शेगावचे गजानन महाराज ‘गण गण गणात बोते’ हा मंत्र का म्हणायचे?

Akola Buldana Shegaon News Why should Gajanan Maharaj of Shegaon say Gana Gana Ganaat Bote?
Akola Buldana Shegaon News Why should Gajanan Maharaj of Shegaon say Gana Gana Ganaat Bote?

अकोला: तुम्ही कधी तरी नक्की शेगावला गेला असाल, ‘अनंत कोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव-निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन पंमहाराज की जय’, या जयघोषात शेगाव येथील मंदिराचा परिसर दुमदुमुन जातो.शेगावीचे संत म्हणून ज्यांची ओळख आहे, असे गजानन महाराज यांचा आज प्रकट दिन.
माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले.  परंतु, श्री संत गजानन महाराज नेहमी एका मंत्राचा उच्चार करायचे तो म्हणजे गण गण गणात बोते, नेमका या मंत्राच्या अर्थबोधाबद्दल अनेक भाविक अनभिद्न असतात. त्या आधी आपल्याला गजानन महाराजांविषयी जाणून घ्यावे लागेल. तर चला मग शेगावला!

श्री गजानन महाराज हे वऱ्हाडातील बुलडाणा जिल्ह्यात शेगाव येथे २३ फेब्रुवारी, १८७८ रोजी ते प्रथमतः ऐन तारुण्यात शेगावी दिसले.  त्यावेळी श्रीगजानन महाराज, तेथील साधू देवीदास पातुरकर यांच्या मठाबाहेर पडलेल्या उष्ट्या पत्रावळीतील कण वेचून खात होते.  गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिऊन ते निघून गेले. पुढे ब्रह्मनिष्ठ गोविंद महाराज टाकळीकर यांचे शेगावी महादेवाच्या मंदिरात कीर्तन झाले. त्या वेळी टाकळीकर महाराजांच्या बेफाम असलेल्या घोड्याच्या चौपायांत श्री गजानन महाराज हे ब्रह्मानंदीनि मग्न होऊन निजलेले आढळले. तो द्वाड घोडा शांत होऊन स्वस्थ उभा राहिला होता. कीर्तन संपल्यानंतर गोविंद महाराज मंदिरात झोपले, परंतु त्यांचे लक्ष त्या घोड्यावर होते. रोज दांडगाई करणारा घोडा आज स्वस्थ उभा कसा ? या गोष्टीचे त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी उठून निरखून पाहिले तेव्हा गजानन महाराजांनी घोड्याच्या चौपायी शयन केलेले दिसले. दुसऱ्या दिवशी कीर्तनात टाकळीकर महाराजांनी सांगितले की, ”हा साक्षात शिव अवतार आहे. त्याची उपेक्षा करू नका.” टाकळीकरांनी त्यांची पूजा केली. ‘गण गण गणात बोते’, बोटावरी वाजवून बोटें असे ते भजन अहर्निश गात असत. म्हणून लोक त्यांना श्री गजानन महाराज असे संबोधू लागले. ते वाटेल ते खात. कोठेही पडून राहात. कोठेही संचार करीत. लोक त्यांना बहुमोल वस्त्रे, अलंकार, पैसे, खाद्यपदार्थ अर्पण करीत. पण ते सर्व तिथेच टाकून निघून जात. लोकांना त्यांच्या दर्शनाने मनःशांती मिळे.

गण गण गणात बोते
गजानन महाराज अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले ब्रह्मवेत्ते महान संत होते. त्यांचे जीवन मोठे गूढच होते. विदेही स्थितित वावरणारे गजानन महाराज परमहंस संन्यासी, जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात असत. भक्तांवर असीम कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करत, असा सर्व भक्तांचा अनुभव होता. 'गण गण गणात बोते', हा त्यांचा आवडता मंत्र. ते याचा अखंड जप करत असत. या कारणानेच त्यांना 'गिणगिणेबुवा', 'गजानन महाराज' अशी नावे पडली. वर्‍हाडातील भक्त त्यांना प्रेमाने 'गजानन बाबा' म्हणतात. त्यांच्या गण गण गणात बोते या  मंत्राचा सोपा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये.


स्वामी समर्थ आणि गजानन महाराज
अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारे साम्य आढळते. दोघेही परमहंस सन्यासी होते, दोघेही आजानबाहू होते, दोघेही अत्यंत गूढ बोलत. गजानन महाराज स्वामी समर्थ समाधीस्त होण्याच्या काही दिवस आधी शेगावात प्रगट झाले. या दोन महापुरुषांची भेट झाली, असे अनेकांचे मत आहे. स्वामी समर्थांप्रमाणे गजानन महाराज हे स्वयंभू होते. दोघांचे चरित्र वाचल्यावर त्यांच्यातील साम्य प्रकर्षाने लक्षात येते आणि हे दोघे भौतिक दृष्ट्या दोन दिसले तरी प्रत्यक्षात एकच असावे असे वाटते.

दांभिकतेचा तिरस्कार
गजानन महाराज ब्रह्मज्ञानी, महान योगी, भक्तवत्सल होते. मात्र, दांभिकतेची त्यांना चीड येत असे. विठोबा घाटोळ नावाच्या सेवेकऱ्याने महाराजांच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना घुमारे घालणे, अंगात आल्याचे नाटक करून फसविण्याचे प्रकार सुरू केले, तेव्हा महाराजांनी त्याला काठीने चांगलेच बदडून काढले. गजानन महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या , पिठीसाखर अतिशय आवडत असे. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावाने ते सेवन करीत. ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले, असे पदार्थ महाराज आवडीने खात असत. म्हणूनच महाराजांच्या भंडार्‍यासाठी इतर पक्वांनांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात.

लोकमान्य टिळक-गजानन महाराज भेट
लोकमान्य टिळक यांनी गजानन महाराजांची भेट घेतली होती. अकोल्यात शिवजयंतीनिमित्त झालेल्या एका सभेला, टिळकांबरोबर गजानन महाराजही व्यासपीठावर बसले होते. लोकमान्य टिळकांना कैद झाली, त्यावेळी महाराजांनी त्यांच्याकरिता भाकरीचा प्रसाद पाठविला आणि भविष्य वर्तवले की, टिळकांना शिक्षा अटळ आहे. महाराजांच्या भविष्यवाणीनुसार, ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी 'गीतारहस्य' ही भगवदगीतेवर टीका लिहिली. आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ गजानन महाराजांनी संपूर्णपणे शेगावात व्यतीत केला. कारणपरत्वे महाराजांनी अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव , रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या ठिकाणीही भ्रमंती केली.

खेड्या पाड्यापर्यंत पोहचले
गजानन महाराजांना पंढरीलाच समाधी घेण्याचा मानस होता. मात्र, विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले. ऋषिपंचमीला सूर्याची पहिली किरणे जमिनीवर पोहोचली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. १९६७ पासून गजानन महाराज पालखी माध्यमातून गजानन महाराज खेड्या- पाड्यापर्यंत पोहोचले. विठ्ठलाच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते. देहू ,आळंदीनंतर याच पालखीला सर्वाधिक महत्त्व आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com