पुणे, ठाण्यासह मुंबईतील चार स्थानकांचा समावेश
नवी दिल्ली : सार्वजनिक खासगी भागीदारीतून देशभरातील एकूण 23 रेल्वे स्थानकांचा विकास केला जाईल. त्यात महाराष्ट्रातील बॉम्बे सेंट्रल (बीसीटी), लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), पुणे जंक्शन, ठाणे, वांद्रे टर्मिनस, बोरीवली या स्थानकांचा समावेश आहे, अशी घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज केली.
रेल्वेने देशभरातील एकूण 407 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याची योजना आखली आहे. यात पहिल्या टप्प्यातील 23 रेल्वे स्थानकांची घोषणा आज झाली. या 407 स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील 38 स्थानके आहेत, तर पहिल्या टप्प्यात राज्यातील सहा रेल्वे स्थानके आहेत. या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाकरिता खुल्या निविदा मागविल्या जातील. यामध्ये ए 1 आणि ए श्रेणीच्या स्थानकांची निवड केली असून, त्यात प्रामुख्याने महानगरे, प्रमुख शहरे, स्मार्ट सिटी, अमृत या योजनेत सामील होणारी शहरे; तसेच पर्यटन आणि धार्मिक ठिकाणांवरील शहरांचा समावेश केला आहे.
या अंतर्गत रेल्वेकडून अधिकाधिक 140 एकर जमीन ही 45 वर्षांसाठी विकसकांना भाडेकराराने देण्यात येईल. त्यासाठी रेल्वेने झोननुसार नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. या प्रथम टप्प्यातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी जवळपास 6000 ते 9000 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न राहील. यामध्ये औषध केंद्र, खरेदी केंद्र, खाद्यपदार्थांचे दालन, डिजिटल स्वाक्षरी, सरकते जिने, तिकीट काउंटर, आरामदायक लाउंज, सामान तपासणीसाठी स्क्रीनिंग यंत्रे, वाय-फाय सेवा आदी सोईसुविधा दिल्या जातील.
दरम्यान अकोला, अमरावती, बडनेरा, भुसावळ, चाळीसगाव, जळगाव, कुरवा, लातूर, मनमाड, मिरज, नाशिक रोड, पनवेल, साईनगर, शेगाव, नगर (मध्य रेल्वे), दौंड, कोल्हापूर, कोपरगाव, लोणावळा, बल्लारशा, चंद्रपूर, वर्धा, नांदेड, औरंगाबाद, जालना, नगर (दक्षिण मध्य रेल्वे), परभणी, गोंदिया, सीएसटी मुंबई, नागपूर, कल्याण, दादर, सोलापूर या रेल्वे स्थानकांचाही टप्प्याटप्प्याने पुनर्विकास केला जाईल. |
|