अंबोली ते आहुपे : रोमहर्षक ट्रेक

Arya Agasti
Arya Agasti

"गिरीप्रेमी-गार्डियन माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट'ने (जीजीआयएम) आयोजित केलेल्या उपक्रमात यंदा मी "उडान'चा पहिला ट्रेक केला. या ट्रेकला जाण्याचे माझे पहिले कारण म्हणजे पाऊस! पावसामुळे आपल्याला त्या ठिकाणचा विविध सुंदर दृश्‍य पाहाण्याचा अनुभव घेता येतो. जेव्हापासून मी "गिरीप्रेमी' या संस्थेत जॉईन झालो तेव्हापासूनचे सर्व पावसाळी ट्रेक मी केले आहेत. 

2017 मधील आमचा उडानचा पहिला ट्रेक हा "अंबोली ते आहुपे' होता. या ट्रेकमध्ये एक रात्र मुक्काम सुद्धा होता. या ट्रेकच्या तारखा एक व दोन जुलै होत्या. एक जुलै रोजी आम्हाला पहाटे चार वाजता फर्ग्युसन कॉलेजच्या मेन गेटपाशी पोहोचायचे होते. साधारणतः आम्ही तेथून 4.30 ते 4.45 च्या दरम्यान निघालो. 9.00 ते 9.15 पर्यंत आम्ही आंबोली गावात पोहोचलो. 

अंबोली गावात पोहोचल्या पोहोचल्या ढग गडगडायला लागले व जोराचा पाऊस सुरू झाला. आम्ही सर्व "उडान'चे आहोत. त्यामुळे शिक्षक दादांनी आम्हाला मॅप दिले व रस्ता शोधायला लावला. तेथील एका गावकऱ्याला आम्ही रस्ता विचारला. त्यांनी रस्ता सांगितला, पण त्यांनी आम्हाला थोडा वेळ थांबायला लावले, कारण तिकडच्या नदीचे पाणी थोडे वाढले होते. शिक्षक दादा आणि गावकऱ्यांच्या मदतीने आम्ही त्यातून मार्ग काढला. नदी पार करण्याचा अनुभव विलक्षण होता. आम्ही नदी पार केल्यानंतर लगेच पायवाट शोधली व त्या मार्गाने पुढे जायला लागलो. पुढे जाता जाता आम्हाला अनेक नाले पार करायला लागले.

चार - पाच तास चालल्यानंतर आम्ही ढाकेश्‍वरच्या मंदिरापाशी पोहोचलो व तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला गणेशदादाच्या हातचा गरमागरम चहा पिण्याचे सुख मिळाले. चहासोबत आम्ही ब्रेडसुद्धा खाल्ला, पोटभर नाष्टा केला व दुर्ग पाहायला निघालो. दुर्गच्या शिखरावरून आपल्याला पूर्ण कोकण विभाग बघण्यास मिळतो. जेव्हा आम्ही वर पोहोचलो तेव्हा इतके धुके होते की आम्हाला अगदी जवळचे सुद्धा दिसत नव्हते. त्यामुळे आम्हाला कोकणातील विहंगम दृश्‍य फारसे पाहायला मिळाले नाही. त्यानंतर आम्ही दुर्ग उतरायला लागलो व एखादे गाव शोधायला लागलो. जवळ जवळ दोन ते तीन तासांनी आम्हाला एक गाव मिळाले. त्यावेळी सुसाट वारे व कडाडून पाऊस पडत होता. त्यामुळे आम्ही त्या गावातील एका शाळेत थांबलो व तिथे आम्ही परत चहा करून प्यायलो. तेवढ्यात भूषण दादा व गणेश दादाने जवळच्या एका घरी विचारपूस करून आमची खाण्यापिण्याची सोय केली.

रात्री आम्ही त्या शाळेच्या जवळच्या घरात आमटी-भात खाल्ला. त्या काकूंनी तो भात इतका सुंदर बनवला होता की त्याची चव माझ्या जिभेवर अजून आहे! रात्री झोपण्यासाठी आम्हाला त्या शाळेचे कार्यालय देण्यात आले. ते बऱ्यापैकी स्वच्छ व चांगले होते. दुसऱ्या दिवशी आम्ही उठल्यानंतर आम्ही परत त्यांच्याकडेच रात्रीचा उरलेला भाताचा फोडणीचा भात करून खाल्ला व चहासुद्धा प्यायला व त्यांचे आभार मानले व त्यांचा निरोप घेतला व या नंतरचा पायी प्रवास खूप खडतर नव्हता. त्यामुळे आम्ही तो प्रवास पटकन पार केला व आहुपे गावामध्ये पोहोचलो. 
साधारणतः हा ट्रेक 35 ते 40 किलोमीटरचा होता. आहुपेवरून आम्ही 1 वाजून 5 मि. वाजता निघालो. पोटात उडणाऱ्या कावळ्यांना जरा गप्प बसवलं व मंचर या गावात येऊन हॉटेलच्या जेवणावर ताव मारला. सुमारे 6.45 ते 7.00 दरम्यान आम्ही पुण्यात पोहोचलो. हा ट्रेक अतिशय सुंदर होता. निसर्गाचे जेवढे वर्णन करू तेवढे कमी. इतका सुंदर निसर्ग होता. हा ट्रेक काढण्याबद्दल आमच्या "जीजीआयएम'च्या दादांना धन्यवाद!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com