31 मार्चपूर्वी आवर्जून करायला हवे असे काही!

31 march
31 march

आर्थिक वर्षअखेर आता जास्त दूर राहिलेली नाही. आर्थिक वर्ष 2016-17 चा अंतिम दिवस म्हणजे 31 मार्च. या आर्थिक वर्षाला निरोप देण्याआधी प्राप्तिकराच्या बाबतीत काही आवश्‍यक कामे आपण 31 मार्चआधी न विसरता करून घ्यायला हवीत, हे सांगण्यासाठीच केलेला हा लेखनप्रपंच! अशी कामे न केल्यास अथवा चुकून राहून गेल्यास होणाऱ्या नुकसानाचीही आपण थोडक्‍यात माहिती पाहूया.

प्रचलित प्राप्तिकर कायद्यानुसार करदाता आपले मागील दोन आर्थिक वर्षांचे प्राप्तिकर विवरणपत्र भरू शकतो. याचा सोप्या भाषेत अर्थ असा, की जर आपले आर्थिक वर्ष 2014-15 चे विवरणपत्र काही कारणास्तव दाखल करायचे राहून गेले असल्यास 31 मार्च 2017 ही अंतिम तारीख आहे, हे विसरता कामा नये. आता आपण आर्थिक वर्ष 2015-16 च्या प्राप्तिकर विवरणपत्राबाबत बोलूया. सामान्यपणे आर्थिक वर्ष संपले, की 31 जुलै ही त्या संपलेल्या आर्थिक वर्षाचे विवरणपत्र दाखल करावयाची देय तारीख असते. परंतु, बऱ्याच करदात्यांकडून देय तारखेपर्यंत असे विवरणपत्र दाखल होत नाही. अशाच प्रकारे जर आपले आर्थिक वर्ष 2015-16 चे विवरणपत्र अजूनही सादर केले गेले नसल्यास ते 31 मार्च 2017 च्या आधी दाखल केलेले उत्तम! खरे तर 31 मार्च 2017 नंतरही आपण आर्थिक वर्ष 2015-16 चे विवरणपत्र दाखल करू शकता. परंतु, 31 मार्च 2017 नंतर पाच हजार रुपयांचा दंड प्राप्तिकर अधिकारी आकारू शकतो, हे लक्षात घेणे जरुरीचे आहे.

वरील दोन्ही आर्थिक वर्षांच्या विवरणपत्राबाबत आवर्जून सांगावेसे वाटते, की आता तुम्ही देय तारखेनंतर विवरणपत्र दाखल करत असल्यामुळे आपल्याला दुरुस्तीपत्र दाखल करता येणार नाही. म्हणून आता विवरणपत्र दाखल करण्याआधी सर्व माहिती, उत्पन्नाचे स्रोत आदी गोष्टी अचूक आणि पूर्णपणे नोंदल्याची खात्री करायला हवी.

आता विचार करूया आगाऊ (ऍडव्हान्स) कराचा. सामान्यपणे पगारदार करदात्यांच्या वेतनातून मालकाकडून (कंपनी) दरमहा उद्‌गम करकपात (टीडीएस) केली जात असते. अशा बाबतीत केवळ पगाराचे उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना आगाऊ कर भरण्याची गरज भासत नाही. परंतु, पगारसोडून इतर करपात्र उत्पन्न असल्यास (भाडे, मुदत ठेवींवरील व्याज, भांडवली नफा आदी) आणि असे उत्पन्न आपल्या मालकाकडे (कंपनी) घोषित केले नसल्यास त्यावर बसणाऱ्या कराची गणना करून आगाऊ कर भरला गेला पाहिजे. आता काहीजण म्हणतील, की बॅंकसुद्धा आमच्या व्याजातून करकपात करत असतेच, मग कशाला भरायचा आगाऊ कर? तर अशा करदात्यांनी लक्षात घ्यावे, की बॅंक ठेवींच्या व्याजातून केवळ 10 टक्के दराने करकपात केली जाते. परंतु, जर तुमचे वार्षिक एकूण निव्वळ करपात्र उत्पन्न पाच लाख अथवा दहा लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास तुम्ही अनुक्रमे 20 टक्के आणि 30 टक्के करदरात येतो. तेव्हा केवळ 10 टक्के करकपात पुरेशी नाही, हे लक्षात ठेवा.

खरे तर आगाऊ कर हा सुद्धा टप्याटप्याने भरला गेला पाहिजे. परंतु तो भरला नसल्यास आताही वेळ गेलेली नाही, कारण 31 मार्च 2017 पर्यंत आर्थिक वर्ष 2016-17 साठी भरला गेलेला प्राप्तिकर हा आगाऊ करच असतो. थोडक्‍यात सांगायचे तर ज्यांचा देयकर 10 हजार रुपयांपेक्षा जास्त येत आहे, त्यांनाच आगाऊ कराच्या तरतुदी लागू आहेत. तसेच असे ज्येष्ठ नागरिक (वय 60 वर्षे किंवा जास्त) ज्यांना उद्योगधंदा अथवा व्यवसायातून काहीही उत्पन्न नसल्यास, त्यांनाही आगाऊ कर भरणे सक्तीचे नाही. अशांनी येणारा देय प्राप्तिकर आपले विवरणपत्र दाखल करण्याआधी भरला तरी चालू शकेल. नव्या नियमानुसार, जे व्यापारी एकूण उलाढालीच्या किमान आठ टक्के निव्वळ नफा दाखवून प्राप्तिकर कलम 44एडी अंतर्गत विवरणपत्र दाखल करतात, अशांना देखील आता मार्च महिन्यातील आगाऊ कराचा हप्ता भरणे जरुरीचे केले आहे. आगाऊ कर न भरल्यास अथवा कमी भरल्यास व्याजरुपी ओझे करदात्याला सोसावे लागू शकते.

प्राप्तिकर बचतीसाठीच्या गुंतवणुकीसारखी इतरही काही कामे आहेत, जी आपण 31 मार्चपूर्वी आवर्जून पूर्ण करायला हवीत. वर फक्त महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केलेला आहे, जेणेकरून नंतर करदात्याला त्रास होणार नाही, हाच त्यामागचा उद्देश!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com