पाचनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. वादळाने काही ठिकाणी झाडे व विजेचे खांब पडले.

सुरवातील हलक्या सरी आल्या. मात्र, काही काळानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. भंडारदरा येथे काजवे पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची मोठी धावपळ उडाली, तर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. खळ्यावर पडलेल्या भुईमुगाच्या शेंगा प्लॅस्टिक कागदाने झाकताना शेतकऱ्यांची त्रेधा उडाली. रस्त्यावर पावसाचे पाणी वाहत होते. लग्नाचे मंडप भिजले, तर आंबा पिकाचे नुकसान झाले. भंडारदरा, रतनवाडी, घाटघर परिसरातील पावसाचे प्रमाण अधिक होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com