गुवाहाटी - आसाम राज्यामध्ये झालेल्या मुसळधार वृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे गेल्या 12 तासांत आणखी 10 बळी गेले आहेत. यामुळे राज्यात गेल्या एप्रिल महिन्यापासून पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या एकूण 134 इतकी झाली आहे. तसेच गेल्या 10 ऑगस्ट पासून राज्याला पुराच्या बसलेल्या नव्या फटक्यामुळे आत्तापर्यंत 49 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.
जगातील सर्वांत मोठे नदीतील बेट असलेल्या माजुलीसही ब्रह्मपुत्रा व सुबंसिरी या नद्यांना आलेल्या पुरामुळे मोठा धोका उत्पन्न झाला आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल हे या बेटाचे विधीमंडळात प्रतिनिधित्व करतात.
राज्यात ब्रह्मपुत्रा नदीला दुसऱ्यांदा पूर आला आहे. ब्रह्मपुत्रा तसेच तिच्या सर्व उपनद्या सध्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने राज्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. राज्यातील 32 पैकी 25 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला असून, 33 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. रेल्वेच्या कटिहार, अलिपूरदूर विभागात अनेक ठिकाणी रेल्वेचे रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे
|