न्यायालयाच्या निर्णयाचे भाजपकडून स्वागत

न्यायालयाच्या निर्णयाचे भाजपकडून स्वागत

चर्चेद्वारे वाद लवकर मिटण्याची आशा; कॉंग्रेस, संघाकडूनही सकारात्मक प्रतिसाद

नवी दिल्ली: अयोध्यातील रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादामध्ये न्यायालयाबाहेर परस्पर समजुतीने तोडगा काढण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेचे भाजपने आज स्वागत केले. या प्रकरणाबाबत चर्चा करताना संबंधितांनी या बाबीची संवेदनशीलता लक्षात घ्यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना भाजप प्रवक्ते सांबित पत्रा म्हणाले, की न्यायालयाबाहेर परस्पर चर्चा करून वाद मिटविण्याचा न्यायालयाचा हा सल्ला योग्यच आहे. हा प्रश्‍नाशी देशभरातील कोट्यवधी भाविकांच्या भावना जोडलेल्या असल्याने चर्चा करताना पुरेशी संवेदनशीलता बाळगावी असे न्यायालयाने म्हटले आहे. पत्रा यांनी न्यायालयाने निदर्शनास आणून दिलेल्या या मुद्यावर भर देत संबंधितांना चर्चेसाठी आवाहन केले. केंद्रीय मंत्री पी. पी. चौधरी यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, चर्चेच्या मार्गाने वाद लवकर सुटण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. कॉंग्रेस नेत्यांनीही न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

वाद लवकर मिटावा : होसबाळे
अयोध्येचा वाद लवकरात लवकर मिटावा आणि सर्व भारतीयांच्या सहभागाद्वारे राम मंदिर उभारले जावे, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका असल्याचे संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी आज न्यायालयाच्या निर्णयानंतर सांगितले. रामजन्मभूमी चळवळीशी संबंधित असलेल्या धर्मसंसदेने याबाबत घेतलेल्या निर्णयाला संघाचा पाठिंबा असेल, असेही होसबाळे म्हणाले. चर्चेद्वारे अथवा न्यायालयाद्वारे हा वाद मिटवून राममंदिर उभारले गेले पाहिजे, असे संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनीही म्हटले आहे.

-------------------------------------------------------------------------------
न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे अयोध्येमध्ये श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. त्याच जागेत रामाचे मंदिर असावे, अशीच आमच्या सरकारची आणि आणि भाजपची भूमिका आहे. चर्चेचा पाठिंबा देत सर्वोच्च न्यायालयाने या प्रश्‍नी मोठा पुढाकार घेतला आहे.
- महेश शर्मा, केंद्रीय सांस्कृतिकमंत्री

-------------------------------------------------------------------------------
वादग्रस्त जागेवर कोणाचे नाव असावे, यासाठी हा वाद सुरू आहे. तसेच, अडवानी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्याविरोधात आरोप सिद्ध होतात की नाही, याचा निर्णय न्यायालयाकडून येण्याची वाट पाहत आहे. तसेच, बाबरी मशिद पाडल्यानंतर न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवरही लवकर निर्णय होईल, अशी आशा आहे.
- असदुद्दीन ओवेसी, अध्यक्ष, एमआयएम
-------------------------------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com