लंडन : देशातील बॅंकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन फरारी झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे दिसत आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार मंगळवारी ब्रिटन सरकारने फरारी मल्ल्या यांना भारताकडे सोपविण्याचे आश्वासन दिले.
याचसोबत आयपीएलमध्ये आर्थिक अनियमिततेचा आरोप असणारे आरोपी ललित मोदी यांच्यासह 1993 मधील मुंबई बॉंबस्फोटातील आरोपी टायगर मेमन यांच्याविरोधातही कारवाई करणार असल्याचे ब्रिटनच्या वतीने सांगण्यात आले.
मल्ल्यांनी भारतातून पलायन करून लंडनमध्ये वास्तव्य केले होते. त्यांना परत आणण्यासाठी मंगळवारी ब्रिटनच्या पाचसदस्यीय प्रतिनिधी मंडळाने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीदरम्यान नवी दिल्ली येथे चर्चा केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये ब्रिटनच्या गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशिवाय भारताचे परराष्ट्र मंत्रालय अधिकारी, केंद्रीय अन्वेषणचे अधिकारी, गृह मंत्रालय आणि गुप्तचर विभागाचे अधिकारीही सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाशिवाय इतर मुद्द्यांवरही चर्चा झाली.
|