दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेदरम्यान "अपेयपानावरून' लगावलेल्या कोपरखळीमुळे संतप्त झालेले आप खासदार भगवंत मान यांनी, पंतप्रधानांचे वक्तव्य कामकाजाच्या नोंदीतून वगळले नाही, तर हक्कभंग आणू, असा इशारा दिला आहे. यासाठी त्यांनी लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पत्र पाठविले आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चार्वाक तत्त्वज्ञानाचा उल्लेख करताना भगवंत मान यांना चिमटा काढला होता. जोपर्यंत जीवन आहे, तोपर्यंत आनंदात जगा, असा चार्वाक संदेश असल्याचे सांगताना पंतप्रधानांनी "ऋणं कृत्वा घृतं पिबेत्' (कर्ज काढून तूप प्या) हा संस्कृत श्लोक ऐकविला. तसेच हे त्या काळच्या ऋषींचे संस्कार होते म्हणून तूप पिण्याबद्दल सांगितले, नाही तर इतर काही पिण्याबद्दल सांगितले असते, असे भगवंत मान यांना उद्देशून मोदी म्हणाले होते. यावर खासदार भगवंत मान यांनी आज लोकसभाध्यक्षांना पत्र लिहून पंतप्रधान मोदींचे आपल्यासंदर्भातील वक्तव्य कामकाजाच्या नोंदीतून वगळण्याची मागणी केली.
|