लखनौ - समाजवादी पक्षात सुरू असलेला कौटुंबिक कलह हे केवळ नाटक असून, याद्वारे भ्रष्टाचार करणे आणि लोकांना भूलवणे हा उद्देश असल्याचा आरोप भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला.
अखिलेश यादव यांच्या कारकिर्दीत भ्रष्टाचाराने परिसीमा गाठली असून, हे सरकार तातडीने हटविण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले.येथील महापरिवर्तन रॅलीला संबोधताना ते बोलत होते. सध्याचे सप सरकार हे केवळ भ्रष्टाचार करत असून, गुंडागर्दीला प्रोत्साहन देणे हेच यांचे काम असल्याचा आरोप शहा यांनी या वेळी केला.
गरीब आणि तळागाळातील लोकांसाठी केंद्राकडून अनेक योजना राबविल्या जातात. मात्र, राज्यात त्यांची अंमलबजावणीच होत नाही, त्या केवळ लखनौपर्यंतच पोचतात, असेही ते म्हणाले. लोकांना काही देण्यामध्ये स्वारस्यच नसल्याने ही परिस्थिती असल्याचे सांगत परस्परांत वाद घालणे हे सपचे केवळ नाटक असल्याचे त्यांनी या वेळी आवर्जून नमूद केले. केलेला भ्रष्टाचार आणि गैरकारभार यापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच हे नाटक सुरू असल्याचे मतही व्यक्त करत जनतेने भाजपला एक संधी द्यावी, अशी विनंतीही त्यांनी या वेळी केली.
|