पुणे - भौतिकशास्त्रामधील या वर्षीचे नोबेल पारितोषिक "गुरुत्वाकर्षणाच्या लहरीं'संदर्भात केल्या गेलेल्या संशोधनास जाहीर झाले आहे. भारतामधील नऊ संस्थांमधील एकूण 37 भारतीय वैज्ञानिकांनी हे संशोधन मांडण्यासाठी लिहिण्यात आलेल्या शोधनिबंधामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यामध्ये पुणे शहरामधील खगोलविज्ञान व खगोलभौतिक (ऍस्ट्रोफिजिक्स) या क्षेत्रांत संशोधन करणाऱ्या "आयुका' संस्थेमधील वैज्ञानिकांचा सिंहाचा वाटा आहे.
गुरुत्वाकर्षाणाच्या लहरींच्या निरीक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या "लायगो डिटेक्टर'साठी रेनर वेस, बॅरी सी बारिश आणि किप एस थॉर्न या वैज्ञानिकांना या वर्षीचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे. आयुकामधील सुमारे 12 वैज्ञानिक या संशोधनासाठी लिहिण्यात आलेल्या पहिल्या शोधनिबंधाचे सहलेखक होते.
"या संशोधनासाठी भारताकडून महत्त्वपूर्ण योगदान देण्यात आले आहे. गुरुत्वाकर्षणाच्या लहरी शोधून काढण्याच्या प्रक्रियेत आवाजापासून (नॉईज) संकेत (सिग्नल) मिळविण्यासंदर्भात भारतीय संशोधकांनी मोठे योगदान दिले आहे. या संशोधनाला मिळालेल्या नोबेलमुळे भारतामधील "लाइगो डिटेक्टर' प्रकल्पास आता गती मिळेल,'' असे या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या संजीव धुरंधर यांनी सांगितले.
आयुकामध्ये धुरंधर यांच्याच नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या गटाने डिटेक्टरच्या आवाजामधून गुरुत्वाकर्षाणाच्या क्षीण लहरी शोधून (डिटेक्ट) करण्यासाठी आवश्यक असलेल्या माहितीच्या पृथ:करणाचे मूलभूत तंत्र विकसित करण्याचे कार्य केले होते.
|