या पोरांमध्ये लढण्याचे बळ आले कोठून ?

Narendra Modi
Narendra Modi

पत्रकार कवलजित यांनी कन्हैयाकुमारला एक प्रश्‍न विचारला होता. पंतप्रधानांवर टीका करताना तुला भीती वाटत नाही का ? इतकी हिम्मत येते कोठून ? त्यावर कन्हैया म्हणाला होता, की "" ये हिम्मत हमे लोकतंत्र देती है ! लोकशाहीचा चौथा खांब आमच्यासोबत असताना घाबरण्याचे कारण तरी काय ? लोकशाहीत प्रत्येकालाच मत व्यक्त करण्याच स्वातंत्र असते.

या चार पोरांनी याच लोकशाहीचा आधार घेत थेट बलाढ्य अशा भाजपला शिंगावर घेतले आहे का ? या पोरांमध्ये बळ आले कोठून ? हे पाहणेही महत्त्वाचे आहे. 

गुजरातच्या निवडणुकीनंतर देशातील राजकारणाची दिशा बदलेल असे बोलले जात आहे. आणखी दीड वर्षाने लोकसभेचे मैदान गाजणार आहे. मोदींनी देशातील प्रादेशिक पक्षांना दुखावले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत प्रादेशिक पक्ष आणि काही राष्ट्रीय पक्ष अशा तरुण पोरांना घेऊन देश ढवळून काढू शकतात. गुजरातच्या निवडणुकीत कन्हैयाकुमार सारखे आणखी तीन चेहरे उदयास आले आहेत. या तरुण चेहऱ्याचीही दखल घेण्याची गरज आहे. 

फर्डा वक्ता कन्हैयाकुमार 
कन्हैयाकुमारचा जन्म 1987 मधील. बिहारच्या बेगुसराई जिल्ह्यातील बिहाट खेड्यातील. तो "सीपीआय'चा कार्यकर्ता. त्याचे वडीलही साधे शेतकरी आहेत. कष्टकरी समाजातील हा मुलगा जेएनयूमध्ये पीएच डी करण्यासाठी आला आणि थेट नेताच बनला.. त्याने महाविद्यालयात अनेक नाटकांमध्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला. एक फर्डा वक्ता म्हणून तो परिचित.

 नालंदा मुक्त विद्यापीठातून त्याने सामाजिक शास्त्रात एमए केले आहे. तो "जेएनयू'मध्ये आल्यानंतर त्याने निवडणुकीत सहभागी झाला. त्याला 2016 मध्ये पोलिसांनी अटक केली ती त्याच्या वादग्रस्त विधानाबाबत आणि संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूला फाशी दिल्याच्या निषेधार्थ त्याने जेएनयूमध्ये सभा आयोजित केली म्हणून. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

परिवारातील मंडळींनी त्याच्यावर हल्ले केले. तरीही तो डगमगला नाही. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने देशभर झंझावाती दौरे करून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संघालाही विरोध करण्यास सुरवात केली. कन्हैय्याकुमार आज देशभर गाजतो आहे तो त्याच्या भाषणामुळे. एका खेड्यातून आलेल्या हा पोरालाही अफाट प्रसिद्धी मिळाली. एक वादग्रस्त नेता म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. 

जिग्नेश, दलितांचा बुलंद आवाज 
जिग्नेश मेवानी यांचा जन्म 11 डिसेंबर 1982 मध्ये मेहसाणा जिल्ह्यातील मेऊ येथे झाला. 2003 मध्ये अहमदाबादमध्ये इंग्रजी साहित्य विषय घेऊन पदवी घेतली. त्यानंतर पत्रकारितेचा डिप्लोमा 2007मध्ये पूर्ण केला. "अभियान' या गुजराती साप्ताहिकाचे ते पत्रकारही होते.

पुढे त्यांनी "एलएलबी'चे शिक्षण पूर्ण केले. उणा मध्ये गोरक्षकांनी जेव्हा दलितांवर हल्ला केला तेव्हा हा तरुण पेटून उठला. अन्यायाविरोधात त्यांनी आवाज बुलंद केला आणि भाजप सारख्या मोठ्या पक्षाला थेट शिंगावर घेतले आणि पंतप्रधान मोदींनाही लक्ष्य केले. गुजरातच्या दंगलीची खुद्द मोदींना दखल घ्यावी लागली.

एकवेळ माझे प्राण गेले तरी चालेल पण दलितांवर हल्ले होऊ देणार नाही हे जाहीररीत्या त्यांना सांगावे लागले. यामागे ताकद होती ती जिग्नेशची हे नाकारून चालणार नाही. दलितांवरील अन्यायाने भाजपविरोधात जो संदेश जायचा होता तो गेला होता त्याचे परिणामही गुजरात निवडणुकीत भाजपला भोगावे लागले 

पुढे वडगांम मतदारसंघातून तो निवडून आला आणि जनतेच्या गळ्यातील ताईत बनला. हा मुलगा गुजरातमधील एका सामान्य कुटुंबातील असला तरी त्याने थेट पंतप्रधानांनाच लक्ष्य केले. हिमालयात जाऊन त्यांनी हाडे झिजविण्यचा सल्ला दिल्यानंतर तो देशभर चर्चेचा विषय बनला. जिग्नेश हे साधे रसायन नाही हे आता सगळ्या देशाला कळले आहे म्हणूनच की काय भाजपलवाले त्यांच्यावर तुटून पडत आहे. 

लढवय्या हार्दिक पटेल 
हार्दिक पटेलचा जन्म 20 जुलै 1993 चा विरमगावमधील . बारावी झाल्यानंतर त्याने आपल्या वडिलांना व्यवसायात हातभार लावण्यास सुरवात केली. 2010 मध्ये हार्दीकने बी.कॉमची पदवी घेतली. त्याचवेळी त्याने सहजानंद महाविद्यालयात निवडणूक लढविली. विद्यार्थी संघटनेचा तो सरचिटणीसही झाला. पुढे पाटीदार युवक संघटनेच्या सरदार पटेल ग्रुपमध्ये दाखल झाला. विरमगाव शाखेचा अध्यक्ष बनला.

अर्थव्यवस्था ढासळल्याने गुजरातमधील पन्नास हजाराहून अधिक लोकांचे व्यवसाय बंद झाले. हाताला काम नाही. खासगी नोकरी नाही. आरक्षणामुळे सरकारची दारे बंद झाली होती. त्यातच हार्दीकच्या बहिणीला गुणवत्ता असून शिष्यवृत्ती मिळत नव्हती हे जेव्हा त्याच्या लक्षात आले. तेव्हा हा तरुणही पटेलांच्या मागण्यांसाठी रस्रयावर उतरला. हा पोरगा आम्हाला काय शिकवितो असा समज सत्ताधारी भाजपने करून घेतला.

त्याला जितके छळायचे तितके छळले. त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला. त्याला तुरुंगात डांबले. पण, तो लढवय्या होता. तो थेट भाजप आणि मोदींविरोधत त्याने दोन हात केले. पाटीदार लढा आजही तो लढतो आहे. गुजरात निवडणुकीत तो ही हिरो ठरला. हार्दिकही पटेलांबरोबर घेऊन थेट मोदींशी लढतो आहे. 

चळवळ्या अल्पेश ठाकूर 
अल्पेश ठाकूरचा जन्म 1977 मधला. त्याला प्रारंभीपासून ओबीसी, एसटी, एससी समाजाचे प्रश्‍न सोडविण्यात रस होता. त्याने गुजरात क्षत्रिय ठाकोर सेनेचे स्थापनाही केली आहे. या वर्गातील तरुणाईला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी तो नेहमीच प्रयत्नशील राहिला. भटक्‍या विमुक्तांना आरक्षणाबरोबरच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याची धडपड सुरू असते.

हा चळवळ्या म्हणूनच सरकार दरबारी संघर्ष करीत असतो. जसे ओबीसींना आरक्षण मिळाले पाहिजे तसे पटेलांचेही विचार व्हावा या मताचा तो आहे. त्यासाठी त्याने हार्दीकला पाठिंबा दिला आहे. गुजरातमधील ओबीसी समाजाच्या न्यायहक्कासाठी त्याने 2016 मध्ये मोठे आंदोलन केले. या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागली.

अल्पावधीत अल्पेश हे नाव राष्ट्रीयस्तरावर पोचले आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत असताना तो पुढे कॉंग्रेसमध्ये सहभागी झाला. राहुल गांधींचे नेतृत्व त्याला मान्य झाले. त्याने कॉंग्रेसचा हात धरला. गुजरातमध्ये निवडणूक लढवली आणि तो राधनपूर मतदारसंघातून निवडून आला. राहुल यांच्या बरोबर अल्पेशने भाजप आणि मोदींवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com